जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, अजित पवारांनी सांगितलं अपघाताचं कारण आणि घटनाक्रम

या फोटोत अजित पवार आणि जळगावमधील अपघातग्रस्त रेल्वे दिसत आहे.

फोटो स्रोत, ANI

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, "यापैकी 10 जणांची ओळख पटली आहे. 10 प्रवाशांचे पूर्ण शरीर सापडले आहे. तीन लोकांच्या अंगावरून गाडी गेल्यानं शरीराचे तुकडे झालेत. त्यात एक पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये 8 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे."

"ही घटना फक्त अफवांमुळे घडली आहे. या सर्वांचे उपचार मोफत करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दाओसमधून आणि आम्ही इथून दिल्या आहेत. काही तासांनी दोन्ही रेल्वे आपापल्या जागी पोहोचल्या. रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर मोफत उपचार केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अपघात घडला तेव्हा नेमकं काय घडलं? अजित पवारांनी दिली माहिती

अजित पवार यांनी जळगाव अपघात का घडला आणि अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं यावरही भाष्य केलं.

ते म्हणाले, "जखमी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बोगीत वरच्या सीटवर बसले असताना बोगीतल्या चहा विक्रेत्यांनी आग लागल्याची ओरड सुरू केली. ते ऐकून त्यांच्या आणि आजुबाजुच्या काही बोगीत गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दोन्ही बाजुला उड्या मारल्या."

"गाडीचा वेग जास्त असल्याने सगळ्यांना उड्या मारणे जमले नाही. त्यावेळी कोण्या प्रवाशाने स्वतःचं डोकं चालवून साखळी ओढली. प्रवासी मिळेल त्या दरवाजातून, खिडकीतून, मिळेल त्या ठिकाणावरून खाली उतरू लागले आणि इकडे तिकडे जाऊ लागले. तेव्हा शेजारच्या रेल्वे रूळावरून बंगलोर-न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावर असणाऱ्यांना चिरडून पुढे काही अंतरावर जाऊन थांबली."

"हे सांगणंही योग्य वाटत नाही, इतकी या अपघातात अनेक प्रवाशांच्या शरीराची दुर्दशा झाली आहे. अनेक प्रवासी यात मृत्यूमुखी पडले. काही जखमी झाले. उदल आणि विजय यांनाही धडक बसली आणि ते जखमी झाले," असंही अजित पवारांनी नमूद केलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"30 वर्षांचे उदल कुमार हे उत्तरप्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील भिंगा तालुक्याचे रहिवासी आहेत. रोजगाराच्या निमित्ताने पहिल्यांदा ते मुंबईमध्ये येणार होते. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसनं ते त्यांच्या पत्नीचा भाऊ विजय कुमारसोबत प्रवास करत होते. हे दोन्ही प्रवासी सर्वसाधारण बोगीत बसले होते. ते या अपघातात जखमी झाले आहेत," अशी माहिती अजित पवारांनी दिली.

रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात ट्रॅकवर उभ्या असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांना असं वाटलं की त्यांच्या रेल्वेला आग लागली. त्या भीतीने त्यांनी रेल्वेतून समोरच्या ट्रॅकवर उड्या मारल्या.

त्याच वेळी कर्नाटक एक्सप्रेस ट्रॅकवर आली आणि त्यात काही जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

कर्नाटक एक्सप्रेस मनमाडकडून भुसावळकडे जात असतान ही घटना घडली.

या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत.

तर, 12 जखमी प्रवाशांवर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव रेल्वे दुर्घटनेप्रति शोकसंवेदना व्यक्त करून, श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करत, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली. तसेच, मंत्री गिरीश महाजन यांना दुर्घटनास्थळी पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.

फडणवीस म्हणाले, "जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

फडणवीस पुढे म्हणाले, "घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.

"ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

पालकमंत्र्याकडून घटनास्थळाचा आढावा

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. पाटील म्हणाले, "मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत."

घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चा देखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जळगाव रेल्वे अपघात

केंद्र सरकार व रेल्वे विभागाच्या संपर्कात जिल्हा प्रशासन घटनेच्या अनुषंगाने रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मदतकार्य जलदगतीने सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

रेल्वे दुर्घटनेवर राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मला जळगाव एसपींचा फोन आला, मी थोड्याच वेळात घटनास्थळी पोहचत आहे. त्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल.

अतिशय दुर्देवी अशी घटना घडली आहे. नेमकं काय घडलं? किती मृत्यू झाले, किती जखमी आहेत हे तिथे पोहचून कळेल. सध्याच्या परिस्थितीबाबत फोनवरुन कळालं आहे. काही जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत."

रेल्वे प्रशासन काय म्हणाले?

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला घटनेबाबत माहिती देताना म्हणाले, "लखनौवरून मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस ही माहेजी आणि परधाडे स्टेशनदरम्यान अलार्म चेन पुलिंगमुळे थांबली होती. यावेळी ट्रेनमधील काही प्रवाशी बोगीतून खाली उतरले होते.

रेल्वे

दरम्यान, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्प्रेसखाली येऊन या प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने रेल्वे प्रशासनातर्फे घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)