क्रांतिसिंह नाना पाटलांच्या तालुक्यात EVM विरोधात ग्रामसभेत ठराव, मतदानावर बहिष्काराचा इशारा

बहे ग्रामस्थ इस्लामपूर तहसीलदारांसोबत
फोटो कॅप्शन, बहे ग्रामस्थांनी इस्लामपूर तहसीलदारांकडं एकमतानं मंजूर करण्यात आलेला ठराव सुपूर्द केला आहे.
    • Author, सरफराज सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"आमच्या गावातील कोणत्याही संस्थेच्या किंवा सार्वजनिक निवडणुकीत EVM मशीनचा वापर करू नये, आमच्या ग्रामसभेचा अपमान करून EVM मशीन लादली गेली, तर आम्ही बहिष्कार घालू."

सांगलीमधील वाळवा तालुक्यातील बहे ग्राम पंचायतीनं अशी ठाम भूमिका घेतली आहे.

या ठरावाची प्रत बहे ग्रामपंचायतीच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदारांकडे सुपूर्द देखील करण्यात आली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा तालुका म्हणून वाळवा तालुका क्रांतिभूमी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील बहे गावामध्ये EVMच्या विरोधात ठिणगी पडली आहे.

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ऐतिहासिक ठराव गावानं घेतला आहे.

इतकंच नव्हे तर सरकारनं याकडं दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा देखील ठराव संमत केलाय.

ग्रामसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलेला सदर ठराव हा इस्लामपूरच्या तहसीलदारांना देखील सुपूर्द करण्यात आला आहे.

'क्रांतिसिंह नाना पाटलांकडूनच मिळाला क्रांतीचा वारसा'

वाळवा तालुक्यातील बहे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जन्मगाव. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारनं ब्रिटिश राजवटीला सळो-की-पळो करून सोडलं होतं. ही या तालुक्याची ओळख मानली जाते.

त्यामुळे लोकशाहीच्या संवर्धनासाठी क्रांतिसिंह पाटलांकडून प्रेरणा घेऊन आपण EVM विरोधात पाऊल उचलले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

बहे गाव
फोटो कॅप्शन, बहे गाव

10 जानेवारी रोजी बहे गावच्या ग्रामपंचायतीनं ग्रामसभेमध्ये एकमतानं EVM वर मतदान घेऊ नये, असा ठराव 10 जानेवारी रोजी तहकूब झालेल्या ग्रामसभेत केला आहे.

बहे गावची लोकसंख्या 3 हजार 500 इतकी आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं एक सधन गाव म्हणून त्याची ओळख आहे.

शेती हा गावकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मारकडवाडी प्रकरणामुळे EVM विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय

मारकडवाडी या ठिकाणी EVM विरोधात निर्माण झालेले वातावरण, यामुळे गावानं देखील EVM विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.

यातूनच क्रांतिभूमीतल्या बहे गावात EVM विरोधात आवाज घुमू लागला आहे.

गावातील नागरिक सयाजी पाटील यांच्यासह काही जणांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी EVM विरोधात गावात जनजागृती सुरू केली.

बहे गावातील गावातील सयाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य
फोटो कॅप्शन, बहे गावातील गावातील सयाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी ईव्हीएम विरोधात गावात जनजागृती सुरू केली.

जवळपास 350 ग्रामस्थांनी सह्याच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवला. त्यानंतर ग्रामसभेमध्ये याबाबतचा ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

10 जानेवारी रोजी गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा पार पडली. या सभेमध्ये EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्याचा ठराव मांडण्यात आला.

याबाबत सयाजी पाटील यांनी म्हटलंय, आमच्या गावानं 10 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभा घेऊन EVM विरोधात ठराव केला आहे.

'अमेरिकेला जमतंय तर भारताला का नाही?'

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जगात अमेरिका, जपान या देशांत लोकशाही आहे. भारतात जगातील सगळ्यांत मोठी लोकशाही आहे.

अमेरिकेची नुकतीच निवडणूक पार पडली या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलं. तिथं एक महिना मतदानाची प्रक्रिया सुरू होती.

मग अमेरिका जर बॅलेट पेपरवर मतदान घेते, तर मग भारत का बॅलेट पेपर वर मतदान घेऊ शकत नाही ? आज चंद्रावर सोडलेले यान इथे बसवून वळवू शकतो, मग EVM मशीन हॅक होऊ शकत नाही का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे इथून पुढं येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी एक ग्रामस्थ व भारताचा नागरिक म्हणून केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिका जर बॅलेट पेपरवर मतदान घेते, तर मग भारत का बॅलेट पेपर वर मतदान घेऊ शकत नाही ?

पुढं ते सांगतात की, यासाठी गावात EVM बाबत जागृती करण्यात आली. ज्यातून गावातील 300 लोकांच्या सह्यांचं निवेदन सरपंच संतोष दमामे यांना देऊन विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं.

ज्यामध्ये EVM विरोधात ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. ज्याला आपण अनुमोदन दिल्याचं सयाजी पाटील पुढं सांगतात.

EVM ठरावाचे सूचक असणारे उमेश शेवाळे यांनी म्हटलंय, "देशातली लोकशाही आणि संविधान अबाधित रहावा, या उद्देशानं बहे ग्रामस्थांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे."

बहे ग्रामपंचायत कार्यालय
फोटो कॅप्शन, गावातील 300 लोकांच्या सह्यांचं निवेदन सरपंच संतोष दमामे यांना देऊन विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

शेवाळे सांगतात, "गावच्या ग्रामसभेत EVMच्या विरोधात तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ज्याला ग्रामस्थांनी एकमतानं पाठिंबा दिला आहे."

"आज जगातल्या अनेक प्रगत देशांमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जातं. देशात गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला जातोय. EVMमध्ये छेडछाड होण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलंय."

"त्यामुळे EVM वर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना EVMचा अट्टाहास कशासाठी हवा आहे?" असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. हे लोकशाहीचा राज्य असेल तर लोकशाही पद्धतीनं केलेल्या मागणीनुसार बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे," असं मत उमेश शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

ते सांगतात, "बहे ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार ठराव देखील करण्यात आला आहे. तो ठराव प्रशासनाकडं सादर देखील केला आहे. सरकारच्या निर्णयाची आता आम्ही वाट बघत आहोत."

असा आहे ठराव

जगभरातील अनेक विकसित देशांनी EVM नाकारून परत बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला सुरुवात केली आहे.

यामध्ये जपान, अमेरिका, स्वित्झर्लंड या देशाचा समावेश आहे. म्हणून आम्ही बहे गावचे नागरिक संविधानानं आम्हाला दिलेल्या हक्काला अनुसरून ग्रामसभेत ठराव करतो की, इथून पुढं आमच्या गावातील कोणतीही संस्थेची व सार्वत्रिक निवडणुकीत EVM मशीनचा वापर करणार नाही.

आमच्या ग्रामसभेचा अपमान करून आमच्यावर EVM मशीन लादलं गेले तर आम्ही त्या निवडणुकीवर बहिष्कार घालू याची नोंद घ्यावी.

सर्व ग्रामस्थांनी एकमतानं मंजूर करण्यात आलेल्या सदर ठरावास सयाजी अशोकराव पाटील यांनी अनुमोदन दिलं व त्यास ह्या सभेत सर्वानुमते मान्यता व मंजुरी दिल्याचा ठराव पारित करण्यात आला आहे.

बहे गावच्या नागरिकांनी एकमतानं मंजूर केलेल्या ठरावाची प्रत.
फोटो कॅप्शन, बहे गावच्या नागरिकांनी एकमतानं मंजूर केलेला ठराव.

बहे गावानं केलेला हा ठराव इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडं 22 जानेवारी 2025 रोजी सुपूर्द करण्यात आला.

हा ठराव देताना सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे की यापुढं गावात होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवरच घ्याव्यात. अन्यथा EVMच्या मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर-वाळवा मतदारसंघात हे गाव आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, यावेळच्या निवडणुकीत जयंत पाटलांचं अतिशय कमी मताधिक्यानं विजय झाला होता.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील हे सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

मात्र यंदाचा त्यांचा विजय हा जयंत पाटलांनाच नव्हे, तर वाळवा तालुक्यातल्या अनेकांना धक्का बसला. कारण यावेळच्या निवडणुकीत ते केवळ 13,000 मताधिक्यानं विजयी झाले आहेत.

आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये 50 हजार पासून ते लाखांपर्यंत जयंत पाटलांना मताधिक्य मिळत असायचं.

यावेळी इतकं कमी मताधिक्य मिळाल्यामुळे जयंत पाटलांची आजही गावागावांत चर्चा सुरू आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.