SSC Board Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड

फोटो स्रोत, FACEBOOK/VARSHA GAIKWAD

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्ष रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल.

दहावीचा निकाल 'असा' लावला जाईल

  • विद्यार्थ्यांचे 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन - 30 गुण
  • विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन - 20 गुण
  • विद्यार्थ्याचा 9 वीचा विषयनिहाय अंतिम निकाल - 50 गुण

ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल, त्यांना कोव्हिड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील दोन परीक्षांमध्ये परीक्षेची संधी देण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जाईल.

दहावी, बारावी, कोरोना, परीक्षा, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

शाळास्तरावर गैरप्रकार किंवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जूनच्या अखेरपर्यंत निकाल घोषित करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सर्व शाळांनी वेळापत्रकाचं पालन करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

अशी असेल 11 वीची प्रवेश प्रक्रिया

11 वीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेतली जाणार आहे. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.

11 वी प्रवेश परीक्षा राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील आणि त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना 10 वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात गुरुवारी (27 मे) संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)