विधान परिषद निवडणूक : मतमोजणी सुरू, 2 मतं बाद, भाजप आणि NCPची निवडणूक आयोगाकडे धाव

फोटो स्रोत, Getty Images
अखेर 2 तासांच्या विलंबानंतर विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पण भाजपच्या उमा खापरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामराजे निंबाळकरांचं प्रत्येकी एक मत बाद ठरवण्यात आलं आहे.
या निर्णयाविरोधात दोन्ही पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याआधी काँग्रेसनं भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांची मतपत्रिका दुसर्यांनी मतपेटीत टाकली असा काँग्रेसचा आक्षेप होता. पण निवडणूक आयोगानं काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे.
काँग्रेसनं विधान परिषद निवडणुकीच्या रिटर्निंग ऑफिसरला पत्र पाठवून आपला आक्षेप नोंदवला होता. तसंच काँग्रेसने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडेसुद्धा तक्रार केली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट झाल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, या मागमीसाठी आपण कोर्टात जाणार नसल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "भाजपच्या दोन्ही उमेदवारांची शारीरिक परिस्थिती गंभीर असताना त्यांना पुण्याहून यावं लागलं, हे माझ्यादृष्टीने असंवेदनशील आहे. काँग्रसेने नेमका काय आक्षेप घेतला याविषयी माझा अभ्यास नाही. त्याबाबत सांगता येणार नाही. पण मतांसाठी एवढ्या लांब त्यांना आणणं आणि त्रास देणं दुर्देवी आहे."
विधान परिषद निवडणुकीत 285 आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. आता निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
तासाभरात म्हणजे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात होईल.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडलं. या 10 जागांसाठी 11 जण रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. मात्र, हा उमेदवार महाविकास आघाडीचा असेल की भाजपचा, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानाचा हक्क नाहीच
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयानं विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या व्हेकेशन बेंचनं हा निर्णय दिला आहे.
न्यायमूर्ती सीटी रवीकुमार आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलीया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये थेट लढत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतेय.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी अपक्षांच्या जोरावर बाजी मारली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पराभव करून त्यांनी तिसरा उमेदवार जिंकून आणला होता. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
हरिभाऊ बागडे यांनी पहिला मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिंग एजंट म्हणून प्राजक्त तनपुरे, अनिल पाटिल आणि संजय बनसोडे कार्यरत आहेत. भाजपकडून संजय कुटे, अतुल भातखळकर, रणधीर सावरकर, आशीष शेलार, राहुल नार्वेकर तर कॉंग्रेसचे पोलिंग एजंट अमर राजूरकर, सुनील केदार, यशोमती ठाकूर, अस्लम शेख पोलिंग एजंट म्हणून काम पाहत आहेत.
मला उद्धव ठाकरेंनी रोखण्याचा प्रयत्न केला - रवी राणा
"विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला मतदान झालं पाहिजे म्हणून माझ्यावर दवाब टाकण्याचा प्रयत्न करतायत," असा आरोप अपक्ष आमदार रवी राणांनी केला.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
ते पुढे म्हणाले, "मी दोन दिवस मुंबईबाहेर होतो. मला अटक करण्यात आली असती. पोलिसांचा वापर करून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मला उद्धव ठाकरेंनी थांबवण्याचा प्रयत्न केला. अमरावती पोलीस माझ्या घरी पाठवण्यात आले."
राज्यसभेवेळी आमच्यावर अविश्वास दाखवला, पण आता गैरसमज दूर - भुयार
"राज्यसभेत नियोजन झालं नव्हतं, पण आता चांगलं नियोजन झालंय," असं मत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केलंय.
तसंच, "राज्यसभेत आमच्यावर अविश्वास दाखवला गेला. पण आता तिन्ही पक्षाच्या वरिेष्ठ नेत्यांची चर्चा झालीय. आता आमचे सर्व गैरसमज दूर झाले आहेत," असंही भुयार म्हणाले.
नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या याचिकेवर 2 वाजता सुनावणी
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
मलिक आणि देशमुखांनी मुंबई हायकोर्टानं मत देण्यास नाकारलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्रात आज विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान आहे. दुपारी दोन वाजता याचिकेवरील सुनावणीनंतर मलिक, देशमुखांना मत देता येईल की नाही, हे स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी यांना तिकीट दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं आहे.
काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे या दोन वरिष्ठ नेत्यांना पुन्हा संधी दिली आहे.
भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?
भाजपने विधानपरिषदेत पाच उमेदवारांना संधी दिलीय. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली.
भाजपने विधान परिषदेचे विरोधपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीचं तिकीट दिलंय.
महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ?
राज्यसभा निवडणुकांनतर अवघ्या 10 दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक होतेय. त्यामुळे ही लढत अत्यंत अटी-तटीची मानली जाते आहे.
महाविकास आघाडीतील पक्षांचं एकूण संख्याबळ आहे 152.
- शिवसेना- 55
- राष्ट्रवादी काँग्रेस- 53
- काँग्रेस- 44
विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा उमेदवार जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज भासणार आहे.
महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहाता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. आणि काँग्रेसची ताकद एक उमेदवार सहज जिंकून आणण्याची आहे.
पण काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दुसरा उमेदवार जिंकून विधानपरिषदेत पाठवण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त 10 मतांची गरज आहे.
ठाकरे सरकारकडे अपक्षांच्या जोरावर 169 आमदारांचा पाठिंबा आहे. असं असलं तरी राज्यसभेत अपक्षांची मोट बांधण्यात मात्र उद्धव ठाकरे अपयशी ठरले होते.

फोटो स्रोत, facebook
विधानपरिषद निवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या सुधारून आम्ही विधानपरिषद निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्व जागा जिंकू."
राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी भाजपच्या पारड्यात झुकतं माप टाकलं होतं. सरकार चालवण्यासाठी अपक्षांचा पाठिंबा असूनही राज्यसभेत अयशस्वी ठरलेले उद्धव ठाकरे विधानपरिषदेत अपक्षांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का, हा मोठा प्रश्न आहे.
भाजपकडे संख्याबळ पुरेसं आहे?
राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेतही भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाहीये.
भाजपचे सद्यस्थितीला 106 आमदार आहेत. भाजपसोबतच्या अपक्षांच्या मदतीने संख्याबळ 113 पर्यंत पोहोचतं. त्यामुळे चार भाजपचे उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात.
पाच उमेदवार जिंकवण्यासाठी भाजपला एकूण 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त 22 आमदारांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी जागा लढवणं सोपं नाही हे मान्य केलंय. ते म्हणाले, "सत्तारूढ पक्षात आमदारांमध्ये असलेल्या नाराजीला वाव हवाय म्हणून आम्ही पाचवी जागा लढण्याचा निर्णय घेतला. आम्हाला विश्वास आहे की पाचवी जागा आम्ही निवडून आणू."
राज्यसभा निवडणुकीच्या आकड्यांवर नजर टाकली तर, भाजपला 123 मतं मिळाली होती. 12 अपक्ष आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. हे आकडे लक्षात घेतलं तरी विधानपरिषदेत पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी 12 मतांची गरज पडणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








