You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिंदू राष्ट्रवादाच्या प्रश्नावर बोरिस जॉन्सन काय म्हणाले?
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्विपक्षीय वार्तालाप केला आणि त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली.
त्यादरम्यान त्यांना भारतात वाढत्या हिंदू राष्ट्रवाद आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, "भारत एक महान लोकशाही असलेला देश आहे. इथल्या लोकांकडे घटनात्मक अधिकार आहेत".
ते म्हणाले, "आम्ही मानवी हक्क आणि लोकशाही मूल्यांबद्दल नेहमीच चर्चा करतोय. आमच्या मैत्रीचा फायदा असा आहे की आम्ही अशी चर्चा करू शकतो."
"भारतात सगळ्या समुदायांसाठी घटनात्मक संरक्षण आहे. भारत जगातल्या इतर भागातल्या निरंकुश देशांपेक्षा वेगळा आहे. भारत एक महान लोकशाही असलेला देश आहे. इथे 135 कोटी लोक राहतात आणि त्याचा सन्मान व्हायला हवा"
मोदी यांनी अनेकदा युक्रेनच्या मुद्द्यावर पुतिन यांना प्रश्न विचारले.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की युक्रेनमध्ये शांतता नांदावी यासाठी भारत प्रयत्न करत आहेत आणि भारताला असं वाटतं की युक्रेन यातून बाहेर निघायला हवा.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बोरिस जॉन्सन यांनी व्यापक चर्चा केली. पत्रकार परिषदेत बोलताना जॉन्सन म्हणाले की बुचा मध्ये जे झालं त्याबद्दल मोदींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारत आणि रशिया या देशांमधल्या संबंधांची संपूर्ण जगाला कल्पना आहे.
मोदी यांनी आपला प्रभाव वापरून रशियाला युद्ध थांबवण्यास सांगितलं का या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.
जॉन्सन यांनी घोषणा केली कीव्ह येथील दूतावास पुढच्या आठवड्यात उघडेल आणि रशियाचं जे काही सुरू आहे त्यावर इंग्लंड शांत बसणार नाही.
रशिया कुठे आहे, त्याचं काय चाललंय आणि याचा परिणाम काय होईल हे पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अनेकदा विचारलं आहे.
जॉन्सन म्हणाले, "भारताला युक्रेनमध्ये शांतता हवी आहे आणि रशियाने युक्रेनमधून बाहेर पडावं असं भारताला वाटतंय. मी त्याच्याशी पूर्ण सहमत आहे."
ते म्हणाले की जगातल्या वेगवेगळ्या आव्हानांबाबत भारत आणि ब्रिटनमध्ये योग्य ताळमेळ आहे. त्यात भारत आणि रशियाचे संबंध ऐतिहासिक आहेत आणि ते बदलणार नाही.
दोन्ही नेत्यांनी दिलं संयुक्त निवेदन
भारताची रशियाबाबत काय भूमिका आहे यावरून पाश्चिमात्य देशात अस्वस्थता आहे. त्या पार्श्वभूमीवर बोरिस यांचा दौरा संपन्न झाला आहे.
युक्रेनमध्ये जे काही होतंय त्याबद्दल रशियावर थेट टीका करणं भारत टाळतोय तसंच रशियाकडून तेलही खरेदी करत आहे.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात मोदी यांनी युक्रेनचा प्रश्न चर्चेने सोडवणार असल्याची माहिती दिली आहे.
मोदी म्हणतात, "युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम व्हावा म्हणून आम्ही चर्चेवर आणि कुटनीतिवर भर दिला. सर्व देशात सार्वभौम आणि अखंड रहावे याचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत."
या निवेदनात दोन्ही देशांच्या नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
"या देशात होत असलेल्या मृत्यूबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे शत्रुत्व शांततेत संपावं यासाठी साससेत्या मार्गाने जायला हवं याचा पुनरुच्चार केला. या युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषत: विकसनशील देशांवर."
सध्या अस्तित्वात असलेलं जग संयुक्त राष्ट्राचं चार्टर, आंतरराष्ट्रीय कायदा आणि देशाच्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्त्वावर अवलंबून आहे. युक्रेनमध्ये मदत करायला हवी यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)