ज्ञानवापी मशीद: विजेशिवाय ही कारंजी कशी चालतात? कारंज्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

    • Author, स्नेहा
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू पक्षाच्या बाजूनं निर्णय वाराणसी जिल्हा कोर्टानं दिलाय. त्यामुळे या प्रकरणाची पुढे सुनावणी होईल.

ज्ञानवापी मशीद प्रकरणात अंजुमन इंतजामिया कमिटीची याचिका जिल्हा कोर्टानं फेटाळली. याचाच अर्थ असा की, ज्ञानवापी मशिदीतल्या श्रृंगार गौरी मंदिरात दररोज पूजा करण्याची परवानगीची याचिका सुनावणीस योग्य असल्याचं मत कोर्टानं नोंदवलंय.

या प्रकरणात आता 22 सप्टेंबर 2022 रोजी पुढील सुनावणी होईल.

दरम्यान, याचिकाकर्त्या हिंदूधर्मीयांनी मशिदीत शिवलिंग असल्याचा दावा केला होता. दुसरीकडे इथे शिवलिंग नसून कारंजं आहे, असा मुस्लिम पक्षकारांचा दावा होता.

दोन्ही बाजूची माणसं एकमेकांचे दावे खोटे ठरवत आहेत.

भाजपशी संलग्न निगहत अब्बासने ट्वीट केलं. ते लिहितात, 400 वर्षांपूर्वी वीजेचा शोध लागला नव्हता. औरंगजेब फुंकर मारून कारंजं चालवत असत का?

अनीष गोखले यांच्यासह अनेकांनी म्हटलंय की, गुरुत्वाकर्षणाच्या बळावर वीजपुरवठा नसतानाही कारंजं चालवतं जाऊ शकतं.

सोशल मीडियावर वेगवेगळे लोक अनेकविध दावे करत आहेत. यात तथ्य आहे का? वीज नसताना कारंजं चालवता येतं का?

तुमच्या आमच्या घरातल्या पाणीच्या मोटरपासून ऐतिहासिक वास्तूंमध्ये बसवण्यात आलेल्या कारंज्याविषयी आपण समजून घेऊया

कारंजं कसं चालतं?

तुम्हाला तर माहितेय की पाणी उंचावरून खालच्या दिशेने वाहतं. तो पाण्याचा गुणधर्म आहे. पर्वतरांगांमध्ये उगम पावणारे झरे, नदी किंवा तुमच्या घरची पाण्याची मोटर सगळ्या गोष्टी याचीच साक्ष देतात. यामागचं कारण आहे गुरुत्वाकर्षण.

सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही तुमच्या घरची पाण्याची मोटर सुरू केलीत. एखाद्या ठिकाणी तुम्ही पाईप पकडून ठेवलात तर पाण्याचा वेग वाढतो असं तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पाईप जिथे पकडला असेल तिथून पाणी एखाद्या फवाऱ्यासारखं म्हणजे कारंज्यासारखं बाहेर पडू लागेल.

आता हेच तत्व ताजमहाल, काश्मीरमधलं मुघल गार्डन तसंच दिल्लीतल्या लाल किल्या या ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भात समजून घेऊया. या सगळ्या वास्तू वीजेचा शोध लागण्याआधी कैक वर्ष आधी तयार झाल्या होत्या. तरीपण या वास्तूंमध्ये कारंजी होती.

कारंजं तयार करण्यातच कलाकुसर होत असे. कारंज्यांची रचना अशी असे की पाणी एका ठिकाणी जमा केलं जात असे. त्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह छोट्या कालव्याद्वारे किंवा पन्हळीद्वारे काढलं जात असे. जेणेकरून पाण्याचा दबाव वाढत असे. दबाव वाढलेलं पाणी कारंज्यांच्या छिद्रातून बाहेर पडत असे तेव्हा त्याचा वेग एकदम जास्त होऊन जात असे.

पाण्याचा वेग आणि कारंज्यांचं आरेखन यामुळे त्या आरेखनातून ओसंडणारं पाणी सुंदरच वाटतं.

कारंज्याचं विज्ञान

सर्वसामान्य भाषेत कारंजं कसं चालतं हे तुम्हाला कळलं. आता कारंज्यामागचं शास्त्रही जाणून घेऊया.

अर्बन प्लानर शुभम मिश्रा सांगतात, "मुघल काळात कारंजं तयार करताना टेराकोटा पाईपचा वापर केला जात असे. त्या पाईपचा उतार इतका तीव्र असे की पाणी येऊन, वर जाऊन प्रचंड घुसळणीसह कारंज्याच्या छिद्रातून बाहेर पडत असे. यासाठी पाण्याचा वेगही महत्त्वाचा असे. पाण्याची गती नियंत्रित करणं, कारंज्यांची छिद्रं तयार करणं हे खरं कौशल्याचं काम आहे".

टेराकोटा म्हणजे आगीत जाळून भाजलेली माती.

इतिहासकार राना सफवी सांगतात, "मुघल वास्तूंमध्ये उभारण्यात आलेली कारंज्यांमध्ये गुरुत्वाकर्षण आणि हाइड्रॉलॉजिकल प्रणालीचा उपयोग केला जात असे.

राना सफवी यांच्या मते, "मुघल वास्तूरचनेत मग मकबरा असो किंवा मशीद यामध्ये पाण्याचा मार्ग अतिशय महत्त्वाचा असे. मकबरे चार बागांभोवती तयार केले जात. या बागांभोवती कारंजं असे. याच धर्तीवर 'हुमायून का मकबरा' तयार करण्यात आला आहे. काश्मीरमधली उद्यानंही अशीच तयार करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारंजी उभारण्यात आली आहेत. लाल किल्ल्यामध्ये नहर-ए-बहिश्त असे. संपूर्ण किल्ल्यात ही रचना होती आणि ठिकठिकाणी कारंजी तयार करण्यात आली होती. यासाठी यमुनेच्या पात्रातून पाणी घेतलं जात असे. नहर-ए-बहिश्तच्या माध्यमातून पाणी कारंज्यापर्यंत पोहोचत असे. जामा मशिदीत तलावापर्यंत पाणी आणण्यासाठी विहीर आणि पन्हळीची व्यवस्था होती. ही व्यवस्था आजही पाहायला मिळते".

कारंज्यांचा इतिहास

भूतलावर 70 टक्के पाणी आहे. जिथे पाणी आहे, त्या भूभागावरून आजही लढाया होत आहेत. माणसाने आपल्या विकासासाठी पाण्याचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. मग तो पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी.

आवश्यकता आणि गरजांपल्याड विचार केला तर माणसाने सौंदर्यदृष्टीने कारंज्यांची निर्मिती केली.

द गार्डियन वेबसाईटनुसार, जगातलं पहिलं कारंजं मेसोपोटामिया इथे मिळाल्याची माहिती आहे. इसवीसनपूर्व 3000 वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली होती. मेसोपोटेमिया म्हणजे आजचा इराक, इराण, टर्की आणि सीरियाचा भाग.

नैसर्गिक झऱ्यांचा वापर करून कारंज्यांची निर्मिती करण्यात आली होती.

गॉर्डन ग्रिमले यांच्या पुस्तकात द ओरिजिन ऑफ एव्हरीथिंग दिलेल्या माहितीप्रमाणे ग्रीक आणि रोमन अवशेषांमध्येही कारंजी सापडली आहेत. इटलीत 15व्या शतकादरम्यान कारंजी उभारण्यात आली होती.

प्रसिद्ध कारंजी

कारंज्यांशी निगडीत एक रंजक कहाणी फ्रान्सची आहे. फ्रान्सचे राजा लुई 14वे यांनी एक निर्णय घेतला. यामुळे केवळ राजघराण्यातील माणसंच नव्हे तर प्रशासनालाही त्रास झाला.

त्यांनी दरबाराचं कामकाज सत्ताकेंद्र पॅरिसहून व्हर्सायला नेण्याचा निर्णय घेतला. पॅरिसप्रमाणे व्हर्साय हे चमचमतं शहर नव्हतं.

पॅलेस ऑफ व्हर्साय रिसर्च सेंटरचे बेंजामिन रिंगट यांनी नॅशनल जिओग्राफिकशी बोलताना ही आठवण सांगितली.

ज्याठिकाणी लुई यांना मुख्य केंद्र उभारायचं होतं तो पडीक भाग होता. लुई यांच्या स्वप्नातील बगीचे आणि कारंज्यांसाठी पुरेसं पाणी तिथे नव्हतं. या समस्येच्या निराकरणासाठी बेल्जियमहून अभियंत्यांना पाचारण करण्यात आलं. उदंचन (पंपिंग स्टेशन) आणि तलावांच्या माध्यमातून सीन नदीचं पाणी आणण्यात आलं. त्यामुळे कारंज्यांना पाणी मिळालं. व्हर्सायच्या शीशमहल आणि बगीच्यात असलेलं कारंजं आज जगभरातील पर्यटकांच्या आकर्षण आहे. दरवर्षी सरासरी 50 लाख पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.

कारंज्यांसाठी इटली जगभरात प्रसिद्ध आहे. 'फाऊंटन ऑफ द फोर रिव्हर' असेल किंवा ट्रिवी फाऊंटन यामध्ये नाणं टाकून दुवा मागण्याची परंपरा आहे.

राजा लुई 14वे यांनीच ही परंपरा सुरू केली. इथली कारंजं अतिशय सौंदर्यपूर्ण मानली जातात.

इतिहासकार फिरोज बख्त अहमद सांगतात, इटलीत काही जुनी कारंजी आहेत. पियात्सा नवोना यापैकीच एक आहे. फ्रान्स आणि जर्मनीतही अनेक कारंजी आहेत.

जगात अलीकडे तयार करण्यात आलेल्या कारंज्यांमध्ये दुबईतील कारंज्याचा समावेश होतो.

तुम्हाला यापैकी कोणतं कारंजं सर्वाधिक आवडतं? हे आम्हाला नक्की सांगा.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)