विधान परिषद निवडणुकीत कुणाची विकेट पडणार? अजित पवार म्हणाले...

फोटो स्रोत, facebook
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सहा उमेदवार उभे करणार आहे. हे सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे. ज्याच्याकडे 26 मतांचा कोटा पूर्ण होणार नाही, त्याची विकेट पडेल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची रणनिती तयार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.
ते म्हणाले, "आम्ही सर्व उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शिवसेनेकडे दोन उमेदवार जिंकून आणण्यासाठी मतं आहेत. आमच्या दोन आमदारांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. कोटा जास्त कसा देता येईल याचा प्रयत्न करतोय. आमच्याकडे काही संख्या कमी आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्याशी सुरू आहे."
पवार पुढे म्हणाले, "अपक्षांना काही नेत्यांनी मत कमी पडेल म्हणून फोन केला आहे. आता आम्हाला संख्या कमी पडतेय. त्यामुळे अपक्षांची मदत घेऊन कशी संख्या करता येईल याचा प्रयत्न करतोय. अपक्षांची सर्वांनाच गरज आहे. अपक्ष लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांचा सन्मान करून मत मागितलं पाहिजे."
"बहुजन विकास आघाडीला सर्व जाऊन भेटले. त्यांना भेटून मत मिळवणं हे पक्षाचं काम असतं. बहुजन विकास आघाडीला सर्व जाऊन भेटले. त्यांना भेटून मत मिळवणं हे पक्षाचं काम असतं. आमचा प्रयत्न आहे का तीन आणि चारचा कोटा कोणाला द्यायचा याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करू. आम्ही काही आमदारांना फोन केले. मी स्वत मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्याच लपवण्याचं काहीच कारण नाही," असं अजित पवार यांनी म्हटलं.
नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाही
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीतही मतदान करता येणार नाहीय. मुंबई हायकोर्टानं या दोघांनाही मतदान करण्यास नकार दिला आहे.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेही विविध प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत.

फोटो स्रोत, facebook
या दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करण्याची परवानगी देण्याचीही विनंती मुंबई हायकोर्टाकडे केली होती. मात्र, तिथंही त्यांना मतदान करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता विधानपरिषदेतही मतदान करता येणार नाही.
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानाआधीच अपशकुनास सामोरं जावं लागलंय. भाजपच्या विजयाचं वारं वाहू लागलं आहे. विजयाचे हे शुभसंकेतच आहेत."

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH
महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी यांना तिकीट दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं आहे.
काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे या दोन वरिष्ठ नेत्यांना पुन्हा संधी दिलीये.
भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?
भाजपने विधानपरिषदेत पाच उमेदवारांना संधी दिलीय. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली.
भाजपने विधान परिषदेचे विरोधपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीचं तिकीट दिलंय.
महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ?
राज्यसभा निवडणुकांनतर अवघ्या 10 दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक होतेय. त्यामुळे ही लढत अत्यंत अटी-तटीची मानली जातेय.
महाविकास आघाडीतील पक्षांचं एकूण संख्याबळ आहे 152.
- शिवसेना- 55
- राष्ट्रवादी काँग्रेस- 53
- काँग्रेस- 44
विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा उमेदवार जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज भासणार आहे.
महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहाता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. आणि काँग्रेसची ताकद एक उमेदवार सहज जिंकून आणण्याची आहे.
पण काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दुसरा उमेदवार जिंकून विधानपरिषदेत पाठवण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त 10 मतांची गरज आहे.
ठाकरे सरकारकडे अपक्षांच्या जोरावर 169 आमदारांचा पाठिंबा आहे. असं असलं तरी राज्यसभेत अपक्षांची मोट बांधण्यात मात्र उद्धव ठाकरे अपयशी ठरले होते.

फोटो स्रोत, facebook
विधानपरिषद निवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या सुधारून आम्ही विधानपरिषद निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्व जागा जिंकू."
राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी भाजपच्या पारड्यात झुकतं माप टाकलं होतं. सरकार चालवण्यासाठी अपक्षांचा पाठिंबा असूनही राज्यसभेत अयशस्वी ठरलेले उद्धव ठाकरे विधानपरिषदेत अपक्षांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का, हा मोठा प्रश्न आहे.
भाजपकडे संख्याबळ पुरेसं आहे?
राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेतही भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाहीये.
भाजपचे सद्यस्थितीला 106 आमदार आहेत. भाजपसोबतच्या अपक्षांच्या मदतीने संख्याबळ 113 पर्यंत पोहोचतं. त्यामुळे चार भाजपचे उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात.
पाच उमेदवार जिंकवण्यासाठी भाजपला एकूण 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त 22 आमदारांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी जागा लढवणं सोपं नाही हे मान्य केलंय. ते म्हणाले, "सत्तारूढ पक्षात आमदारांमध्ये असलेल्या नाराजीला वाव हवाय म्हणून आम्ही पाचवी जागा लढण्याचा निर्णय घेतला. आम्हाला विश्वास आहे की पाचवी जागा आम्ही निवडून आणू."
राज्यसभा निवडणुकीच्या आकड्यांवर नजर टाकली तर, भाजपला 123 मतं मिळाली होती. 12 अपक्ष आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. हे आकडे लक्षात घेतलं तरी विधानपरिषदेत पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी 12 मतांची गरज पडणार आहे.
सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे
राज्यसभेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडींनंतर झालेल्या भाजपच्या विजयाने विधान परिषदेसाठी समीकरण तापलं आहे. विधान परिषद बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
विधान परिषदेसाठी 20 जून रोजी होणार मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार आहेत.

फोटो स्रोत, Facebook
भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड रिंगणात आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी निवडणुकीला उभे आहेत. राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात आहेत.
"आमची अपेक्षा अशी होती की सत्तारुढ पक्षाने निवडणूक बिनविरोध करावी. पण ती बिनविरोध होऊ शकली नाही. आम्ही 5 जागा लढवतोय. सत्तारुढ पक्षात खूप असंतोष आहे. या असंतोषाला जागा हवेय म्हणून आम्ही पाचवी जागा लढवतोय. निवडणूक सोपी नाही, पण आम्ही पाचवी जागा निवडून आणू", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
"सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा केली. काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा अशी चर्चा होती पण तसं झालेलं नाही. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे. महाविकास आघाडीत असंतोष आहेच".
"जोकरसारखे स्टेटमेंट रोजच करत असतात. आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. सहा जागा लढवायच्या की पाच यावर चर्चा झाली. अध्यक्ष चंदक्रांतदादा पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पाच जागांवर लढणार आहोत", असं फडणवीस म्हणाले.

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis
भाजपकडे सध्या 106 जागांचं संख्याबळ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मते आवश्यक आहेत.
या गणितानुसार, भाजपचे पहिले 4 उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. चार जागांसाठी 108 मतांची गरज लागेल. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी 27 मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला 130 पेक्षा जास्त मतांची गरज लागेल. यामुळे भाजपला बरीच मेहनत करावी लागणार आहे. हे लक्षात घेऊन भाजपने सदाभाऊ खोत यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं.
सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर 9 जून रोजी अर्ज दाखल केला होता. फडणवीसांच्या सांगण्यानुसार अर्ज भरलाय. त्यांनी सांगितलं तर पुन्हा माघारही घेऊ, असंही त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








