You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Climate Change : हवामान बदल म्हणजे काय? त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होतायत?
माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत.
जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.
वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे.
हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय?
एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच क्लायमेट चेंज - हवामान बदल.
माणसाद्वारे घरी, फॅक्टरी आणि वाहतुकीसाठी केला जाणाऱ्या तेल, गॅस आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानत झपाट्याने बदल होत आहेत.
जैवइंधन ज्यावेळी जाळलं जातं, त्यावेळी त्यातून ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतं. यात कार्बन डाय ऑक्साईड (CO2)चं प्रमाण जास्त आहे. या वायूंमुळे सूर्याकडून आलेली उष्णता अडकून राहते आणि त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढतं.
19व्या शतकाच्या तुलने आता जगभरातलं तापमान 1.2 सेल्सिअसने वाढलेलं आहे. तर वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलंय.
हवामान बदलाचे विपरित परिणाम होणं टाळायचं असेल तर जगाचं तापमान वाढण्यापासून रोखणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. 2100 पर्यंत ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण 1.5 सेल्शियसपर्यंत रोखणं गरजेचं आहे.
पण जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचं तापमान 2 अंशांनी वाढण्याची भीती आहे.
काहीही केलं नाही तर पृथ्वीचं तापमान 4 सेल्सियसने वाढेल आणि परिणामी विनाशकारी उष्णतेची लाट येईल, समुद्राची पातळी वाढल्याने लाखो लोकांची घरं जातील आणि पृथ्वी ग्रहाचं आणि यावरच्या जैवसृष्टीचं भरून न येणारं नुकसान होईल.
हवामान बदलाचे परिणाम काय?
हवामानात होणाऱ्या टोकाच्या बदलांचे परिणाम पहायला मिळत आहेत. यामुळे अनेक आयुष्य आणि रोजीरोटी धोक्यात आलेली आहे.
हवामान बदलामुळं आपली (मानवाची) जीवनशैली बदलू शकते. सुपीक जमिनीचं रेताड जमिनीत रूपांतर होईल. पाण्याच्या कमतरतेुमळं पिकं, अन्न उगवणं देखील कठीण होईल.
समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळं काही भागांत प्रचंड उष्णता वाढेल, आणि ते ठिकाण निवास करण्यास योग्य राहणार नाहीत. चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्समध्ये आलेल्या पुरामध्ये हे पहायला मिळालं.
हवामानात टोकाचे बदल जाणवतील. उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळं हे सर्व वारंवार होईल, त्याचं प्रमाणही वाढत जाऊन मानवी जीवनासाठी ते धोकादायक ठरेल.
गरीब देशांतील लोक ज्यांना याच्याशी जुळून घेणं सर्वाधिक कठीण ठरेल त्यांना सर्वाधिक त्रास होईल.
वातावरणावर हवामान बदलाचे परिणाम
ध्रुवावरील बर्फ आणि हिमनद्या वेगानं वितळत आहेत. त्यामुळं समुद्राची पातळी वाढत असलेल्या सखल किनारी भागांमध्ये पुराचा धोका वाढला आहे.
सायबेरिया सारख्या ठिकाणी पर्माफ्रॉस्टसारखी ठिकाणं वितळतील. आपल्या वातावरणात सोडला जाणारा मिथेन हा आणखी एक हरितगृह वायूदेखील हवामान बदलाची तीव्रता अधिक वाढवत आहे.
जंगलात आगी लागण्याच्या, वणवे पेटण्याच्या घटनांसाठी अनुकुल असं हवामान अधिक प्रमाणात तयार होईल.
निसर्गावरचे हवामान बदलाचे परिणाम
निवासस्थानं बदलत असल्यानं काही प्रजाती या नव्या ठिकाणी स्थलांतरीत होतील.
मात्र हवामान बदल एवढ्या झपाट्यानं होत आहे, की त्यापैकी अनेक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
ध्रुवीय अस्वलं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण ते अवलंबून असलेल बर्फच वितळू लागला आहे.
अटलांटिक साल्मन नदीच्या पाण्यात नष्ट होऊ शकतात. नदीच्या पाण्याचं तापमान वाढल्यानं त्यांच्यावर परिणाम होईल.
समुद्र अधिक प्रमाणात कार्बव डायऑक्साईड शोषत असून त्यामुळं पाण्यात अॅसिडचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं Tropical coral reefs सारखे सागरी जीव नष्ट होतील.
COP27
गेल्या काही काळापासून तुमच्या वाचनामध्ये COP27 हे नाव आलं असेल. COP27 हे एका परिषदेचं नाव असून ही परिषद इजिप्तमध्ये 6 ते 18 नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ही संयुक्त राष्ट्राची पर्यावरण परिषद आहे.
जगभरातील विविध देशांचे नेते या परिषदेत एकत्र येऊन हवामान बदल आणि तापमान वाढीवर चर्चा करणार असून सध्या जगासमोर असलेल्या प्रश्नांवर उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतील.
2022 United Nations Climate Change Conference असे या परिषदेचे पूर्ण नाव आहे. तर COP चा अर्थ 'कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज' (सहभागी देशांची परिषद) असा आहे.
हवामान बदलाची कारणं काय?
हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत.
मात्र आता, विविध मानवी घडामोडींमुळं जागतिक तापमानात वाढ होत आहे.
वीज प्रकल्प, वाहतूक आणि घरांमध्ये उष्णता वाढवण्यासाठी आपण इंधन, गॅस आणि कोळसा वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमान वाढलं आहे.
त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळं हवेत सोडले जाणारे वायू हे, सूर्याची ऊर्जा अडवतात.
19 व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड (CO2) या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12 टक्के वाढ झाली आहे.
हरितगृह वायुंचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड.
झाडं जेव्हा जाळली किंवा तोडली जातात, तेव्हा ते साठवलेला कार्बन वातावरणात सोडत असतात.
भविष्यात काय होणार?
शास्त्रज्ञांनी हवामान बदलासाठी 1.5 सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ ही मर्यादा ठरवली आहे. एवढी वाढ सुरक्षित असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जर तापमान अधिक वाढत गेलं, तर नैसर्गिक वातावरणाला पोहोचणाऱ्या हानीमुळं मानवी जीवनशैलीवरही परिणाम होऊ शकतो.
अनेक शास्त्रज्ञांच्या मते, असं घडू शकतं. शतकाच्या अखेरीपर्यंत वातावरणातील तापमानाची वाढ 3 अंशापर्यंत असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जगभरात हवामान बदलाचे काय परिणाम होतील?
- प्रचंड पावसाच्या परिस्थितीमुळे इंग्लंडमध्ये पूरपरिस्थिती आवाक्याबाहेर जाईल.
- पॅसिफिक क्षेत्रातील सखल भागात असलेले बेटांवरील काही देश पाण्याखाली किंवा समुद्राखाली जाऊ शकतात.
- आफ्रिकेतील बहुतांश देशांमध्ये दुष्काळ आणि अन्नाच्या तुटवड्याची समस्या निर्माण होऊ शकते.
- उत्तर अमेरिकेतही दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. तशीच स्थिती पश्चिम अमेरिकेतही असेल. तर इतर भागांत पावसाचं प्रमाण वाढेल आणि वादळांचं प्रमाण वाढेल.
- ऑस्ट्रेलियात तीव्र दुष्काळ आणि प्रचंड उष्णता अशा समस्या उद्भवतील.
जगभरातली सरकारं काय करत आहे?
हवामान बदलाचं आव्हान सगळ्यांनी एकत्र येऊन हाताळता येईल, यावर जगभरातल्या देशांचं एकमत झालेलं आहे. पॅरिसमध्ये 2015 झालेल्या महत्त्वाच्या कराराद्वारे ग्लोबल वॉर्मिंग 1.5 सेल्शियसपर्यंत रोखण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं.
नोव्हेंबर 2021 मध्ये युकेमध्ये जगभरातल्या देशाच्यां नेत्यांची ग्लासगो क्लायमेट कॉन्फरन्स होत असून यामध्ये जगभरातले देश 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी कसं करायचं यासाठीची आखणी करतील.
या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 2050 पर्यंत हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याचं विविध देशांना लक्ष्य ठेवलं आहे.
म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वायू उत्सर्जनाच्या प्रमाणात ते वायू शोषले जातील असं समतोल राखला जाईल, अशा उपाययोजना केल्या जातील. उदाहरण द्यायचं झाल्यास, झाडं लावून हे प्रमाण कमी केलं जाईल.
या माध्यमातून तापमानात झपाट्यानं होणारी वाढ थांबवून, हवामान बदलाचे गंभीर दुष्परिणाम टाळता येऊ शकतील.
शास्त्रज्ञ काय करत आहेत?
हवामान बदलाबाबतचा शास्त्रज्ञांचा अभ्यास वाढला असून त्यात आणखी वाढ होत आहे.
उदाहरण द्यायचं झाल्यास, ते आता हवामान बदल आणि प्रचंड पाऊस किंवा उष्णतेची लाट यांसारख्या स्वतंत्र घटनांचाही संबंध जोडू शकतात.
भविष्यात अशा घटनांचा अंदाज त्यांना आधीच लावणं हे, अधिक चांगल्या प्रकारे शक्य होईल अशी अपेक्षा आहे.
हवामान बदलांबद्दल तुम्ही - आम्ही काय करू शकतो?
शास्त्रज्ञांच्या मते सामान्य लोक खालील गोष्टी करू शकतात :
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा सायकलचा वापर वाढवून वाहनांचा वापर कमी करावा.
- घरं इन्सुलेट (उष्णतेपासून बचावासाठी विशिष्ट गोष्टीचा थर देणे) करा
- विमानांचा वापर कमीत कमी करा
- मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन कमी करा.
युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजची 27 वी बैठक यावर्षी 7 ते 18 नोव्हेंबर या काळात होण्याची शक्यता आहे. इजिप्तमधील शर्म-अल शेख येथे ही बैठक होईल.
वास्तविक ही बैठक 2021 मध्ये होणार होती मात्र कोरोना साथीमुळे ती आता 2022मध्ये होत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)