IPL 2024 : ऋतुराज गायकवाडचा कॅप्टन्स नॉक, चेन्नई सुपर किंग्ससाठी खणखणीत शतक

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जच्या कप्तानपदी, धोनीने सोडलं पद

फोटो स्रोत, Getty Images

पुण्याच्या ऋतुराज गायकवाडनं आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना शतक ठोकलं.

23 एप्रिलला ऋतुराजनं लखनौ सुपर जायंट्‌सविरुद्‌धच्या सामन्यात ऋतुराजनं 60 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 108 रन्सची खेळी केली.

यंदाच्या आयपीएलमध्ये शतक ठोकणारा ऋतुराज आठवा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे तो यावेळी चेन्नईचं कर्णधारपदही सांभाळतो आहे.

महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे कप्तानपद सोडल्यावर, त्याच्याजागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली आहे.

ऋतुराज गायकवाड 2019 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. त्याने आयपीएलच्या 14व्या हंगामात सर्वाधिक धावांसाठीच्या ऑरेंज कॅपवर नाव कोरलं होतं.

धोनीसोबतचा 'तो' किस्सा

रणजी ट्रॉफीचा तो सामना ऋतुराजच्या चांगलाच लक्षात आहे. 2015-16 रणजी हंगामात महाराष्ट्राची झारखंडविरुद्ध दिल्ली इथे मॅच होती. झारखंड संघाचा मेन्टॉर म्हणून दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनी होता.

धोनीसमोर चांगलं खेळण्याचा ऋतुराजचा इरादा होता. मात्र या प्रयत्नात झारखंडच्या वरुण आरोनचा उसळता चेंडू ऋतुराजच्या बोटावर जाऊन आदळला. महाराष्ट्राचा अनुभवी खेळाडू केदार जाधवने ऋतुराजला खेळता येतंय का बघ, असं सांगितलं.

ऋतुराजने दुखऱ्या बोटासह बॅटिंग करायचा प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळानंतर दुखणं वाढलं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज बाद झाला. त्यानंतर जे घडलं ते ऋतुराज विसरू शकणार नाही.

लंचवेळी महेंद्रसिंग धोनीने ऋतुराजच्या दुखापतीविषयी विचारायला आला. धोनीने ऋतुराजच्या बॅटवर ऑटोग्राफ दिला आणि त्याच्या बोटाला लावण्यात आलेल्या प्लॅस्टरवर 'गेट वेल सून' संदेश लिहिला.

2019मध्ये चेन्नईने 20 लाख रुपये या बेस प्राईजला ऋतुराजला ताफ्यात समाविष्ट केलं. महेंद्रसिंग धोनीची भेट झाल्यानंतर ऋतुराजने त्या भेटीविषयी विचारलं- त्यावर धोनी म्हणाला, "मला अगदी स्पष्ट आठवतंय. तू प्रतिभावान खेळाडू आहेस, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा करत राहा".

भारतीय क्रिकेटच्या आधुनिक शिलेदारांपैकी एक अशा महेंद्रसिंग धोनीने लक्षात ठेवलेला ऋतुराज आता जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या पसंतीचा होऊ लागला आहे.

सरळ बॅटने फटके खेळण्याची शैली, पारंपरिक वाटेल अशा पद्धतीने इनिंग्जची बांधणी, हवेत चेंडू मारण्याऐवजी खणखणीत ग्राऊंडस्ट्रोक, भागीदाऱ्या करण्याची हातोटी, चपळ क्षेत्ररक्षक, यश साजरा करतानाही शांत असं सेलिब्रेशन यामुळे ऋतुराज आता क्रिकेटरसिकांचा आवडता होऊ लागला आहे.

ऋतुराज कुठे घडला?

ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. पण ऋतुराज पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे.

मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. 2018-19 सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या.

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जच्या कप्तानपदी, धोनीने सोडलं पद

फोटो स्रोत, Getty Images

इंडिया 'ए' साठी खेळतानाही वेस्ट इंडिज ए विरुद्ध ऋतुराजने चार मॅचेसमध्ये 207 रन्स केल्या होत्या. श्रीलंका ए संघाविरुद्धच्या मालिकेतही 470 रन्स केल्या होत्या.

2019 मध्ये इंडिया ए साठी खेळताना ऋतुराजने श्रीलंका ए आणि वेस्ट इंडिज ए विरुद्ध खेळताना 187*, 125*, 94, 84, 74, 3, 85, 20, 99 अशा खेळी केल्या.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 7 मॅचेसमध्ये 63.42च्या सरासरीने 444 रन्स केल्या होत्या.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात

2019 हंगामात कोरोनामुळे आयपीएलचा हंगाम युएईत खेळवण्यात आला. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो प्रदीर्घ काळ खेळू शकला नाही.

कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्यानंतर ऋतुराजला क्वारंटीन राहावं लागलं. मात्र संघातील प्रत्येकाने सकारात्मक राहायला मदत केली असं ऋतुराजने सांगितलं होतं.

पदार्पण आणि तीन अर्धशतकं

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 22 सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले.

तरुणांनी चमक दाखवली नाही असं महेंद्रसिंग धोनी काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत तो चेन्नईच्या भविष्यातील योजनांचा भाग असू शकतो याचे संकेत दिले.

0, 5, 0 अशी खराब सुरुवात झालेल्या ऋतुराजवर टीकाही झाली होती. मात्र सलग तीन मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

2020 हंगामात ऋतुराजने 6 सामन्यात 51च्या सरासरीने 204 धावा केल्या.

भारतासाठी पदार्पण

प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना पर्यायी भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता.

ऋतुराजचा या भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. 28 जुलै रोजी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 लढतीत ऋतुराजला भारतीय संघाची कॅप देण्यात आली.

ऋतुराजने पदार्पणाच्या लढतीत 21 तर दुसऱ्या सामन्यात 14 धावांची खेळी केली.

'बोलत नाही त्यामुळे होते अडचण'

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2020 हंगामावेळी ऋतुराजबद्दल भाष्य केलं होतं. "ऋतुराजला आम्ही नेट्समध्ये खेळताना पाहिलं. मात्र त्यानंतर त्याला कोव्हिड झाला. 20 दिवस त्याला क्वारंटाईन व्हावं लागलं. हे खूपच दुर्देवी होतं. उर्वरित सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली. त्याच्यासाठी हा हंगाम संस्मरणीय असेल.

"ऋतुराज अतिशय प्रतिभावान अशा खेळाडूंपैकी एक आहे. परंतु तो मितभाषी आहे. त्यामुळे त्याला समजून घेणं काही वेळेस संघव्यवस्थापनाला अवघड होतं. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तो किती सर्वांगीण खेळू शकतो हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे."