कोरोना: राहुल गांधींनी पश्चिम बंगालमधील सभा केल्या रद्द

फोटो स्रोत, Getty Images
भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. तिथं उर्वरित टप्प्यांसाठी राहुल गांधी यांच्या सभा नियोजित होत्या. मात्र, त्या रद्द करत असल्याचं राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सांगितलं.
राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील स्वत:च्या सभा रद्द करतानाच, इतर नेत्यांनाही असाच विचार करण्याचं आवाहन केलंय.

फोटो स्रोत, Twitter
राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता, पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा मी रद्द करत आहे. इतर पक्षातील नेत्यांनाही आवाहन करतो की, या स्थितीत सभा घेण्यानं होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करावा."
राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील प्रचारापासून स्वत:ला दूर ठेवलं होतं. पाचव्या टप्प्यासाठी 14 एप्रिलला त्यांनी पहिली सभा घेतली होती.
पश्चिम बंगालमध्ये पाच टप्प्यांचं मतदान पूर्ण झालं आहे. आणखी तीन टप्प्यांसाठीचं मतदान बाकी आहे. मात्र, कोरोनाचे आकडे वाढत असतानाही, पश्चिम बंगालमध्ये राजकीय सभा आणि रोड शो काही कमी होत नाहीत.

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

शनिवारी (17 एप्रिल) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना, दुसरीकडे पुढच्या टप्प्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी सभा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी रोड शो केला.
नरेंद्र मोदी हे पुढच्या आठवड्यात 22 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजीही पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत.

फोटो स्रोत, Twitter/BJP
22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यासाठी पश्चिम बंगालमध्ये मतदान आहे. याच दिवशी मोदी मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये सभा घेणार आहेत. तर 24 एप्रिल रोजी ते बोलपूर आणि दक्षिण कोलकात्यात सभा घेणार आहेत.
पश्चिम बंगालमधील कोरोनाची स्थिती पाहता, निवडणूक आयोगानं गेल्या शुक्रवारी प्रचारावर काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. आयोगाने आदेश दिलेत की, निवडणुकीचा प्रचार रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याऐवजी संध्याकाळी 7 वाजताच बंद करावा लागेल.

फोटो स्रोत, Twitter
त्याचसोबत, पुढच्या उर्वरीत तीन टप्प्यांसाठीचा प्रचार संपवण्याची वेळ मर्यादाही वाढवलीय. आता उर्वरीत टप्प्यातील प्रचार मतादानाच्या 72 तास आधीच संपवावा लागेल. याआधी याच अवधी 48 तासांचा होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उर्वरीत तीन टप्प्यातील मतदान एकाच दिवशी करण्याचं आवाहन निवडणूक आयोगाला केलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








