भारतीय फुटबॉल टीमला मिळालेली वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी, पण...

    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, नवी दिल्ली

कतारमध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

सार्वकालीन महान फुटबॉल लढतींमध्ये गणना होईल अशा दर्जेदार खेळाची अनुभूती अर्जेंटिना आणि फ्रान्स लढतीने दिली. निर्धारित वेळेत सामना 2-2 बरोबरीत सुटला. जादा वेळेत 3-3 बरोबरी झाली.

जगातल्या फुटबॉल खेळणाऱ्या 32 अशा सर्वोत्तम टीममध्ये लढत होऊन शेवटी कोणता तरी एक संघ फुटबॉलचा निर्विवाद बादशाह ठरणार आहे.

कतारमध्ये होणारी हा वर्ल्डकपची स्पर्धा जवळपास 22 वी वर्ल्डकप स्पर्धा होती. पण आजपर्यंत एकाही वर्ल्ड कपमध्ये भारत सहभागी होऊ शकलेला नाही.

आताच्या स्पर्धांमध्ये भलेही भारताला सहभागी होण्याची संधी मिळाली नसेल, पण आजच्या पिढीतल्या क्रीडाप्रेमींना किमान हे तरी माहिती असायला हवं की, एकवेळ आली होती जेव्हा भारत वर्ल्डकप मध्ये सहभागी होऊ शकत होता.

आताच्या फुटबॉल रसिकांना हे सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. पण हे अगदी खरं आहे.

आजपासून तब्बल 72 वर्षांपूर्वी म्हणजेच 1950 साली ब्राझीलमध्ये खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये भारतीय टीम सहभागी होणार होती, पण तिला सहभागी होता आलंच नाही.

भारताला संधी मिळाली होती कारण..

खरं तर फुटबॉलच्या वर्ल्डकप स्पर्धा 1930 पासून भरवल्या जातात. पण 1942 आणि 1946 मध्ये या स्पर्धा भरवता आल्या नाहीत कारण त्यादरम्यान दुसरं महायुद्ध सुरू होतं.

पुढे 12 वर्ष सरल्यानंतर 1950 मध्ये वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन होणार होतं. ही स्पर्धा ब्राझीलमध्ये भरवली जाणार होती आणि यात 33 देशांच्या टीम पात्रता फेरीत खेळणार होत्या.

पात्रता फेरीत गट 10 मध्ये भारताला स्थान मिळालं. या ग्रुपमध्ये भारतासोबत बर्मा (म्यानमार) आणि फिलिपाइन्स हे देश होते. पण बर्मा आणि फिलीपिन्सने पात्रता फेरीमधून आपली नावं मागे घेतली.

म्हणजेच वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी भारत न खेळताच पात्र झाला होता. आता इतिहास घडवणं लांब नव्हतं. भारतीय टीम वर्ल्डकप स्पर्धेत आपला पराक्रम दाखवण्यासाठी तयार होती.

1950 च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा ग्रुप

1950 च्या फुटबॉलच्या वर्ल्डकपचा फायनल राऊंड ड्रॉ तयार झाला तेव्हा भारताला पूल-3 मध्ये स्वीडन, इटली आणि पॅराग्वेसोबत स्थान मिळालं होतं.

जर भारत या स्पर्धेत सहभागी झाला आता तर त्याची कामगिरी कशी असती?

या संदर्भात दिवंगत फुटबॉल पत्रकार नोवी कपाडिया यांनी फुटबॉल वर्ल्डकपच्या गाईड बुकमध्ये लिहिलंय की, "त्याकाळात पॅराग्वेची टीम फारशी काही मजबूत नव्हती. दुसरीकडे इटलीने तिच्या सर्वोत्तम 8 खेळाडूंना अनुशासनहीनतेमुळे संघाच्या बाहेर ठेवलं होतं. टीमची अवस्थाच इतकी वाईट होती की, ब्राझीलमध्ये पोहोचल्यावर टीमचे कोच व्हिटोरियो पोझो यांनी राजीनामा दिला होता.

"पण स्वीडनची टीम मात्र भारताच्या तुलनेत उजवी होती. हे सगळं बघता भारत ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर असता आणि टीमला चांगल्या पद्धतीने एक्स्पोजरही मिळालं असतं."

1950 मध्ये भारतीय फुटबॉलची स्थिती

1950 च्या दशकात भारतीय फुटबॉल टीमला म्हणावं तसं इंटरनॅशनल एक्स्पोजर मिळालं नव्हतं,पण टीम चांगलं खेळते म्हणून तिची प्रतिष्ठा होती.

त्याची झलक 1948 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतही बघायला मिळाली होती. फ्रान्ससारख्या बलाढ्य संघाकडून भारत अवघ्या 1-2 अशा फरकाने हरला होता.

त्या काळात फॉरवर्ड आणि ड्रिबलरच्या खेळामुळे भारतीय टीमला फुटबॉलच्या जगात आपली ओळख निर्माण करण्यासाठी संधी निर्माण होत होती.

अहमद खान, एस रमन, एमए सत्तार आणि एस मेवालाल या खेळाडूंचे लोक फॅन होते.

विशेष म्हणजे लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी भारताचे हे सर्व खेळाडू अनवाणी आले होते. राईट बॅकवर खेळणारे ताज मोहम्मद फक्त बूट घालून खेळत होते.

ब्राझील वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ सहभागी झाला नाही कारण...

1950 मध्ये ब्राझीलमध्ये पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सहभागी का झाला नव्हता याचं कोणतंही स्पष्ट असं उत्तर नाहीये.

पण ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) दिलेल्या अधिकृत कारणानुसार टीमच्या निवडीत झालेला मतभेद आणि सरावासाठी मिळालेला अपुरा वेळ यामुळे संघाने माघार घेतली.

भारतीय टीम का सहभागी झाली नाही याच्या चर्चा वर्षानुवर्षे सुरूच राहिल्या. पण या चर्चेत एक चर्चा सगळ्यात जास्त होते ती म्हणजे भारतीय खेळाडूंना अनवाणी फुटबॉल खेळायचं होतं. पण फिफाला ते मान्य नव्हतं.

पण नोवी कपाडिया असो नाहीतर मग ज्येष्ठ क्रीडा पत्रकार जयदीप बसू यांनी त्यांच्या पुस्तकात या चर्चेला फारसं विश्वासार्ह मानलेलं नाही.

जयदीप बसू यांनी संपादित केलेल्या 'बॉक्स टू बॉक्स: 75 इयर्स ऑफ द इंडियन फुटबॉल टीम' या पुस्तकात लिहिलंय की, "भारतीय खेळाडूंच्या अनवाणी खेळण्यावर फिफाने आक्षेप घेण्याचा प्रश्नच नव्हता."

लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सात-आठ खेळाडूंचा हवाला देत जयदीप बसू लिहितात, "भारताच्या टीममधल्या सात-आठ खेळाडूंच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये स्पाइक बूट होते आणि ते त्यांनी घालावेत की नाही ही त्यांची पसंती होती."

तसं बघायला गेलं तर त्या काळात बऱ्यापैकी फुटबॉल प्लेअर्स पायावर जाड पट्टी बांधून खेळायचे. 1954 पर्यंत हा ट्रेंड जगातील बऱ्याच देशांमध्येही होता.

पैसे नव्हते हे कारण होतं का?

नियमांविषयी असलेलं अज्ञान

कदाचित भारताच्या फुटबॉल अधिकाऱ्यांना नियमांची माहिती नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं दिसतं.

खरं तर फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंना नंतर प्रोफेशनल खेळाडूंचा टॅग मिळायचा. प्रोफेशनल खेळाडू असल्यावर त्यांना ऑलिम्पिक किंवा आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळत नव्हती. यामागे कारण असं होतं की, त्याकाळी टूर्नामेंट मध्ये सहभागी असणारे खेळाडू हौशी असायचे.

पण या नियमांमधून पळवाटाही काढता येत होत्या. जसं की हंगेरी, रशिया या समाजवादी देशांचे खेळाडू वर्ल्डकप मध्ये सहभागी होताना ते लष्कराचे सदस्य आहेत असं सांगितलं जायचं आणि लष्करातल्या खेळाडूंना प्रोफेशनल खेळाडू मानत नसत.

पण भारतीय फुटबॉल अधिकाऱ्यांना बहुतेक याविषयी माहिती नसावी.

आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही या भीतीने कदाचित भारतीय संघाने 1950 च्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणं टाळलं असावं.

पण मग सहभागी न होणं म्हणजे एकप्रकारे घोडचूकच होती. कारण मागची 72 वर्षे आपल्याला या वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय क्रीडाप्रेमींच्या मनात याची सल कायम आहे.

दर चार वर्षांनी जेव्हा फुटबॉलच्या मॅचेस रंगतात तेव्हा तर आणखीनच दुःख होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)