चंद्रग्रहण : ग्रहणाबद्दलच्या 'या' समजुती किती खऱ्या, किती खोट्या?

खंग्रास चंद्रग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, वारिकुट्टी रामकृष्ण
    • Role, बीबीसीसाठी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज (3 मार्च) होत आहे. हे पूर्ण (खग्रास) चंद्रग्रहण असून देशाच्या पश्चिमेकडील काही भागांव्यतिरिक्त भारतातील बहुतेक ठिकाणांहून पाहायला मिळेल.

पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि अमेरिका या भागांतूनही हे ग्रहण दिसेल.

यावेळी चंद्र पूर्ण लाल रंगात दिसून येईल ज्याला ब्लड मून असं म्हणतात. या ग्रहणाचा कालावधी 3 तास 28 मिनिटांचा राहणार आहे.

चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी संपेल.

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्याबद्दल आपल्याकडे अनेक समजुती आहेत. काय करावं, काय करू नये, याबद्दल भरपूर सल्ले दिले जातात.

ग्रहण काळात बहुतांश मंदिरं बंद असतात. ग्रहण संपलं की मंदिरं उघडली जातात.

ग्रहणकाळात काय करायचं, काय नाही करायचं याचे सल्ले देणारे अनेक व्हीडिओ यूट्यूबवरही दिसून येतात. पण ग्रहण म्हणजे नक्की काय, त्याच्या समजुती खरंच योग्य आहेत का, हा लेख 2022 साली प्रसिद्ध करण्यात आला होता.

चंद्रग्रहणानिमित्त तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

चंद्राला ग्रहण कसं लागतं?

परिभ्रमणादरम्यान जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे चंद्राकडे जाणारा सूर्यप्रकाश रोखला जातो, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला ग्रहण दिसतं.

चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या तुलनेत व्यापक स्तरावर दिसून येतं.

चंद्रग्रहणांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, मात्र सूर्यग्रहणात असं करता येत नाही. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं.

ग्रहणकाळाबद्दल अनेक समज-गैरसमज, त्यापैकी किती खरे-किती खोटे?

या लेखाच्या माध्यमातून बीबीसीने ग्रहणाशी संबंधित काही प्रचलित समजुती आणि त्यांची सत्यता लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

विज्ञान दर्शनी या नावाने लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रमेश यांच्याशी बीबीसीने संवाद साधला.

गर्भवतींनी बाहेर पडू नये का?

श्रद्धा : ग्रहणकाळात घराबाहेर पडू नये असे सांगितले जाते. विशेषत: गरोदर महिलांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो.

रमेश : हेही असत्य आहे. ग्रहणं जगभर होतात. तिथं लोक बाहेर पडत नाहीत का? नुकसान फक्त भारतातच होते का? ग्रहणाने गर्भातील बाळाला इजा होत नाही.

ग्रहण काळात भात शिजवू नये का?

श्रद्धा : ग्रहणकाळात भात शिजवू नये असे सांगितले जाते. ग्रहणाच्या एक ते दोन तास आधी जेवण उरकून घ्या असे म्हणतात.

रमेश : यात काही तथ्य नाही. ग्रहणाच्या काळात भात शिजवता येतो, खाऊ शकतो. जे नियमित करतो, ते करावं.

सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असेल तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, म्हणजे चंद्राला ग्रहण लागतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असेल तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, म्हणजे चंद्राला ग्रहण लागतं.

ग्रहणाचा ओठ-टाळू फाटण्याशी संबंध आहे का?

रमेश : हा पण एक गैरसमज आहे. ग्रहण आणि ओठ, टाळू फाटणे यांचा काहीही संबंध नाही. ओठ, टाळू फाटणे हा जनुकीय आजार आहे.

ग्रहण काळात झोपू नये? सेक्स करू नये?

श्रद्धा: ग्रहण काळात झोपी जाऊ नये असे म्हटले जाते. त्यावेळी नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे सेक्सही करू नये असं सांगितलं जातं.

रमेश : हे सगळं खोटं आहे. ग्रहणांचा लोकांच्या दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध नाही. त्यांना जे आवडते ते ते करू शकतात. तुम्ही झोपू शकता, तुम्ही तुमच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार काम करू शकता, तुम्ही सर्व काही करू शकता.

ग्रहणादरम्यान नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते का?

विश्वास: सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणादरम्यान ऐकला जाणारा आणखी एक शब्द म्हणजे नकारात्मक ऊर्जा. असे म्हणतात की त्या नकारात्मक उर्जेमुळे अशुभ घडते आणि त्या वाईट काळात कोणतेही काम करू नये.

रमेश: ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते हे खरे नाही. ग्रहण म्हणजे काय? जर चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधे आला तर ते सूर्यग्रहण आहे.

म्हणजे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. जेव्हा तुम्ही उन्हात छत्री ठेवता तेव्हा असेच होते. त्यापलीकडे ग्रहणकाळात काहीही होत नाही. कोणतीही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत नाही.

चंद्रग्रहणादरम्यानचे वेगवेगळे टप्पे (2010 मध्ये आइसलँडमध्ये घेतलेला फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चंद्रग्रहणादरम्यानचे वेगवेगळे टप्पे (2010 मध्ये आइसलँडमध्ये घेतलेला फोटो)

या समजुतींचे कारण काय आहे?

रमेश: या समजुती पौराणिक कथांमधून येतात. त्या समजुती काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी जोपासतात. पूर्वी बहुतेक ब्राह्मण त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि आचरणात आणत. ते ग्रहणकाळात स्नान आणि पूजा करत असत.

परंतु, इतर समुदाय या सर्वांचे पालन करत नाहीत. ग्रहण असल्यामुळे तुम्ही कामावर न जाता ग्रामीण भागात राहू शकता का? भात शिजवल्याशिवाय खाणे शक्य आहे का?

त्यानंतर, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या आगमनाने, काहीजण या समजुती सर्वांवर लादत आहेत. त्यामुळे अनेकजण त्या विश्वासांचे पालन करतात.

अशा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.

ग्रहणकाळात गर्भवतींनी बाहेर जाऊ नये का? तज्ज्ञ काय सांगतात?

ग्रहण काळाबद्दलच्या आपल्याकडे अनेक समजुती आहेत. त्यापैकी किती समज खरे-किती खोटे याबाबत बीबीसी मराठीने स्त्रीरोग तज्ज्ञ व खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे यांच्याशी चर्चा केली.

डॉ. निटवे म्हणाले, "अलीकडच्या काळातही ग्रहणाबद्दल अनेक गैरसमज समाजात घट्ट रुजलेले दिसतात. विज्ञान, सोनोग्राफी आणि आधुनिक वैद्यकीय तपासण्या इतक्या प्रगत झाल्या असतानाही गर्भवती महिलांवर ग्रहणकाळात विविध बंधनं घातली जातात.

आम्ही डॉक्टर म्हणून वारंवार सांगतो की बाळ सुरक्षित आहे, गर्भाची वाढ व्यवस्थित आहे. तरीही अनेक महिलांवर घरातून प्रचंड दबाव येतो. 'ग्रहणकाळात बाहेर पडायचं नाही, काही काम करायचं नाही, विशिष्ट पद्धतीने बसायचं नाही', या सगळ्यामुळे त्यांच्या मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो.

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

ग्रहण काळात गर्भवतींनी बाहेर जाऊ नये, असाही एक समज आहे. याबाबत बोलताना डॉ. निटवे म्हणतात, "प्रत्यक्षात ग्रहणाचा आणि गर्भदोषाचा कोणताही संबंध नाही. ग्रहणावेळी कोणतेही नवीन किरण किंवा हानिकारक ऊर्जा तयार होत नाही. चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, आणि सूर्यग्रहणात चंद्र सूर्य झाकतो, इतकंच. या प्रक्रियेमुळे पृथ्वीवर काही अपायकारक बदल होत नाहीत."

गर्भातील दोष निर्माण होण्याची कारणं पूर्णपणे वेगळी असतात. गर्भाची वाढ ही जनुकीय (genetic) नियंत्रणाखाली होत असते.

काही दोष वंशपरंपरेने येऊ शकतात, काही विशिष्ट औषधांमुळे, किंवा फॉलिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन B12 सारख्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकतात. ओठ न जुळणे (cleft lip), टाळू न जुळणे किंवा बोटे चिकटलेली असणे यामागे वैद्यकीय कारणं असतात. ग्रहणकाळात चाकू वापरल्यामुळे किंवा पाय क्रॉस करून बसल्यामुळे असे दोष होत नाहीत. अशा जोडण्या पूर्णपणे चुकीच्या आणि अंधश्रद्धेवर आधारित आहेत."

ग्रहण आणि ओठ, टाळू फाटणे यांचा काहीही संबंध नाही. ओठ, टाळू फाटणे यामागे वैद्यकीय कारणं असतात. गर्भाची वाढ ही जनुकीय (genetic) नियंत्रणाखाली होत असते, असं तज्ज्ञ सांगतात.
फोटो कॅप्शन, ग्रहण आणि ओठ, टाळू फाटणे यांचा काहीही संबंध नाही. ओठ, टाळू फाटणे यामागे वैद्यकीय कारणं असतात. गर्भाची वाढ ही जनुकीय (genetic) नियंत्रणाखाली होत असते, असं तज्ज्ञ सांगतात.

पुढे ते म्हणाले, "गर्भाची महत्त्वाची अवयव निर्मिती पहिल्या आठ आठवड्यांत पूर्ण होते. साधारण अडीच महिन्यांत ओठ, टाळू, हात-पाय यांची प्राथमिक रचना तयार झालेली असते. तीन महिन्यांनंतर नवीन अवयव तयार होत नाहीत. शिवाय तिसऱ्या-पाचव्या महिन्यातील सोनोग्राफीमध्ये बाळाची रचना स्पष्ट दिसते. त्यामुळे महिलांनी भीती बाळगण्याचं काही कारण नाही.

ग्रहणकाळात घराबाहेर पडू न देणं ही अतिशय धोकादायक बाब ठरू शकते. जर त्या वेळी पोटदुखी, रक्तस्त्राव किंवा इतर तातडीची लक्षणं दिसली तर त्वरित दवाखान्यात जाणं अत्यावश्यक असतं. फक्त ग्रहण आहे म्हणून उपचार टाळल्यास आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

म्हणून स्पष्ट सांगायचं तर ग्रहण पाहिल्याने, बाहेर पडल्याने किंवा दैनंदिन काम केल्याने गर्भाला काहीही अपाय होत नाही. महिलांनी मानसिक दडपण घेऊ नये आणि अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवावा."

ग्रहणाबद्दल पौराणिक कथा काय सांगते?

विष्णू पुराणानुसार, देव आणि दानवांनी मंथन केल्यावर अमृत बाहेर येते. अमृत प्यायल्यास मृत्यू येत नाही. त्यासाठी देव आणि दानव स्पर्धा करतात. त्यानंतर भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात येतात आणि राक्षसांना वश करून अमृत वाटण्यास सुरुवात करतात.

देवतांना अमृत वाटताना एक राक्षस वेश धारण करून देवतांमध्ये सामील होतो. पण हे न कळल्याने विष्णू अमृत ओततात. चंद्र आणि सूर्य तो राक्षस असल्याचं विष्णूच्या लक्षात आणून देतात.

विष्णूने ताबडतोब आपल्या सुदर्शन चक्राने राक्षसाचे डोके कापले. पण अमृत प्यायले असल्यामुळे त्याचे डोके आणि धड टिकून राहाते. त्या मस्तकाचे नाव राहू आहे. धडाचे नाव केतू आहे.

पौराणिक कथा

फोटो स्रोत, Alamy

विष्णूला त्याच्याबद्दल सांगितल्याचा बदला म्हणून राहूने चंद्र आणि सूर्य गिळला. याला ग्रहण म्हणतात. पण तो हट्टी नसल्यामुळे त्यांना सोडून देतो असे सांगितले जाते.

पौराणिक मान्यतेनुसार राहूचा हा काळ अत्यंत अशुभ मानला जातो.

विज्ञान काय म्हणते?

जेव्हा एका ग्रहाची सावली दुसऱ्या ग्रहावर पडते तेव्हा ग्रहण असते. म्हणजेच सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडला आणि त्यांच्या चंद्र मध्यभागी गेला तर ते सूर्यग्रहण असेल. म्हणजे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते.

जेव्हा सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते.

संग्रहित फोटो

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, संग्रहित फोटो

विज्ञान सांगतं की, सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांशिवाय कोणतीही समस्या नसते. सूर्यग्रहण थेट पाहू नये. डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो.

नासाचे म्हणणे आहे की, चंद्रग्रहणाचा मानवावर कोणताही विपरीत परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.