You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय नौदलाचं नवं बोधचिन्ह शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन कसं तयार झालं?
भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलात दाखल झाली. यावेळी भारतीय नौदलाच्या नवीन चिन्हाचंही अनावरण करण्यात आलं, ज्यात पूर्वीच्या दोन लाल रेषा आता काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यांना सेंट जॉर्जेस क्रॉस म्हणत असत. या दोन रेषा कायमच भारतीय नौदलाच्या चिन्हावर राहिल्या आहेत, ज्या ब्रिटिश राजवटीपासून तशाच राहिल्याचं सांगितलं जात आहे.
आता मात्र भारतीय नौदलाच्या नवीन झेंड्यावर एकीकडे वर भारताचा तिरंगा दिसणार आहे, तर त्याच्या बाजूला नौदलाचं हे बोधचिन्ह अगदी ठळकपणे दिसणार आहे.
वसाहतवादाच्या प्रभावापासून दूर जाण्याच्या भूमिकेमुळे नौदलाचं नवीन बोधचिन्ह तयार करण्याचा विचार समोर आला. या चिन्हाला इतिहासाचा संदर्भ असावा असा विचारही केला गेला. त्यानुसार नवीन चिन्हासाठी संपूर्ण नौदलाकडून वेगवेगळ्या कल्पना मागवण्यात आल्या होत्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारापासून प्रेरित होऊन हे नवं बोधचिन्ह तयार करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण करताना सांगितलं होतं.
या बोधचिन्हाचं अनावरण कोच्चीमध्ये झालं होतं तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची ओळखही यावेळी करुन देण्यात आली.
या चिन्हाच्या वरच्या बाजूला भारताची राजमुद्रा आहे तर त्याखाली जहाजाचं एक नांगर दाखवण्यात आलं आहे.
हे सगळं एका अष्टकोनी ढालीवर कोरण्यात आलं आहे, ज्याच्या खाली देवनागरीमध्ये भारतीय नौदलाचं ब्रीदवाक्य 'शं नो वरुणा:' लिहिण्यात आलं आहे. ज्या अर्थ वरुण देवता म्हणजेच पावसाची देवता आमचं रक्षण करो.
मात्र या ढालीचा आकार अष्टकोनी असण्यामागचं कारण विशेष आहे. या अष्टकोनाच्या आठ बाजू भारतीय नौदलाच्या सर्व दिशेत पोहोचण्याची आणि कारवाई करण्याची क्षमता दाखवतात, असं यावेळी सांगण्यात आलं.
तसंच हा आकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरून घेण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.
स्वतःच्या साम्राज्याला परकीय शक्तींच्या समुद्रावाटे होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून वाचवायला त्यांनी सर्वांत पहिली योजना आखून स्वतःचं नौदल कसं उभारलं होतं, हे यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं.
त्यामुळे शिवाजी महाराजांनासुद्धा मानवंदना अर्पण करत, भारतीय नौदलाने त्यांच्या नवीन चिन्हाचं अनावरण केलं होतं.
INS विक्रांत ही भारताची आजवरची सर्वांत मोठी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. भारताच्या आसपासच्या समुद्रात होत असलेल्या कारवाया लक्षात घेता या युद्धनौकेचं भारतीय नौदलात दाखल होणं खूप महत्त्वाचं मानलं जात होतं.
राष्ट्रपतींनी या चिन्हाला मान्यता दिली आहे. नौदलाचं चिन्ह स्वातंत्र्यानंतर चौथ्यांदा बदललं गेलं
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)