बंगळुरू : महाराजांचा अवमान सहन करणार नाही, कर्नाटकात होवो किंवा कुठेही होवो - फडणवीस

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंगळुरूतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणावर भाष्य केलं. फडणवीसांनी बंगळुरूतील घटनेचा निषेध केला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांना या प्रकरणावर विचारण्यात आलं.

फडणवीस म्हणाले, "कर्नाटकमध्ये जो अवमान झाला, तो कर्नाटकात होवो किंवा कुठेही होवो, महाराजांचा अवमान सहन केला जाणारच नाही."

"त्यासंदर्भात कर्नाटक सरकारनंही स्पष्ट भूमिका मांडली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासह त्यांचं विधान कसं ट्विस्ट करण्यात आलं, हे दाखवलंय. ते म्हणालेत की, छत्रपती शिवाजी महाराज असो वा तिथले एक महनीय व्यक्ती आहेत, त्यांच्या पुतळ्याला इजा पोहोचवण्यात आली. अशाप्रकारचं कृत्य चुकीचंच आहे, असं स्पष्टपणे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. त्यांचं स्टेटमेंट ट्विस्ट करण्यात आलं," असंही फडणवीस पुढे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी 7 जणांना अटक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरी सात जणांना बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरूचे डीसीपी एम. एन. अनुचेत यांनी ही माहिती दिली.

तर दुसरीकडे बेळगावात दगडफेकप्रकरणी आणखी 61 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेळगावातील कॅम्प पोलीस स्टेशन, खडेबाजार पोलीस स्टेशन, मार्केट पोलीस स्टेशन अशा एकूण 3 स्थानकात पोलिसांनी शिवप्रेमींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याआधारे हे गुन्हे दाखल करण्यात आले.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. 16 डिसेंबरला ही घटना घडली. यानंतर बेळगावमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. बेळगावात सोमवारी (20 डिसेंबर) सकाळी 6 पर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.

शिवाजी महाराजांचा अनादर खपवून घेणार नाही - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी म्हटलं, "बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही.

"कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावं."

तर कर्नाटकात कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलंय.

ते म्हणाले, "जबाबदार लोकांनी कोणालाही भडकवू नये. शिवाजी महाराज, संगोळी रायण्णा, राणी चन्नम्मा यांनी देशाला एकत्र आणलं होतं. जर आपण त्यांची नावं घेऊन एकमेकांशी भांडू लागलो तर हे त्यांनी केलेल्या संघर्षावर अन्याय करण्यासारखं होईल."

दरम्यान, बंगळुरूतल्या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर बेळगाव, कोल्हापूर भागात नागरिकांनी या घटनेविरोधात रस्त्यावर उतरत संतप्त भावना व्यक्त केल्या.

बंगळुरूतील घटनेच्या निषेधासाठी बेळगाव शहरात काल (17 डिसेंबर) धर्मवीर संभाजीराजे चौकात शेकडो तरुण एकवटले होते. तसंच कोल्हापुरातही तरुणांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. कन्नड व्यावसायिकांचे हॉटेल्स बंद करण्यात आली.

बेळगावातील अनगोळ येथे पहाटे 2.30 वाजता काही अनोळखी लोकांनी संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. संगोळी रायण्णा यांचा हा पुतळा 8 फूट उंचीचा असून तो मिरवणुकांमध्ये वापरवा जातो. हा पुतळा संगोळी रायण्णा सेनेच्या स्थानिक अध्यक्षांच्या घराच्या व्हरांड्यात ठेवलेला होता.

बेळगावात चेन्नमा सर्कल इथं कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती च्या लोकांना अटक करावी,ही मागणी करण्यात येत आहे.

तसेच महाराष्ट्रात कन्नड भाषिकांविरोधात सुरू असलेल्या प्रतिक्रिया वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यात येत आहे दरम्यान बेळगावात चेन्नमा सर्कल, धर्मवीर संभाजी राजे चौक अशा मुख्य ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बेळगावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केलं आहे. शनिवारी सकाळी 8 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे.

संपूर्ण शहरामध्ये प्रतिबंधात्मक सूचना दिल्या असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं बेळगावचे पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.

रस्त्यावर उतरून घोषणा देणाऱ्या 27 जणांना आज बेळगाव न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. या सर्वांच्या वतीने वकील महेश बिर्जे आणि वकील शंकर पाटील यांनी बाजू मांडली.

बेळगावातील शिवाजी उद्यान इथं निषेध मोर्चा काढण्यासाठी जमलेल्या लोकांची पोलिसांनी अडवणूक करत मोर्चाला परवानगी नाकारली. तेथेच महिलांनी ठिय्या आंदोलन करत अटक केलेल्या तरुणांना सोडण्याची मागणी केली.

बंगळुरु इथं छ. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांवर अजूनही कारवाई नाही त्यामुळं बेळगाव आणि परिसरात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

पोलिसांनी श्रीराम सेना हिंदूस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह 25 ते 30 शिवभक्तांना मध्यरात्री अटक केली आहे.

उदयनराजे भोसले आणि संभाजी राजेंच्या प्रतिक्रिया

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी लिहिलं आहे की,संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी.

तर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनीही संतप्त भावना व्यक्त केली आहे ते लिहितात की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.

विटंबना सहन करणार नाही- छगन भुजबळ

"महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही", असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

कर्नाटक सरकारवर टीका करताना भुजबळ पुढे म्हणाले, "बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो.

केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकांच्या अगोदर 'छत्रपतींचा आशिर्वाद' असे म्हणत जाहिरातबाजी केली आता मात्र त्यांच्या सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का..? कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल."

गुन्हेगाराला तातडीनं अटक व्हावी - एकनाथ शिंदे

शिवसेना नेते आणि सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे."

"कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय, त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

"मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही," असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी'हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)