You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
...तर महाराष्ट्रातल्या ‘या’ 13 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पीएम किसान म्हणजेच ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’चा 14 वा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
हा हप्ता मिळवायचा असेल तर लाभार्थ्यांना त्यांचं ज्या बँक खात्यात पीएम किसानचे 2 हजार रुपये जमा होतात, ते खातं आधार क्रमांकाशी जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
उप-आयुक्त कृषीगणना आणि पीएम किसान योजनेचे पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पीएम किसान योजनेचे एकूण 96 लाख 98 हजार इतके लाभार्थी आहेत. यापैकी 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाहीत.
आता याच जवळपास 13 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा होणार नाहीये, असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्तालयानं दिले आहेत.
या लाभार्थ्यांना पुढचा हप्ता हवा असल्यास त्यांनी लवकरात लवकर 2 गोष्टी करणं बंधनकारक आहे.
कोणत्या आहेत या 2 गोष्टी, पाहूया...
‘या’ 2 गोष्टी कराच!
1.आधार कार्ड, मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक करा
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं आणि मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी लिंक करून घ्या.
आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्याची सुविधा महाराष्ट्र शासनानं गावातल्याच पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक यांच्या आधारे गावातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडायचे आहे.
हे बँक खाते आधार क्रमांकाशी 48 तासात जोडले जाणार आहे. 15 मे पर्यंत हे खातं उघडण्यास मुदत देण्यात आली आहे.
“पोस्टातील हे खाते आपोआप पीएम किसान योजनेशी जोडले जाईल आणि याच खात्यात योजनेचे पैसे जमा होतील. याआधीचे राहिलेले हप्तेही याच खात्यात जमा होतील. पोस्ट ऑफिसमधील पोस्टमन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी जोडेल,” असं पुणे ग्रामीण डाकघराचे अधीक्षक बालकृष्ण एरंडे सांगतात.
2. e-KYC
e-KYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
याद्वारे एखाद्या योजनेचा लाभार्थी हयात आहे की नाही ते पडताळून पाहिलं जातं. राज्यातील 18 लाख 27 हजार लाभार्थ्यांनी अद्याप e-KYC केलेली नाहीये.
e-KYC तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन करू शकता किंवा मग पीएम किसानच्या पोर्टलवरही करू शकता.
ऑनलाईन e-KYC कशी करायची ते तुम्ही खालीली व्हीडिओवर क्लिक करून गावाकडची गोष्ट क्रमांक 56 मध्ये पाहू शकता.
PM किसान योजना
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. 14 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)