नेपाळमधल्या विमान दुर्घटनेत ठाणेकर कुटुंबीय मृत्यूमुखी

नेपाळमध्ये रविवारी (29 मे 2022 ) सकाळी बेपत्ता झालेल्या 'तारा एअर'च्या विमानाचा शोध लागला आहे. 'या विमानात 22 लोक प्रवास करत होते, त्यात चौघा भारतीयांचाही समावेश आहे. तसंच यातले 4 जण जपानी नागरिक होते.

या विमानातील 22 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्सही आढळला आहे. तो बेस स्टेशनला आणण्यात येणार आहे अशी माहिती रेस्क्यू अधिकाऱ्यांनी दिली. नेपाळ विमान प्राधिकरणाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तारा एअरने सर्व मृतांची नावं जाहीर केली आहेत. भारतीय नागरिकांमध्ये ठाण्याच्या कुटुंबाचा समावेश आहे. वैभवी बांदेकर, अशोक त्रिपाठी, धनुश त्रिपाठी, रितिका त्रिपाठी अशी भारतीय प्रवाशांची नावं आहेत.

ठाण्यातील माजिवाडा भागातील रुस्तमजी अथेना इमारतीत वैभवी, त्यांचा मुलगा धनुष (22) मुलगी रितिका (15) आणि वृ़द्ध आईसोबत रहातात. वैभवी आणि त्यांचे पती अशोक त्रिपाठींचा घटस्फोट झाला होता.

घटस्फोटानंतर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हे कुटुंब 10 दिवस एकत्र वेळ घालवतं. दरवर्षी ते फिरायला जातात.

वैभवी बांदेकर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पेक्समध्ये खासगी कंपनीत नोकरीला होत्या तर, अशोक त्रिपाठींचा भुवनेश्वरमध्ये व्यवसाय आहे. धनुष आणि रितिका शिकत आहेत.

15 नेपाळी सैनिकांची एक टीम जिथे विमान क्रॅश झालंय तिथे उतरली होती. हे सैनिक बळींचे मृतदेह मिळवण्याचे प्रयत्न केलं. जिथे विमान कोसळलं ती जागा 14,500 फुटांवर आहे तर या टीमला 11,000 फुट उंचीवर उतरवलं आहे अशी माहिती नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करून दिली होती.

हे एक 9 NAET ट्विन इंजिन प्रकारचं छोटं प्रवासी विमान होतं. या विमानानं पोखरा येथून जॉमसमला जाण्यासाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण भरलं.

पण, 10.11 मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती जॉमसम एयरपोर्टचे कर्मचारी पुष्कल राज शर्मा यांनी बीबीसीला दिली. विमानाशी संपर्क तुटला, तेव्हा ते धौलागिरी परिसरात होतं, तसंच त्याचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं, अशी माहितीही पुष्कल यांनी दिली.

खराब हवामानामुळे आधी शोधमोहिमेवर गेलेलं नेपाळी लष्कराचं हेलिकॉप्टर मागे फिरलं. दुपारी पुन्हा शोध घेण्यात आला. तेव्हा नेपाळमधील मुस्तांगच्या कोवांग परिसरात जमिनीवर हे विमान आढळून आल्याची माहिती काठमांडूतील त्रिभुवन इंटरनॅशनल एयरपोर्टच्या प्रमुखांनी दिल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

नेपाळी लष्कराला स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, लामचे नदीच्या मुखाजवळ हे विमान कोसळलं आहे. लष्कराची टीम घटनास्थळाकडे निघाल्याची माहिती नेपाळी लष्कराचे प्रवक्ता नारायण सिलवाल यांनी दिली आहे.

नेपाळमधल्या भारतीय दूतावासाचे अधिकारी या विमानातून प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचं दूतावासानं ट्विटरवर म्हटलं आहे.

फ्लाईटरडार या वेबसाईटच्या माहितीनुसार या विमानानं पहिलं उड्डाण एप्रिल 1979 मध्ये भरलं होतं.

नेमकं या विमानाच्या बाबतीत काय झालं असावं, याविषयी ठोस माहिती अजून उपलब्ध नाही. पण स्थानिक वृत्तानुसार पोखरा-जॉमसम परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं.

हिमालयातला देश असलेल्या नेपाळमध्ये हवाई वाहतूक नेहमीच आव्हानात्मक असते. इथला लुकला विमानतळ जगातल्या सर्वांत धोकादायक विमानतळापैंकी एक मानला जातो. याआधीही नेपाळच्या पर्वतराजींत मोठे अपघात झाले होते.

2018 साली यूएस-बांग्ला एयरलाईनच्या विमानानं काठमांडूमध्ये उतरताच पेट घेतला होता आणि त्या अपघातात 51 जणांचा मृत्यू झाला होता.

1992 साली पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्सच्या विमानाची एका पर्वतशिखराशी टक्कर झाली होती आणि विमानातील सर्व 167 जणांचा मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)