येत्या 5 वर्षांत देश सर्वोत्तम अर्थव्यवस्थांमध्ये असेल - नरेंद्र मोदी

Doordarshan

फोटो स्रोत, Doordarshan

"मणिपूर आणि भारताच्या काही भागांत हिंसेचं लोण पसरलं होतं. काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र काही दिवस आता शांततेच्या बातम्या येत आहेत. देश मणिपूरच्या लोकांबरोबर आहे."

"हे शांततेचं पर्व सुरू राहावं. राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहील", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला तत्पूर्वी सकाळी साडेसातवाजता त्यांनी दिल्लीमधील लाल किल्ल्याच्या प्रांगणात ध्वजारोहण केले.

नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, इतिहासाकडे पाहिलं तर काही गोष्टी अमीट छाप सोडतात,. त्याचा प्रभाव अनेक वर्षं राहातो. सुरुवातीस त्या घटना लहान वाटतात. 1000-1200 वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झालं. मात्र पण एक घटना भारताला गुलामगिरीत ढकलेल असं वाटलं नव्हतं. जो येईल तो भारताला लुटत गेला. तो अत्यंत वाईट काळ होता.

आपल्या भाषणाची, "माझ्या 140 कोटी कुटुंबीयांनो जगातली सर्वात मोठी लोकशाही", अशी सुरुवात पंतप्रधानांनी केली.

"मी देशातल्या कोट्यवधी लोकांना आणि भारतावर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या भरपूर शुभेच्छा देतो. ज्य़ा लोकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांना मी नमन करतो," असंही पंतप्रधानांनी म्हटलं.

स्वामी दयानंद सरस्वती आणि गुरू अरविंद यांचंही स्मरण त्यांनी केलं.

modi

फोटो स्रोत, ANI

"आज याचा उल्लेख करत आहे कारण भारताच्या वीरांनी या काळात स्वातंत्र्याची कल्पना जागृत ठेवली, भारतमाता या बेड्या तोडून टाकायला प्रयत्न करत होती. सर्वांनी हे स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी प्रयत्न करत राहिले.

अनेक महापुरुषांनी ही गुलामीची बेडी काढण्यासाठी प्रयत्न केले. 1947मध्ये ती संधी आली आणि देश स्वतंंत्र झाला. देशातल्या लोकांनी 1000 वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं.

पुन्हा एकदा आता देशासमोर संधी आली आहे. आताच्या काळात भारताच्या अमृतकाळात आपण सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय या धोरणानुसार निर्णय करू, आणि येत्या 1000 वर्षांत हा इतिहास सुवर्णाक्षरांत लिहिला जाईल," असं पंतप्रधानांनी म्हटलं.

'देश जगातील टॉप अर्थव्यवस्थांमध्ये असेल'

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

येणाऱ्या 5 वर्षांत भारत सर्वोत्तम अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

मजुरवर्गाला नवी ताकद देण्यासाठी येत्या महिन्या येणाऱ्या विश्वकर्मा जयंतीला विश्वकर्मा योजना सुरू करू आणि तिची सुरुवात 13 हजार कोटींनी होईल, असं त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आम्ही 2.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट दिले आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत आम्ही 70 हजार कोटी रुपये दिले आहे. कोरोना लशीसाठी 40 हजार कोटी दिले, पशुधन वाचवण्यासाठी आम्ही 15 हजार कोटी दिले.

त्यांच्या लसीकरणासाठी आम्ही हे पैसे दिले. जनऔषधी केंद्रांनी देशातल्या मध्यमवर्गातील कुटुंबा ताकद दिली. आज देशात 1 हजाराहून अधिक जनऔषधी केंद्र आहेत. त्यामुळे मध्यमवर्गाचे 2 हजार कोटी रुपये वाचत आहेत.जे लोक शहरात घरं बांधत आहेत त्यांना आम्ही व्याजात सवलत देणार आहोत."

अर्थव्यवस्थेचा विचार करता आपण 10 वरुन 5 व्या क्रमांकावर आलो आहोत. हे असंच झालेलं नाही. जेव्हा भ्रष्टाचाराच्या राक्षसानं देशाला वेढा दिला होता तेव्हा आम्ही त्याला रोखलं आणि मजबूत अर्थव्यवस्था तयार केली. आम्ही गरीबांच्या कल्याणासाठी जास्त पैसे खर्च केले. जेव्हा देश आर्थिक रुपात मजबूत असतो तेव्हा तिजोरी भरत नसते तर देशाचं सामर्थ्य् वाढत असतं.

मी 10 वर्षांचा हिशेब या तिरंग्याला साक्षी ठेवून नागरिकांना देत आहे. हा मोठा बदल कसा झाला असं तुम्हाला वाटू शकतं.

10 वर्षांपुर्वी राज्य सरकारला 30 लाख कोटी मिळायचे ते आम्ही वाढवून 100 लाख कोटींवर नेले आहेत. स्थानिक विकासासाठी 70 हजार कोटी दिले जायचे आता आम्ही ते 3 लाख कोटींवर नेले आहे. आज गरीबांच्या घरांवर सरकार चौपट पैसे खर्च करत आहे. गरीबांच्या घरनिर्मितीसाठी 90 हजार कोटी खर्च व्हायचे आता 4 लाख कोटी खर्च होतात.

पंतप्रधान म्हणाले, आज जग तंत्रज्ञानाद्वारे चालवलं जात आहे. येणारं युग तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली असेल. भारताची यात महत्त्वाची भूमिका असेल.

त्यांनी म्हटलं, मी जी 20 साठी बालीला गेलो होते. तिथं प्रत्येकजण तंत्रज्ञानाचा विचार करत होतं. मी त्यांना सांगितलं तंत्रज्ञान हे मोठ्या शहरांपुरतं मर्यादित नाही तर लहान शहरांती तरुणही इतिहास निर्माण करत आहे. आमच्या लहान शहरांचा आकार कमी असेल मात्र आशा-आकांज्ञाची इथं कमतरता नाही. नवी अँप्स, नवी सोल्यूशन्स आणि नवी यंत्र बनवली जात आहेत.

झोपडपट्टीतली मुलंही जगाला कमाल करुन दाखवत आहेत. भारतातील 100 शाळांमधील मुलं उपग्रह तयार करुन ते प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे. संधीची कमतरता नाही हे मी तरुणांना सांगू इच्छितो. तुम्हाला जितकी संधी हवी आहे त्यापेक्षा जास्त संधी मिळण्यास आपण सक्षम आहोत.

‘आम्ही नवी संसद तयार केली’

देशाच्या नव्या संसदेचा उल्लेख करुन ते म्हणाले, 25 वर्षांपासून देशात नवी संसद हवी असल्याची चर्चा होती मात्र त्यादृष्टिने काम होत नव्हतं. आम्ही वेळेच्या आधीच संसद बांधून पूर्ण केली. हा नवा भारत आहे. संकल्प पूर्ण करणारा भारत आहे. यामुळेत हा भारत थांबत नाही, थकत नाही, धापा टाकत नाही आणि पराभूत होत नाही.

ते म्हणाले, देशातील दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत पूर्वी सतत इथं स्फोट झाला, तिथं स्फोट झाला असं आम्ही ऐकत होतो. आता देशात संरक्षित वातावरणाचा अनुभव घेतला जातोय. जेव्हा संरक्षण होतं तेव्हा प्रगती होते. साखळीस्फोटाचे दिवस गेले. आता देशात दहशतवादी घटना कमी झाल्यात, नक्षलबाधित प्रदेशात बदल झालाय.

'तुम्ही स्थिर सरकार दिलं, म्हणून मी रिफॉर्म करू शकलो'

आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी म्हणाले, 2014 साली माझ्या देशातल्या लोकांनी आता स्थिर सरकार पाहिजे असा विचार केला आणि 3 दशकांनंतर राजकीय अस्थैर्याने जखडलेल्या देशाला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. देशात मोठ्या पातळीवर काम होत आहे.

2014 साली तुम्ही मजबूत सरकार तयार केलंत म्हणूनच सुधारणा करण्याची हिंमत आमच्यामध्ये आली. नोकरशाहीनेही बदलाला स्वीकारुन काम करुन दाखवलं, जनतेशी गोष्टी जुळलेल्या असल्या तर बदल दिसून येतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

वेगवेगळ्या व्यवसायातील 1800 लोकांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यात परिचारिका, सरपंच, शेतकरी, मासेमारी करणाऱ्या लोकांना लोकसहभागाच्या कार्यक्रमांतर्गत विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.

सरकारने हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत लोकांना आपल्या घरांवर झेंडा फडकवण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्याशिवाय पंतप्रधानांनी लोकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपले प्रोफाइल फोटो बदलण्यासाठीही प्रोत्साहन दिले आहे.

हा कार्यक्रम कडक संरक्षणव्यवस्थेत आयोजित केला जात आहे. 1000 कॅमेरे, ड्रोनविरोधी यंत्रणा आणि 10000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)