You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमध्ये शीख मुलींना जबरदस्तीनं मुस्लीम बनवून लग्न केलं जातंय? - ग्राउंड रिपोर्ट
- Author, माजीद जहाँगीर
- Role, श्रीनगरहून, बीबीसी हिंदीसाठी
काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये शीख समुदायानं गंभीर आरोप केले. त्यांच्या समाजातील मुलींना बळजबरी मुस्लीम धर्म स्वीकारायला लावून त्यांना मुस्लीम धर्मातील मुलांशी लग्न करण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
गेल्या आठवड्यामध्ये शीख समुदायाच्या दोन मुलींचं बळजबरीनं धर्मांतर आणि लग्नाचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर शीख समुदायाच्या वतीनं हे आरोप करण्यात आले.
दनमित कौर आणि मनमित कौर या दोन मुली या वादाच्या केंद्रस्थानी आहेत.
या वादामुळं काही शीख संघटनांनी जम्मू-काश्मीर आणि दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि या मुलींना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांकडे (आई-वडील) परत पाठवावं, ही मागणी करण्यात आली.
मात्र, पोलीस आणि या दोन्ही मुलींनी या आरोपांचं खंडन केलं आहे.
मग नेमकं प्रकरण तरी काय आहे? असा प्रश्न निर्माण होतो. सर्वात आधी जाणून घेऊयात, दनमित कौर यांच्याबाबत.
वाद नेमका सुरू कसा झाला?
28 वर्षांच्या दनमित कौर 6 जून रोजी घरातून निघाल्या. त्यानंतर काही मिनिटांमध्येच त्यांनी बहिणीला फोन करून, 'मला शोधण्याचा प्रयत्न करू नका', असं सांगितलं. त्यानंतर दनमित कौर यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.
श्रीनगरच्या महजूर नगरमध्ये राहणाऱ्या दनमित कौरच्या घरी आम्ही दुपारच्या दरम्यान पोहोचलो. आम्ही गेटमधून घरात गेलो तर सगळीकडं शांतता पसरलेली होती.
घरात आमची भेट दनमित कौर यांचे काका हुकूमत सिंग यांच्याशी झाली.
दनमितचे आई-वडील त्यावेळी काश्मीरमध्ये उपस्थित नव्हते. दनमित यांच्या भावाशीही आमची भेट होऊ शकली नाही.
"सहा जूनची ही गोष्ट आहे. दनमित सायंकाळी घराबाहेर गेल्या आणि बहिणीला फोन केला. रडत-रडत त्या म्हणाल्या, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. पण एका तासाच्या आत आम्ही दनमितला श्रीनगरच्या बगात परिसरात त्यांचे प्रियकर मुझफ्फर शाबान याच्या घरून पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं. पोलिस त्यांना श्रीनगरच्या सदर ठाण्यात घेऊन गेले. त्यावेळी दनमित, मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहीन असं, म्हणाल्या होत्या,'' अशी माहिती हुकूमत सिंग यांनी बीबीसी बरोबर बोलताना दिली.
मात्र हुकूमत सिंग यांनी या प्रकरणी पोलिसांवरही आरोप केले आहेत. एसएचओ दनमीतला सोबत आत घेऊन गेले आणि तिचं 'ब्रेनवॉश' केलं असं ते म्हणाले.
"दोन तासांत मुलीच्या वर्तनात अचानक बदल झाला. मला आई-वडिलांच्या घरात सुरक्षित वाटत नाही, असं त्या म्हणाल्या,'' असं त्यांनी सांगितलं.
पोलिस याबाबत अधिकृतरित्या काहीही बोलायला तयार नाहीत. पण, तसं असतं तर त्या घरातून पळूनच का गेल्या असत्या? असं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका पोलिसानं म्हटलं.
वैद्यकीय-कायदेशीर औपचारिकतांमध्ये वेळच लागतो, असंही पोलिस म्हणाले.
पोलिसांनी रात्रभर त्यांना महिला पोलिस ठाण्यात ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांकडं सोपवलं, असं हुकूमत सिंग म्हणाले
त्यांच्या मते, दनमितचे कुटुंबीय त्यांना सुमारे चार दिवसांनंतर जम्मूला घेऊन गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते दनमितला परत श्रीनगरला घेऊन आले.
''त्यानंतर काही दिवसांनी दनमितनं पुन्हा त्यांना पंजाबच्या सुवर्ण मंदिरात जायचं आहे, असं म्हटलं''
"दनमितची इच्छा पूर्ण करण्यासाठी आई-वडील त्यांना पंजाबच्या गोल्डन टेम्पल (हरमंदिर साहिब, अमृतसर) मध्ये घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी परत जम्मूला घेऊन आले," असं त्यांचे काका म्हणाले.
जम्मूला परत आल्यानंतर रात्री दोन वाजता पोलिसांचं पथक दनमितच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचलं. पहाटे जवळपास 20 पोलिस कर्मचारी घरात आले. त्यांनी दनमितला बळजबरी गाडीत बसवलं आणि त्यानंतर श्रीनगरच्या एका कनिष्ठ न्यायालयात तिला हजर केल्याचं, हुकूमत सिंग यांनी सांगितलं.
यावेळी मुलालाही (दनमितबरोबर लग्न केल्याचा दावा केलेला मुलगा मुझफ्फर शाबान) न्यायालयात सादर करण्यात आलं. त्याच्याबोबर कुटुंबातील सदस्य होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना न्यायालयात जाऊ दिलं नाही, असं दनमितचे मोठे काका हरभजन सिंह म्हणाले.
"आत न्यायाधीशांनी काय निर्णय दिला हे आम्हाला माहिती नाही. न्यायालयातच मुलीला मुलाच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर मुलीला आणि मुलाला कोणत्या दारानं बाहेर काढण्यात आलं, हेही आमहाल कळलं नाही,'' असं हरभजन म्हणाले.
मात्र दनमित सांगत असलेली कहाणी मात्र वेगळीच आहे.
काही दिवसांपूर्वी दनमितचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. दनमितचे काका हुकूमत सिंग आणि शीख संघटनेचे जगमोहन रैना यांनी तो व्हीडिओ त्यांचाच असल्याचं म्हटलं आहे.
व्हीडिओतून दनमितचा दावा
सध्या ज्या दोन मुलींच्या बळजबरी धर्मांतराचा मुद्दा सोशल मीडियावर सुरू आहे, त्या दोन मुलींपैकी मी एकआहे, असं दनमित व्हीडिओमध्ये सुरुवातीला म्हणताना दिसत आहेत. बळजबरी लग्न आणि धर्मांतराचा मुद्दा पूर्णपणे चुकीचा असल्याचंही त्यांनी व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
2012 मध्येच इस्लाम धर्म स्वीकारून 2014 मध्ये मित्र मुझफ्फरबरोबर मी माझ्या मर्जीनं लग्न केलं होतं. या सर्वांचे पुरावे असलेली कागदपत्रंही माझ्याकडं आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
दनमितनं जून महिन्यात सहा तारखेला घर सोडलं आणि कुटुंबीयांना फोन करून शोधू नका असं सांगितलं. मी घरातून माझ्या मर्जीनं गेले होते, असं कारणही दनमितनं व्हीडिओद्वारे सांगितलं.
फोन केल्यानंतर दोन तासांच्या आत पोलिसांनी मला पकडलं आणि आई वडिलांच्या ताब्यात दिलं असा दावाही दनमितनं केला आहे.
कुटुंबीय मला आधी जम्मूला आणि नंतर पंजाबला घेऊन गेले. त्याठिकाणी अनेक शीख संघटनांबरोबर माझी भेट घालून दिली. माझं 'ब्रेनवॉश' करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दनमितनं पतीच्या विरोधात व्हीडिओद्वारे जबाब द्यावा यासाठीही प्रयत्न करण्याल आला होता. पण मी त्यासाठी नकार दिल्याचं दनमित म्हणाल्या.
''मी 29 वर्षांची सुशिक्षित मुलगी आहे. मला चांगलं वाईट याची जाणीव आहे. त्यामुळं या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका,'' असंही दनमित यांनी म्हटलं आहे.
हा व्हीडिओ दनमित यांनी 28 जून 2021 ला तयार केला होता. न्यायालयात गेल्यानंतर दोन दिवसांनी तो तयार केला होता, असं तिचे काका हुकूमत सिंग यांनी सांगितलं.
दनमित यांचा लहान भाऊ 20 वर्षीय किशन सिंग यांनी बीबीसीला याप्रकरणी फोनवरून माहिती दिली. बहीणीच्या या प्रकरणामुळं त्याला समाजामध्ये 'सामाजिक कलंक' असल्यासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचं ते म्हणाले.
माझ्या बहिणीनं व्हीडिओत 2012 मध्ये मुस्लीम धर्म स्वीकारला आणि 2014 मध्ये मुस्लीम मुलाशी विवाह केल्याचा दावा केला आहे. हे खरं असेल तर मग ती 2021 पर्यंत शीख कुटुंबामध्ये कशासाठी राहिली? असा प्रश्न किशन यांनी उपस्थित केला आहे. व्हीडिओत म्हटलेलं सगळंकाही खोटं असल्याचंही ते म्हणाले.
आम्ही जेव्हा दनमित यांनी सांगितल्यानुसार गुरुवारी त्यांचे पती मुझफ्फर शाबानच्या श्रीनगरमधील बागात परिसरात असलेल्या घरी पोहोचलो, तेव्हा त्यांच्या घरी कुलूप लावलेलं आढळून आलं.
मुझफ्फर यांचे कुटुंबीय एका आठवड्यापासून घर सोडून निघून गेले असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. बऱ्याच प्रयत्नांनंतरही मुझफ्फरशी संपर्क होऊ शकला नुाही.
मनमित कौरचं प्रकरण
दनमित कौरचं घर असलेल्या महजूर नगरपासून सात किलोमीटर अंतरावर रैनावाडी परिसरात 19 वर्षीय शीख तरुणी मनमित कौर राहते. तिचंही असंच एक प्रकरण शनिवारी (27 जून) ला समोर आलं.
दनमितनं व्हीडिओमध्ये ज्या दुसऱ्या मुलीचा उल्लेख केला आहे, ती हीच मनमित कौर आहे.
मनमित कौरनं शाहीद नझीर नावाच्या 28 वर्षीय तरुणाबरोबर स्वतःच्या मर्जीनं लग्न केल्याचा दावा केला आहे. मनमितच्या कुटुंबीयांना मात्र हे नातं मान्य नव्हतं. त्यांनी पोलिसांत मुलीच्या अपहरणाची आणि सोबतच बळजबरी धर्मांतर आणि लग्नाची तक्रार दिली.
शाहीद आणि मनमित दोघंही रैनावाडी परिसरातच राहतात. शाहीद ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ड्रायव्हर आहे.
मनमितच्या वडिलांनी शाहीद नझीरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. शाहीद नझीरनं मुलीचं अपहरण केल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शाहीद आणि मनमित दोघंही स्वतः 23 जून 2021 रोजी पोलिसांसमोर हजर झाले होते, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
दरम्यान, पोलिसांनी दोघांना शनिवारी (26 जून) श्रीनगरच्या एका न्यायालयात हजर केलं.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत श्रीनगरच्या कनिष्ठ न्यायायलयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
या दरम्यान शीख समुदायानं न्यायालयासमोर आंदोलन केलं. मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्याची मागणी आणि घोषणा ते करत होते.
गुरूद्वारा व्यवस्थापन समिती बडगामचे अध्यक्ष संतपाल सिंग यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मुलीला कोर्टात आणलं आणि तिचा जबाब नोंदवण्यात आला, त्यावेळी तिच्या कुटुंबीयांना आत का जाऊ दिलं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"हा कसा न्याय आहे? अशा न्यायालयाकडून आपण न्यायाची अपेक्षा ठेऊ शकतो का?"असंही ते म्हणाले.
मात्र, न्यायालय जेव्हा एखाद्याचा जबाब नोंदवतं त्यावेळी त्याठिकाणी कोणालाही आत जाण्याची परवानगी नसतेच, असं काश्मीरचे ज्येष्ठ वकील रियाझ खावर यांनी सांगितलं.
मनमितनं न्यायालयात नेमका काय जबाब दिला हे अद्याप समोर आलेलं नाही.
मनमितला कुठं जायचं आहे, तिथं ती जाऊ शकते असं न्यायाधीशांनी मनमितला न्यायालयात सांगितलं होतं, अशी माहिती पोलिसांतील सुत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे.
मनमित कौरला शनिवारी रात्री तिच्या आई-वडिलांकडं पाठवण्यात आलं.
या घडामोडींच्या दरम्यान सोशल मीडियावरही एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. हा व्हीडिओ मनमितचा असल्याचा दावा केला जात आहे.
बीबीसी हा व्हीडिओ खरा असल्याचा दावा करत नाही. मात्र, अद्याप मनमितचे आई-वडील किंवा शीख संघटनांनी या व्हीडिओचं खंडनही केलेलं नाही.
"मी एका वर्षापूर्वी माझ्या मर्जीनं मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. शाहीद नझीर भट्ट बरोबर माझा निकाह झाला आहे. आता माझे कुटुंबीय मला त्रास देत असून रैनावाडीचे एसएचओदेखील मला त्रास देत आहेत. मला काही झालं किंवा माझ्या पतीला हात लावला तर मी जीव देईल, त्याची जबाबदारी माझे कुटुंबीय आणि रैनावाडीच्या एचएसओची असेल, " असं मनमितनं व्हीडिओत म्हटलं आहे.
मंगळवारी मनमितच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह शीख धर्मातील सुखप्रित सिंग नावाच्या व्यक्तीबरोबर लावून दिला. या लग्नानंतर तिला दिल्लीला नेण्यात आलं आहे. अकाली दलच्या नेत्यांनी श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बीबीसीनं मनमित कौरचे वडील राजिंदर सिंग बल्ली यांच्याशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन बंद येत राहिला. राजिंदर सिंगही काश्मीरध्ये उपस्थित नसल्याचं आम्हाला कळलं.
मनमितचं तर तिच्या कुटुंबीयांनी लग्न लावून दिलं. पण शाहीद अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे.
शाहीद यांचे वकील जमशेद गुलजार यांनी त्याचं काम केवळ शाहीद यांना जामीन मिळवून देणं हे असल्याचं म्हटलं.
शाहीदच्या वकिलांनी या प्रकरणी आणखी काहीही बोलण्यास नकार दिला.
पाच तारखेला शाहीदच्या जामीन प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
निकाहची कागदपत्रं
मनमित कौरच्या लग्नाला विरोध करणाऱ्या शीख संघटनांनी शाहीदचं वय 50 पेक्षा अधिक आणि मुलीचं केवळ 17-18 वर्ष असल्याचा दावा केला आबे. पण शाहीदच्या कुटुंबीयांनी त्यांचा जन्म 1991 मध्ये झाला होता, असा दावा केला आहे.
''बळजबरी धर्मांतर आणि लग्नाचा मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे,'' असं एका पोलिस अधिकाऱ्यानंही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.
शाहीद नझीरच्या कुटुंबीयांनी मनमित कौर आणि शाहीद यांच्या निकाहची कागदपत्रंही दाखवली, त्याची कॉपी बीबीसीकडं उपलब्ध आहे.
मात्र, कुटुंबीयांनी अधिकृतरित्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
त्यांचा मुलगा अद्याप पोलिसांच्या ताब्यात असून त्याचा जीव धोक्यात आहे, त्यामुळं याबाबत काहीही बोलू शकत नसल्याचं ते म्हणाले.
बीबीसीकडं असलेल्या कागदपत्रांमध्ये निकाहची कागदपत्रं आणि करार यांचा समावेश आहे.
निकाहनाम्यानुसार, मनमित आणि शाहीद यांचा विवाह पाच जूनला झाला होता. त्यानंतर दोघांनी बारामुल्ला जिल्ह्याच्या न्यायालयात 22 जून 2021 ला एका करारावर सह्यादेखील केल्या होत्या. त्यात मनमितनं तिच्या मर्जीनं मुस्लीम धर्म स्वीकारला असून शाहीदबरोबर तिच्या मर्जीनंच लग्न केल्याचं मान्य केलं आहे.
विरह पाल कौरची कहाणी
मनमित आणि दनमित यांची प्रकरणं चर्चेत असतानाच, विरह पाल कौर नावाच्या आणखी एखा शीख मुलीचं प्रकरणही काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं.
विरह पाल कौरनंही एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात तिनंही लग्नाचा उल्लेख करत शीख मुलींच्या बळजबरी धर्मांतर आणि लग्नाच्या आरोपांचं खंडन केलं होतं.
28 वर्षांच्या विरह कौर यांनी 2021 मध्ये मर्जीनं मुस्लीम धर्म स्वीकारला आणि लग्नही केलं असल्याचं व्हीडिओत म्हटलं आहे.
विरह पाल कौर यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतर स्वतःचं नाव खदीजा ठेवलं आहे.
त्यांचा विवाह बडगाममधीन पंजान गावातील 32 वर्षीय मंजूर अहमद यांच्याबरोबर झाला आहे.
2012 पासून दोघं एकमेकांवर प्रेम करत होते, असं मंजूर अहमद यांनी सांगितलं. खदीजा सध्या पतीच्या घरी राहतात.
"मी 2014 पासून मुस्लीम धर्माचा अवलंब केला होता. मी घरात पाच वेळा नमाज पठण करत होते, तसंच रोजेही ठेवत होते. माझ्या घरात माझी बहीण आणि मावशीला आधीच माझ्या अफेयरबाबत माहिती होती. याशिवाय 'लव्ह-जिहाद'ची सुरू असलेली चर्चा ही वायफळ आहे. बंदुकीचा धाक दगाखवून मी मुस्लीम धर्म स्वीकारलेला नाही किंवा लग्नही केलेलं नाही," असं खदीजा यांनी म्हटलं.
विरह (खदीजा) चे पती मंजूर यांनी आम्हाला सांगितलं होतं की, त्यांचा विवाह यावर्षी जानेवारी महिन्यात झाला होता.
विरह यांनी शीख धर्म बदलून मुस्लीम धर्म स्वीकारला नसता तरी, त्यांच्याशी लग्न करण्यात मला अडचण नव्हती असं मंजूर म्हणाले.
मंजूर एमएससी पर्यंत शिकलेले आहेत. तर खदीजानं पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा केला आहे.
शीख संघटनांचे आरोप
गेल्या शनिवारी (26 जून) श्रीनगरच्या न्यायालयाबाहेर झालेल्या शिखांच्या आंदोलन आणि गोंधळानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (27 जून) दिल्ली अकाली दलाचे प्रवक्ते आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा हे श्रीनगरला आले होते.
स्थानिक शीख नेत्यांसह त्यांनी आंदोलन केलं. काश्मीरमध्ये शीख तरुणींचं बंदुकीच्या धाकानं अपहरण करून त्यांना बळजबरी धर्मांतर करायला भाग पाडलं जात आहे. त्यानंतर त्यांचं मुस्लीम मुलांबरोबर लग्न लावलं जातं, असं ते म्हणाले.
बळजबरी धर्मांतराचे प्रकार थांबवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येही देशातील इतर राज्यांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे, अशी मागणी सिरसा यांनी श्रीनगरमध्ये आंदोलनात केली.
मनमित कौर यांना शनिवारी रात्रीच त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. पण तरीही रविवारी-सोमवारीही याप्रकरणी वक्तव्यं समोर येत होती.
सिरसा यांनी सर्वात आधी 26 जूनला ट्विट केलं होतं. त्यात ज्या शीख तरुणीबद्दल बोललं जात आहे, ते प्रेम प्रकरण नसून बळजबरी विवाहाचं प्रकरण असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच लग्न करणाऱ्या व्यक्तीचं वय 60 असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
न्यायालयानं चुकीच्या पद्धतीनं मुलीला एका मुस्लीम व्यक्तीच्या ताब्यात दिल्याचं, त्यांनी जम्मू-काश्मीरचे उप-राज्यपाल मनोज सिन्हा यांना टॅग करत म्हटलं. मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचंही ते म्हणाले
त्यांनी उपराज्यपालांकडं या प्रकरणी दखल देण्याची विनंतीही केली.
सिरसा यांच्यानंतर अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली. एका शीख तरुणीचं अपहरण आणि बळजबरी विवाह लावल्याच्या प्रकरणाने दुःख झाल्याचं ते म्हणाले. त्यांनी लगेचच सिरसा यांना श्रीनगरला जाण्याचे आदेश दिले.
27 जूनला रविवारी सिरसा श्रीनगरला पोहोचले. त्यांनी स्थानिकांसह आंदोलन केलं आणि भारत सरकारनं गांभीर्यानं अशी प्रकरणं हाताळावी अशी विनंती केली.
सीएएच्या विरोधात झालेल्या आंदोलनात शिखांनी मुस्लीम तरुणींना घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली होती. पण श्रीनगरमध्ये एकही मुस्लीम नेता या प्रकरणी शिखांच्या समर्थनार्थ पुढं आला नाही, असं ते म्हणाले.
या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असल्याचं ते म्हणाले. वेगळ्या धर्मातील मुलाशी विवाह करण्यासाठी मुलीला आई-वडिलांची परवानगी घेणं गरजेचं असेल, असा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सारखा कायदा तयार करण्याची मागणी केल्याचंही ते म्हणाले.
या प्रकरणावर बारकाईनं लक्ष असल्याचं आश्वासन अमित शहांनी दिल्याचं, सिरसा म्हणाले.
सिरसा यांनी जम्मू-कश्मीरचे पोलिस विभागाचे प्रमुख दिलबाग सिंग यांना भेटल्याचाही दावा केला होता. ट्विटमध्येही त्याची माहिती दिली होती.
सिरसा आणि अब्दुल्ला ट्विटरवर आमनेसामने
शीख आणि मुस्लीम यांच्यात भिंत उभी करण्याचा प्रयत्न केल्यास राज्याचं मोठं नुकसान होईल, असं जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले.
"काश्मीरमध्ये शीख आणि मुस्लीम यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास ते जम्मू-काश्मीरसाठी कधीही भरुन न निघणारं नुकसान असेल. दोन्ही समुदायांनी चांगल्या वाईट काळात एकमेकांना साथ दिली आहे. अनेक वर्षे जुन्या या नात्यानं अनेक अडचणींचा सामना केला आहे, " असं ते ट्विटमध्ये म्हणाले.
कुणी कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याच्या विरोधात कारवाई व्हावी, असंही ते म्हणाले.
"कुणीही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही. पण तुमच्या समुदायाच्या अशा लोकांचा बहिष्कार करून इथं होणाऱ्या बळजबरीच्या धर्मांतरावर बंदी आणण्याची वेळ आली आहे," असं सिरसा यांनी ओमर अब्दुल्लांना प्रत्युत्तर देताना म्हटलं.
स्थानिक शीख संघटना काय म्हणतात?
"बंदुकीच्या धाकाचा विषयच नाही. ही चुकीची वक्तव्य आहेत. ती आली कुठून? याचा शोध आम्ही घेत आहोत. या वक्तव्याची चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. बाहेरचे काही शीख नेते काश्मीरमध्ये येऊन इथं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही तसं होऊ देणार नाही," असं सिरसा यांच्या आरोपांचं खंडन करत सर्वपक्षीय शीख समन्वय समितीचे अध्यक्ष जगमोहन सिंग रैना म्हणाले.
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी मंगळवारी श्रीनगरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. दिल्लीहून आलेल्या एखाद्या शिखानं मुस्लीमांना दुखावणारं वक्तव्य केलं असेल तर, त्यासाठी आम्ही माफी मागतो, असं ते म्हणाले.
अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत
सिरसा आणि इतर काही शीख नेत्यांनी कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'मनमितची कस्टडी मुस्लीम व्यक्तीला देणं योग्य नाही,' असं ते म्हणाले. तसंच त्यांनी उप-राज्यपाल मनोज सिन्हा यांचे आभार मानले.
"श्रीनगरमध्ये शीख मुलींच्या बळजबरी विवाह प्रकरणात निर्देश जारी करण्यासाठी मी उप-राज्यपाल मनोज सिन्हा यांचे आभार मानतो. ज्या मुलीचं बळजबरी धर्मांतर करण्यात आलं आहे, तिला कुटुंबीयांकडं सोपवलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं'' असं सिरसा म्हणाले.
न्यायालयानं आधी मुलीचा ताबा मुस्लीम व्यक्तीला (ज्यांच्याशी लग्नाचा मुलीनं दावा केला आहे) दिला, मग न्यायालयानं कोणत्या परिस्थितीमुळं निर्णय बदलत कस्टडी मुलीच्या आई-वडिलांना दिली. सिरसा दावा करत आहेत, तसे काही आदेश उप-राज्यपालांच्या कार्यालयानं दिले का? असा प्रश्न यामुळं उपस्थित होतो.
शनिवारनंतर मनमित कोणत्याही माध्यमांसमोरही आलेली नाही.
मनमितचं लग्न ज्या मुस्लिम मुलाशी झालं तो शाहीद नझीर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचे कुटुंबीय एवढे घाबरले आहेत की, जास्त काही बोलायलाही तयार नाहीत.
एवढं सगळं होऊनही, पोलिसांचा एकही अधिकारी माध्यमांसमोर येऊन काहीही बोलायला तयार नाही.
हे बळजबरीनं धर्मांतर आणि लग्नाचं प्रकरण नसल्याचं पोलिस अधिकारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मान्य करत आहेत. पण कॅमेऱ्यासमोर बोलायला ते तयार नाहीत.
विरोधाचे सूर
पोलिस या प्रकरणामध्ये शांत असले तरी, शीख समुदायाच्या अनेक महिला या प्रकरणी त्यांचं मत मांडत आहेत.
"आम्ही ज्या समाजात राहतो तिथं अद्याप आम्ही हे निर्णय घ्यावे, एवढा हा समाज पुढारलेला नाही. आपण एकाच कुटुंबात राहतो. पण तरीही जेव्हा भावाचं लग्न होतं आणि घरात नवी सून किंवा वहिणी येते त्यावेळीही, त्यांचे विचार सारखे नसतात. इथं तर वेगवेगळे धर्म आणि समाज आहेत. आमचे विचारही वेगवेगळे आहेत. विचारांत मतभेद असणं ही सामान्य बाब आहे. पण अल्पसंख्याकांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता असते. विचार जर उच्च असतील तर आपल्या मर्जीनुसार काहीही करता येतं,'' असं श्रीनगरच्या एका महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक असलेल्या गुरमित कौर यांनी बीबीसी बरोबर बोलताना म्हटलं.
"मला माहिती नव्हतं की डीजीएमसी (दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक कमिटी) च्या निवडणुकीच्या अजेंड्यात महिलांवर ताबा ठेवणं हाही मुद्दा आहे. आपण एका धोकादायक वळणाकडं जात आहोत. शीख महिला असल्यानं माझ्यासाठी हे अत्यंत भयावह आहे," असं वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्या गुनीत कौर यांनी म्हटलं.
"आता मी शांत राहू शकत नाही. ज्या शीख महिलांनी हिंदुंशी विवाह केले आहे, त्यांना सर्वांनाही परत आणायला पाहिजे का? तसंच ज्या शीख पुरुषांनी इतर समाजाच्या महिलांशी लग्न केलं आहे त्यांचं काय? शिवाय विदेशात राहणाऱ्या आणि भारतीय नसणाऱ्यांशी लग्न करणाऱ्या शिखांचं काय?" असं खुशी कौर यांनी पोस्ट केलं.
"मान आणि लाज याची सर्व जबाबदारी महिलांच्या शरिरावर असते. मग त्या कोणत्याही धर्माच्या असो. दोन्ही बाजुचे लोक याला जय-पराजय या दृष्टीनं पाहतात. त्यांना हे लक्षात यायला हवं. त्यांना समजावून सर्वकाही विचार करून निर्णय घेता यायला हवा होता," असं जेएनयूमधून पीएचडी करणाऱ्या आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या जेबी सिंग यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)