You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगाल निवडणूक : ममता बॅनर्जींनी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा असं का म्हटलं?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. मतदानादरम्यान कूचबिहार जिल्ह्यातल्या शीतलकुची या भागात सुरक्षादलानं केलेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये झालेल्या कथित हाणामारीत 18 वर्षीय आनंद बर्मनचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
या घटनेनंतर निवडणूक आयोगानं शीतलकुची विधानसभा क्षेत्रातील 125 आणि 126 मतदान केंद्रावरील मतदान स्थगित केलं आहे. निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्याच्या अहवालानंतर आयोगानं हे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगानं या घटेनचा सविस्तर अहवाल आणि व्हीडिओ फुटेज मागवलं आहे.
उत्तर बंगालच्या सिलीगुडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवडणूक रॅली सुरू असताना ही घटना घडली आहे.
'अमित शाह यांनी राजीनामा द्यावा'
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याप्रकरणी भाजपवर टीका केली आहे.
"आपला पराभव होणार हे निश्चित असल्यामुळे भाजप बॉम्ब आणि गोळीबाराकडे वळत आहे. अमित शाह यांनी राजीनामा द्यावा," अशी मागणी त्यांनी केली आहे.
अमित शाह यांच्या सांगण्यानुसार,केंद्रीय सुरक्षा दलानं गोळीबार केला, असा आरोपही ममता बॅनर्जींनी केला.
कूचबिहार जिल्ह्यातील भाजप नेते निशीथ प्रामाणिक यांनी या घटनेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
ते सांगतात, "ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या रॅलीत सुरक्षा दलांना घेराव घालण्यासंदर्भात सूचक असं वक्तव्य केलं होतं. आजची घटना त्याचाच परिणाम आहे. निवडणुकीत पराभव व्हायच्या भीतीमुळे तृणमूल काँग्रेस असं करत आहे."
नेमकं काय घडलं?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की,"काही लोकांनी सुरक्षा दलातील जवानांना घेरलं होतं आणि त्यांच्या हातातील बंदुका हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर मग जवानांनी फायरिंग सुरू केली आणि यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा दवाखान्यात नेताना रस्त्यात मृत्यू झाला. मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी माथाभांगा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. गोळीबारात जखमी झालेल्या 4 जणांनाही याच दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जोडापाटकी भागातल्या 126 क्रमांकाच्या मतदान केंद्राबाहेर घडली.
तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान भाजपच्या समर्थनार्थ काम करत आहेत.
तृणमूलच्या एका कार्यकर्त्यानं स्थानिक पत्रकारांना सांगितलं, "मतदान करण्यासाठी लोक शांततेत मतदान केंद्रांकडे चालले होते. त्यावेळी जवानांनी अचानक बेधुंद गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना माथाभांगा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे."
एक स्थानिक व्यक्तीनं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, "परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळी चालवणं गरजेचंच होतं, तर ती पायावर चालवता आली असती. पण असं न करता लोकांच्या छातीवर गोळी का मारली?"
पशिचम बंगालचे निवडणूक पर्यवेक्षक विवेक दुबे यांनी म्हटलं, "या भागात तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू होता. मतदानादरम्यान अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना घेराव घालण्यात आला. तसंच त्यांच्याकडील रायफल्स हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर मग गोळीबार झाला."
निवडणूक आयोगानं म्हटलंय की, तीनशे ते चारशे लोकांनी सुरक्षा जलाच्या जवानांना घेरलं होतं. त्यामुळे मग जवानांना फायरिंग करावी लागली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)