जयपूर: सेल्फी घेताना वीज अंगावर पडली, 11 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
राजस्थानची राजधानी जयपूरसह उत्तर भारतातल्या अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. राजस्थानमध्ये वीज पडून किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
जयपूरमध्ये 11 जणांचा सेल्फी घेताना वीज पडून मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा हे लोक आमेर किल्ल्याच्या वॉच टॉवरवरती सेल्फी घेत होते.
हा अपघात घडला तेव्हा जवळपास 27 लोक किल्ल्याचा मीनार आणि भिंतीवर होते. जेव्हा वीज पडली तेव्हा त्यातल्या काही जणांनी कथितरीत्या खाली उडी मारली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की मरणाऱ्यांमध्ये बहुतांश तरुण मुलं होती.
बीबीसीचे सहकारी मोहर सिंह मीणा यांनी जयपुरच्या कलेक्टरांशी याबद्दल बातचीत केली.
कलेक्टर अंतर सिंह नेहरा यांनी बीबीसीला सांगितलं की, "11 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 11 जण जखमी झालेत. त्यांच्यावर सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. राज्याच्या दुसऱ्या भागात, झालवाडमध्ये एक, बारांमध्ये एक आणि कोटामध्ये आणखी चार मुलांचा मृत्यू झाला आहे. कोटामध्ये आठ मुलं जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत."
धौलपुरमध्येही तीन मुलांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाने म्हटलंय.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या घटनांवर शोक व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशात वीज पडून 42 जणांचा मृत्यू
उत्तर भारतात वीज पडून लोकांचे जीव जाण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. बीबीसीचे सहकारी पत्रकार समीरात्मज मिश्र यांनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये रविवारी, 11 जुलैला झालेल्या जोरदार पावसात राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून 42 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची संख्या वाढूही शकते.
आपत्ती व्यवस्थापन आयुक्त कार्यालयाच्या कंट्रोल रूमने दिलेल्या माहितीनुसार पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये वीज पडून मरणाऱ्यांची संख्या 42 आहे.
23 लोक गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. याव्यतिरिक्त 249 जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि 20 जनावरं जखमी झालेत.
एकट्या प्रयागराजमध्ये 13 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
वीज अंगावर पडू नये म्हणून...
दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं. त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एनसीआरबीची आकडेवारी पाहिल्यास भारतात 2017 मध्ये 2885, 2018 मध्ये 2357 आणि 2019मध्ये 2,876 इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे.
आता आपण वीज अंगावर पडणार, हे आपल्या लक्षात कसं येऊ शकतं, वीज अंगावर पडू नये यासाठी काय करावं आणि काय करू नये, तसंच एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यानंतर आपण काय प्रथमोपचार करू शकतो, याची माहिती जाणून घेणार आहोत.
सुरुवातीला तुम्ही घराबाहेर असाल तर काय करायचं आणि काय करायचं नाही हे पाहूया.
- वीजा चमकत असताना जर बाहेर असाल, तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या. बंदिस्त इमारत, गुहा, खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो.
- सुरक्षित आश्रय उपलब्ध झाला नाही, तर उंचीच्या जागांखाली आश्रय घेणं टाळा. जसं की टेकडी, पर्वत यांच्याखाली आश्रय घेऊ नका.
- सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे वीजा चमकत असतांना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं. कारण उंच झाडे स्वत:ला वीजेकडे आकर्षित करतात.
- पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेउन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचा जमिनीशी कमीतकमी संपर्क येईल, याची खात्री करून घ्या.
- कार्यालयं, दुकानं, यांची दारं-खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचा बंद करा.
- वीजा चमकत असतांना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास, अंगावरील केस उभे राहिल्यास, त्वचेला मुंग्या किंवा झिणझिण्या आल्यास, तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.
- धातुंच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा.
- धरणं, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब राहा.
- टेलिफोन किंवा वीजेच्या खांबांखाली थांबू नका. ते विजेला आकर्षित करतात.
- वीजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका.
- लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका.
- जर तुम्ही चार ते पाच जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
• सायकल, मोटरसायकल, उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा.
घरात असल्यास घ्यायची खबरदारी
आता तुम्ही घरात असाल तर काय करायचं आणि काय नाही हे पाहूया...
• हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी (जनावरांना चारणे, मासेमारीसाठी) बाहेर पडू नका. घरातचं थांबा आणि प्रवास टाळा.
• घराच्या खिडक्या, दारं यापासून लांब राहा. धातूच्या वस्तूंचा वापर करू नका.
• वीजा चमकत असताना हेयरड्रायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझरसारखी विद्युत उपकरणे चालू करू नका. कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला वीजेचा धक्का बसू शकतो.
• टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरांवरील तारांमधून वाहू शकते.
• मुलं आणि पाळीव प्राणी घरात असतील याची खात्री करून घ्या.
• वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. उदाहरणार्थ- आंघोळ, भांडी धुणं वगैरे. कारण वीजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईप्समधून वाहू शकतो.
• इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा.
वीज पडल्यानंतर काय करायचं?
एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता. यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता आणि वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता. असा स्पर्श करणं सुरक्षित असतं. यासाठी...
- बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना, हृदयाचे ठोके पडताहेत ना ते अगोदर तपासून पाहा.
- जर व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबला असेल, तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्या.
- हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डिआक कॉम्प्रेशनचा वापर करा.
- अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा किंवा इतर काही जखमा आहेत का ते तपासून पाहा.
- गरज पडल्यास संबंधिताला दवाखान्यात घेऊन जा.
- 1078 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या. शक्य असल्याल बाधिताला दवाखान्यात घेऊन जा.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








