विधानपरिषद निवडणूक : कुणाकडे किती संख्याबळ? 10 वा आमदार भाजपचा की काँग्रेसचा?

विधान परिषद निवडणुका, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, MLS.ORG.IN

फोटो कॅप्शन, विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं आहे.
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालीय. या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा चुरशीचा सामना रंगणार आहे.

विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पूरेसं संख्याबळ नाही.

राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही देवेंद्र फडणीस यांनी अपक्षांच्या जोरावर बाजी मारली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पराभव करून त्यांनी तिसरा उमेदवार जिंकून आणला. हा करिश्मा फडणवीस विधानपरिषदेत करू शकता का?

कोणाकडे किती संख्याबळ? भाजपचं पारडं जड का महाविकास आघाडीचं? जाणून घेऊया.

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी यांना तिकीट दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं आहे.

काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे या दोन वरिष्ठ नेत्यांना पुन्हा संधी दिलीये.

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?

भाजपने विधानपरिषदेत पाच उमेदवारांना संधी दिलीय. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली.

भाजपने विधान परिषदेचे विरोधपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीचं तिकीट दिलंय.

महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ?

राज्यसभा निवडणुकांनतर अवघ्या 10 दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक होतेय. त्यामुळे ही लढत अत्यंत अटी-तटीची मानली जातेय.

महाविकास आघाडीतील पक्षांचं एकूण संख्याबळ आहे 152.

  • शिवसेना- 55
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 53
  • काँग्रेस- 44

विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा उमेदवार जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज भासणार आहे.

महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहाता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. आणि काँग्रेसची ताकद एक उमेदवार सहज जिंकून आणण्याची आहे.

पण काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दुसरा उमेदवार जिंकून विधानपरिषदेत पाठवण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त 10 मतांची गरज आहे.

ठाकरे सरकारकडे अपक्षांच्या जोरावर 169 आमदारांचा पाठिंबा आहे. असं असलं तरी राज्यसभेत अपक्षांची मोट बांधण्यात मात्र उद्धव ठाकरे अपयशी ठरले होते.

विधान परिषद निवडणुका, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानपरिषद निवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या सुधारून आम्ही विधानपरिषद निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्व जागा जिंकू."

राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी भाजपच्या पारड्यात झुकतं माप टाकलं होतं. सरकार चालवण्यासाठी अपक्षांचा पाठिंबा असूनही राज्यसभेत अयशस्वी ठरलेले उद्धव ठाकरे विधानपरिषदेत अपक्षांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का, हा मोठा प्रश्न आहे.

भाजपकडे संख्याबळ पुरेसं आहे?

राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेतही भाजपकडे पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्याबळ नाहीये.

भाजपचे सद्यस्थितीला 106 आमदार आहेत. भाजपसोबतच्या अपक्षांच्या मदतीने संख्याबळ 113 पर्यंत पोहोचतं. त्यामुळे चार भाजपचे उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात.

पाच उमेदवार जिंकवण्यासाठी भाजपला एकूण 135 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे अतिरिक्त 22 आमदारांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी जागा लढवणं सोपं नाही हे मान्य केलंय. ते म्हणाले, "सत्तारूढ पक्षात आमदारांमध्ये असलेल्या नाराजीला वाव हवाय म्हणून आम्ही पाचवी जागा लढण्याचा निर्णय घेतला. आम्हाला विश्वास आहे की पाचवी जागा आम्ही निवडून आणू."

राज्यसभा निवडणुकीच्या आकड्यांवर नजर टाकली तर, भाजपला 123 मतं मिळाली होती. 12 अपक्ष आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. हे आकडे लक्षात घेतलं तरी विधानपरिषदेत पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी 12 मतांची गरज पडणार आहे.

महाविकास आघाडीत धुसफूस?

राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस अधिक वाढली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेतील पराभवाचं खापर अपक्षांवर फोडलं होतं. विधान परिषदेतही अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांकडे राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "मी शरद पवारांकडे माझं म्हणणं मांडलंयं."

सोमवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला दुसरा उमेदवार मागे घेण्याची सूचना केली होती. पण काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिला.

तर "अपक्षांची जबाबदारी शिनसेनेवर होती. त्यांचं मॅानिटरिंग शिवसेना करत होती," असं म्हणत राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी पराभवाबाबत शिवसेनेकडे बोट दाखवलं होतं.

विधानपरिषदेत गुप्त मतदान?

विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे.

महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. काँग्रेसने अनेकवेळा मुख्यमंत्री भेटत नाहीत अशी उघडपणे तक्रार केलीये. तर, शिवसेना आमदारही खासगीत उद्धव ठाकरे भेटत नसल्याचं बोलून दाखवतात.

राजकीय जाणकार सांगतात महाविकास आघाडीतील याच नाराजीचा भाजप फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे.

वरिष्ठ राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यंवशी म्हणाले, "राज्यसभेत अपक्षांची नाराजी मुख्यमंत्र्यांविरोधात होती. विधानपरिषदेत ही परिस्थिती नाही." इथे कोणत्या उमेदवाराचा आमदारांशी थेट संपर्क आहे हे महत्त्वाचं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)