You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'महिलांनी आयुष्याला आत्मविश्वासाने सामोरे जावे,' असं सांगणाऱ्या पल्लवी जाधव यांचा प्रवास
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
अभिनेत्री आणि मॉडेल पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या विवाहबंधनात अडकल्या आहेत. पल्लवी आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा रविवारी (15 मे) थाटामाटात पार पडला. पल्लवी जाधव यांनी अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत आणि मुलींनी आत्मविश्वासाने जगावं यासाठी त्या सातत्याने प्रोत्साहन देत असतात.
PSI पल्लवी जाधव यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्यांना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत असल्याचं दिसून येतं.
PSI पल्लवी जाधव यांना सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. तसंच पोलीस प्रशासनात त्यांची ओळख एक दबंग महिला अधिकारी म्हणून आहे.
मूळच्या औरंगाबादच्या असलेल्या पल्लवी या जालना पोलिसांत दामिनी पथकाचं नेतृत्व करतात.
पल्लवी जाधव कोण आहेत?
पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या. त्यांचे आई-वडील दोघेही शेतमजुरीचं काम करून उदरनिर्वाह करायचे.
कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची असताना त्यांनी पोलिसात दाखल होण्याचं स्वप्न पाहिलं.
त्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. कमवा व शिका योजने काम करत आपलं शिक्षण पूर्ण केलं. अनेकदा त्या आई-वडिलांसोबत शेतमजुरीही करायला जायच्या.
दुसरीकडे, पल्लवी यांना लहानपणापासून अभिनयाचीही आवड आहे. त्यामुळे नोकरी करत असताना त्यांनी आपला छंद जपण्यासाठी मॉडेलिंगची सुरुवात केली.
2020 मध्ये जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी रनर अपचा किताब जिंकला होता.
पल्लवी जाधव यांनी आपल्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर ते व्हायरल झाले आहेत. पल्लवी यांचे पती कुलदीप यांच्याविषयी नेटकऱ्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.
लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या 'हैद्राबाद कस्टडी' या चित्रपटात नायिका बनून पल्लवी प्रेक्षकांसमोर येणार आहे.
पल्लवी जाधव यांचा प्रवास जाणून घ्या
2021 मध्ये पल्लवी जाधव यांनी जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला होता. त्यावेळी त्यांनी बीबीसी मराठीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आपले प्रवास सांगितला.
त्या सांगतात, "मला आठवत नाही कधीपासून, अगदी लहान असल्यापासून माझं स्वप्न होतं की आपणही मॉडेल बनावं, हिरोईन बनावं आणि टीव्हीवर झळकावं. जशी जशी मोठी होत गेले तसं तसं लक्षात आलं की आपण ग्रामीण भागात राहातो, आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही, आपले आईवडील गरीब शेतकरी आहेत. त्यामुळे आपलं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही," पल्लवी जुन्या दिवसांना आठवत सांगतात.
पल्लवी जाधव मुळच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रेल गावाच्या. लहानपणापासूनच त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांनी आपलं शिक्षणही 'कमवा आणि शिका' या योजनेअंतर्गत काम करून पूर्ण केलं. अनेकदा त्या दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करायला जायच्या.
"मी सोळा वर्षांची झाले तेव्हा इतक्या मोठ्या वयाची लग्न न झालेली मी एकटीच मुलगी होते. चौदाव्या-पंधराव्या वर्षी आमच्याकडे मुलींची लग्न करून टाकायची पद्धत होती. माझ्या मोठ्या बहिणींचेही बालविवाह झाले होते. पण मी अभ्यासात हुशार होते, घरातही एकटीच शिल्लक राहिले होते, त्यामुळे वडीलांनी मला शिकवायचं ठरवलं."
पण शिक्षण पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी आल्या.
'मी या वर्दीसाठी खूप मेहनत घेतलीये'
"एका बाजूला शिक्षण चालू होतं तर दुसरीकडे घरचे स्थळ पाहायला लागले. त्यावेळी लग्न जुळवण्यासाठी आलेल्या एका वयोवृद्ध मध्यस्थांनीच तिच्या घरच्यांना सांगितलं की मुलीत स्पार्क आहे, तिला तुम्ही चांगल करियर घडवण्यासाठी पोलिसात जाऊ द्या."
"मी सायकोलॉजीमध्ये एमए केलं. मग मी पोलीस अधिकारी बनायचं ठरवलं. ही वर्दी मिळवण्यासाठी मी खूप स्ट्रगल केला आहे. 3 वर्षं मेहनत केली आहे. मला कोणाच्या मदतीने किंवा उपकाराने ही वर्दी मिळालेली नाही. मी अनेकदा उपाशी राहून अभ्यास केलाय त्यामुळे वर्दी हेच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे," त्या ठामपणे उत्तरतात.
पल्लवी जाधव यांना पुढे डिवायएसपी व्हायचं आहे.
'मॉडलिंग हा फक्त छंद आहे'
असं असलं तरी मॉडेलिंग करणं त्यांच्या छंद आहे, आणि आपल्या मोकळ्या वेळात तो पूर्ण करायचा त्या प्रयत्न करतात.
सौंदर्यस्पर्धेचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, "2019 साली मी सोशल मीडियावर जाहिरात पाहिली की ग्लॅमॉन मिस इंडियाची सौंदर्यस्पर्धा घेतंय. ते पाहिल्यावर मला वाटलं की माझं लहानपणीचं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होऊ शकेल. मग मी भाग घेतला. मागच्या वर्षी ही स्पर्धा कोरोनामुळे स्थगित झाली. यावर्षी ती जयपूरला झाली. त्यात माझी फर्स्ट रनरअप म्हणून निवड झाली."
त्या आता एका सिनेमातही अभिनय करत आहेत अर्थात पुढे या क्षेत्रात पूर्णवेळ यायचा त्यांचा काहीही विचार नाही.
"मी आयुष्यभर पोलिसच राहीन आणि पोलीस अधिकारी म्हणूनच निवृत्त होईन."
मॉडेलिंगच्या छंदामुळे लोक पोलीस अधिकारी म्हणून सिरीयसली घेत नाहीत असं वाटलं का?
महिलांना अनेकदा कमी लेखलं जातं, एखादी महिला दिसायला सुंदर नसेल, छान कपडे घालत नसेल किंवा मेक-अप करत नसेल तर 'बहनजी' म्हणून हिणवलं जातं तर एखादी महिला आपल्या दिसण्याकडे विशेष लक्ष देत असेल तर 'हिला काय काम जमणार, नुस्ती बाहुली आहे,' म्हणत अपमान केला जातो.
अशावेळेस एक पोलीस अधिकारी आणि मॉडेल, सौंदर्यवती या दोन भूमिका कशा निभवल्या याबद्दल बोलताना पल्लवी सांगतात की, "पोलीस अधिकारी असणं माझं कर्तव्य आहे, जिद्द आहे तर मॉडेल बनणं हा छंद. पोलिसांचे नियमही हेच सांगतात की पोलीस दलातले लोक आपले छंद जोपासू शकतात. त्यामुळे मला डिपार्टमेंटमधून कधी विरोध झाला नाही, उलट कौतुकच झालं. आणि समाजाचं म्हणाल तर आख्या महाराष्ट्राला माहिती आहे की पल्लवी जाधव पोलीस अधिकारी म्हणून कशी आहे, कशी राहते, कसं काम करते. लोकांना माझ्या कामाचंच कौतुक आहे. सोशल मीडियावरही माझ्या वर्दीतल्या फोटोंना जास्त लाईक्स मिळतात."
ड्युटीच्या काळात ड्युटीच असं त्या सांगतात. "मी खाकीवर्दीत रफ अँड टफ असते आणि रँपवर सौंदर्यवती असते."
जे लोक महिलांची फक्त त्यांच्या दिसण्यावरून पारख करतात त्यांनाही पल्लवी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देताना म्हणतात की, "कोणतीही महिला तुमची बांधील नाही. तिला स्वतःचे हक्क आहेत, अधिकार आहेत आणि मतं आहेत. त्या महिलेला तुम्ही खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका. आणि महिलांनाही माझं हेच सांगणं आहे की तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका."
'मिसेस व्हायच्या आधी मिस इंडिया व्हायचं होतं'
या मुलाखतीवेळी त्यांना बीबीसी मराठीने त्यांना विचारले होते तुमचा पुढचा प्लान काय आहे. तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिले होते की लग्न करायचं आहे आणि योग्य व्यक्तीचा शोध चालू आहे.
त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, "आतापर्यंत मी थोडी चालढकल करत होते, कारण कोणाची मिसेस होण्याच्या आधी मला 'मिस इंडिया' व्हायचं होतं."
पण पुढच्याच क्षणात एका महत्त्वाच्या विषयाला हात घालतात.
"मी स्थळं पाहतेय, पण जे मला आवडले, त्यांना पोलीस सून नको होती. आजही आपल्या समाजात सूनेला गुलाम समजण्याची वृत्ती आहे. हिने आपलंच ऐकलं पाहिजे. आपण म्हणू तसं राहिलं पाहिजे, आपल्या शब्दाबाहेर नको, आपण म्हणू ते केलं पाहिजे ही वृत्ती घराघरात दिसते. त्यामुळे पोलीस सून म्हटलं की ते घाबरतात आणि नको म्हणतात."
पल्लवी जाधव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आहे आणि पुढेही महिलांच्या हक्कासाठी त्यांना काम करायचं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)