डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'व्यापाराच्या मुद्द्यावरूनच झाली शस्त्रसंधी'; यावर भारताची काय भूमिका?

फोटो स्रोत, Getty Images
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला शस्त्रसंधीत बदलण्याचं श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेताना दिसत आहेत.
दोन्ही देशांनी ही शस्त्रसंधी अमेरिकेसोबतच्या व्यापारामुळे केली आहे, असा नवा दावा आता त्यांनी केला आहे.
पण पाकिस्तानसोबतच्या संघर्षादरम्यान, आतापर्यंत अमेरिकेसोबत जेवढी चर्चा झाली, त्यात व्यापाराचा कुठेही उल्लेख झाला नव्हता, असं भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे.
भारताने शस्त्रसंधीबाबत आतापर्यंत जी माहिती दिली, त्यात एकदाही अमेरिकेच्या भूमिकेचा उल्लेख केलेला नाही.
मंगळवारी (13 मे ) जेव्हा भारताच्या परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेतली तेव्हा शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेची काय भूमिका आहे यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्याबाबतचे सविस्तर उत्तर भारताच्या परराष्ट्र खात्याने दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नेमके काय म्हणाले, त्यावर भारताची प्रतिक्रिया काय आणि दोन्ही देशात नेमका किती प्रमाणात व्यापार होतो हे आपण या बातमीतून पाहू.
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात आधी सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीची घोषणा केली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी दोन्ही देशांच्या सीमांवर शांतता राखल्याबद्दल कौतुकही केले होते.
काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प रोज नवनवे दावे करत आहेत. सोमवारी त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान असा दावा केला की, 'त्यांनी भारत आणि पाकिस्तानवर असा दबाव टाकला होता की, जर त्यांनी शस्त्रसंधी स्वीकारली नाही, तर ते दोन्ही देशांशी व्यापारी संबंध तोडतील.'
भारत आणि पाकिस्तानने व्यापाराच्या कारणामुळे हा संघर्ष संपुष्टात आणण्यावर सहमती दर्शवली, असा दावा त्यांनी केला.

फोटो स्रोत, Getty Images
व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसज्ज देशांत संपूर्ण शस्त्रसंधी लागू करण्यास आम्ही मदत केली. मी म्हणालो की, तुम्हा मित्रांसोबत आम्हाला व्यापार करायचा आहे. हे ताबडतोब थांबवा. हे थांबवलं तरच तुमच्याशी व्यापार होईल. जर तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही."
ट्रम्प यांनी नंतर स्वतःलाच शाबासकी देत सांगितलं की, "मी तुम्हाला सांगू शकतो की, याआधी व्यापाराचा वापर अशा पद्धतीने कधीच झाला नाही जसा मी करत आहे. त्यांनी हे (शस्त्रसंधी) अनेक कारणांसाठी केलं आहे, पण व्यापार हे सर्वात मोठं कारण आहे."

"आम्ही पाकिस्तानसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करणार आहोत. तसंच आम्ही भारतासोबतही व्यापार करणार आहोत. आम्ही सध्या भारतासोबत वाटाघाटी करत आहोत. पाकिस्तानसोबत लवकरच बोलणी करणार आहोत. आम्ही आण्विक संघर्ष थांबवला."
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू केले होते. ज्यामध्ये त्यांनी चीन आणि भारतासह अनेक देशांवर आयात शुल्क लावलं होतं. पण नंतर त्यांनी त्याच्या अंमलबजावणीचा दिवस पुढे ढकलला आहे.
ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची अधिकृत प्रतिक्रिया काय आहे?
भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी मान्य केले की 'भारत-पाकिस्तान सैन्य संघर्षादरम्यान भारत सातत्याने अमेरिकेच्या संपर्कात होता. परंतु या दरम्यान, व्यापारासंबधी काही बोलणे झाली नाही.'
पत्रकार परिषदेवेळी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जायसवाल यांनी म्हटले की 7 ते 10 मे च्या काळात भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये बोलणे झाले. परंतु त्यावेळी व्यापारासंबंधी काहीही चर्चा झाली नाही.

फोटो स्रोत, Ministry Of External Affairs India/Youtube
उल्लेखनीय आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवस सैन्य संघर्ष चालल्यानंतर शनिवारी 10 मे रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीसाठी अमेरिकेनी मध्यस्थी केली आहे. त्यानंतर दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाले.
जायसवाल यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळताना म्हटले की 'पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी' किंवा त्यासंदर्भात मध्यस्थी करण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही.
पाकिस्तानविरोधात भारताकडून सुरू असलेली सैन्य कारवाई कशी स्थगित करण्यात आले याची सविस्तर माहिती जायसवाल यांनी दिली. ते म्हणाले, "भारताने 6-7 मे च्या रात्री पाकिस्तानातील मोजक्या ठिकाणांना लक्ष्य केले. हे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते. त्या ठिकाणाहून प्रशिक्षित झालेल्या दहशतवाद्यांनी भारत आणि जगभरातील निर्दोषांच्या हत्येत सामील होते."
पुढे ते म्हणाले, "10 मे च्या सकाळी भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य केले. त्यानंतर 12 वाजून 37 मिनिटांनी भारतीय परराष्ट्र खात्याला पाकिस्तान उच्चायुक्तांकडून यासंदर्भात विनंती आली. पाकिस्तानच्या डीजीएमओकडून हॉटलाईनवर बोलण्याचे प्रयत्न झाले परंतु तांत्रिक कारणामुळे अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यात आल्या. त्यानंतर दुपारी 3.30 मिनिटांनी दोन्ही देशातील डीजीएमओंमध्ये चर्चा झाली."
जायसवाल यांनी सांगितले की पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू नदी करार स्थगित करण्यात आला होता. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देणे पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगितच राहील.

फोटो स्रोत, ANI
याआधी, सोमवारी, रात्री आठ वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले होते. या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या लष्करी आणि 'दहशतवादी ठिकाणां'वरील कारवाई फक्त स्थगित केली आहे.
यादरम्यान पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं की, पाकिस्तानसोबत तेव्हाच 'चर्चा' होऊ शकते जेव्हा 'दहशतवाद' थांबेल. जोपर्यंत 'दहशतवाद' सुरू आहे तोपर्यंत पाकिस्तानशी 'व्यापार' होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले होते. जेव्हाही पाकिस्तानशी चर्चा होईल तेव्हा ती दहशतवादासंबंधी असेल, तेव्हा ती पाकव्याप्त काश्मीरबाबत असेल असे मोदींनी म्हटले होते.
भारत आणि अमेरिका यांच्यात किती व्यापार होतो?
दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफची (परस्पर शूल्क) घोषणा केली आहे.
अमेरिकेने सोमवारी चीनसोबत व्यापार कराराची घोषणा केली, तेव्हा ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धातील मोठा टर्निंग पॉईंट समोर आला आहे.
भारतासोबतही अमेरिकेची चर्चा सुरू आहे, ज्याचा दाखला डोनाल्ड ट्रम्प यांनीही दिला आहे. ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली होती.
भारताने याविरोधात कोणतीही प्रत्युत्तराची कारवाई केली नाही. परंतु, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित मुद्द्यावर चर्चा झाली असल्याचे सांगितले.

फोटो स्रोत, Getty Images
भारत अमेरिकेला औषधं, ऑटो कम्पोनंट्स आणि कपडे यासारख्या वस्तू निर्यात करतो आणि कच्चं तेल, पेट्रोलियम उत्पादनं, लष्करी उपकरणं आणि कृषी उत्पादनं खरेदी करतो.
कच्च्या तेलाच्या बाबतीत अमेरिका, भारताचा पाचवा आणि एलएनजीचा (लिक्विफाइड नॅचरल गॅस) पुरवठा करणारा मोठा देश आहे.
भारत सरकारला 2030 पर्यंत देशातील नैसर्गिक वायू वापराचा हिस्सा 6.3 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवायचा आहे.
अमेरिका भारताला निर्यातीपेक्षा जास्त आयात करतो. वर्ष 2023 मध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये 190 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता.
अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारत आणि अमेरिकेला वर्ष 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत न्यायचा आहे.
वर्ष 2023 मध्ये दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार 190.08 अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. उर्वरित 66.19 अब्ज डॉलरचा व्यापार हा सेवा क्षेत्रातील होता.
यामध्ये भारताची निर्यात 83.77 अब्ज डॉलर आणि आयात 40.12 अब्ज डॉलर इतकी होती. म्हणजेच या द्विपक्षीय व्यापारात अमेरिकेचे 43.65 अब्ज डॉलर इतके व्यापारी नुकसान झाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











