You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'संघ कधीच सर्वसमावेशक होऊ शकत नाही'
'काँग्रसमुक्त भारत ही घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारता बसत नाही,' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भूमिकेवर वाचकांनी टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या "काँग्रेस मुक्त भारत' नाऱ्याचा आणि काँग्रेस-आघाडीने दिलेल्या 'संघ मुक्त भारत' घोषणेविषयी बोलताना भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच, राष्ट्रनिर्मिती सर्वांना सोबत घेऊन करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
भागवत यांच्या या भूमिकेवर वाचकांनी टीका करताना ते शब्द फिरवत आहेत, अशा आशयाची मत व्यक्त केली आहेत.
"भागवत आणि अमित शहा दोघेही स्वप्नांच्या जगात वावरतायेत. जिंकले तर श्रेय त्यांचं आणि पराभव झाला तर तो काँग्रेसमुळे, अशी त्यांची भूमिका आहे. गेली 60 वर्षं 'संघ' झोपला होता आणि आता जाग आली असली तरी अजून स्वप्नचं पाहात आहेत. जनतेने त्यांना एक संधी दिली होती, पण त्याची ते चीज करू शकले नाहीत. आता पुढच्या वर्षी जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल," अशी प्रतिक्रिया सुशील पवार यांनी दिली आहे.
तर दादाराव तायदे यांनी 'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा...' अशीच काहीशी स्थिती संघाची झाली आहे, असं म्हटलं आहे.
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वसमावेशक असूच शकत नाही. जो पर्यंत सरसंघसंचालक अन्य जातीतील होऊ शकत नाही आणि मागासवर्गीय व्यक्ती शंकराचार्य होत नाही तोपर्यंत संघ मर्यादित राहणार,"असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुषार व्हनकाटे म्हणतात, "मोहन भागवत यांना काँग्रेस मुक्त भारत करणं अशक्य आहे, हे समजलं असल्याने ते शब्द फिरवत आहेत."
श्रीकांत जुननकर म्हणतात, "२०१४च्या निवडणुकीत मोदी हे विशेष आकर्षण होते, ते जे काही बोलत त्याला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. परंतु त्यांचे सरकार बनल्यानंतर भ्रष्टाचार न थांबता तो अधिकच वाढला. ते आजही त्यांच्या भाषणात कामाचे सोडून जुने वाद उकरून काढतात. शेतकरी, युवकांच्या समस्या कायमच आहेत."
खरतरं शेतकरी बांधव आणि बेरोजगारांना तुम्ही निराश केलं, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
हर्षल लोहकर यांनी देशाला 'संघमुक्त' करण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं आहे.
तर यतीराज पाटील टीका करताना म्हणतात,"घड्याळ आणि कमळी चा वाढता एकोपा संघ चालकांना सतावत आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)