You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निर्मला सीतारामन: 'नजरचूक' की 'एप्रिल फूल'? अर्थमंत्र्यांना लोकांचा प्रश्न- सोशल
केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून छोट्या बचतींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयात मोठा बदल केल्याचं आज (1 एप्रिल) जाहीर केलं.
आता या बदललेल्या निर्णयावर लोक व्यक्त होत आहेत. अनेक लोकांनी हे एप्रिल फूल तर नाही ना असा प्रश्न विचारला आहे. तर काही जणांनी हा निर्णय बंगालच्या निवडणुकांमुळे बदलला असावा अशी शंका व्यक्त केली आहे.
या तुमच्या नजरचुकीमुळे अनेक जणांना हार्टअॅटॅक येण्याची वेळ आली असं मत पत्रकार अंजली इस्टवाल यांनी व्यक्त केलं आहे.
अनेकदा तपासणी होऊनही अशी चूक कशी होऊ शकते? हे सरकारनं केलेलं एप्रिल फूल तर नाही ना असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
पत्रकार सागरिका घोष यांनी या नजरचुकीच्या कारणावर शंका व्यक्त केली आहे. उजवा हात काय करतोय ते डाव्या हाताला माहिती नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी या प्रकाराचं वर्णन केलं आहे.
हा निर्णय नजरचुकीने घेतला की निर्मला सीतारामन यांना नजरचुकीने अर्थमंत्री केलं असा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी विचारला आहे.
मंत्रालयाने घेतलेला निर्णय नजरचूक होती की सगळं मंत्रालयच एक नजरचूक आहे असा प्रश्न राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी विचारला आहे.
तर खासगी क्षेत्रात बचत सुरक्षित नाही अशावेळेस अल्पबचत वाल्यांनी कुठं जावं असा प्रश्न प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांनी विचारला आहे.
व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल मध्य प्रदेशमधील मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
कालच्या निर्णयानुसार पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफवरील वार्षिक व्याजदर 7.1 टक्क्यांवरून 6.4 टक्के करण्यात आला होता. एका वर्षाच्या कालावधीसाठी बॅकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदर हा तिमाहीला 5.5 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर करण्यात आला होता.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनांवरील व्याजदरातही कपात करण्यात आली होती.
पीपीएफ म्हणजे काय?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात PPF वरील वार्षिक व्याज दर 7.1% वरून 6.4% वर आणण्यात आला आहे. पीपीएफला करबचतीचा फायदा मिळत असल्यामुळे आणि सरकारी योजनेच्या संरक्षणामुळे भारतात मध्यमवर्गीय लोकांचं हे आवडतं बचतीचं साधन आहे. विविध सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये आपल्याला पीपीएफ खातं उघडता येतं.
दरवर्षी 500 ते 1,50,000 रुपये पीपीएफ खात्यात गुंतवता येतात. खातं सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी किमान गुंतवणूक आवश्यक आहे. पीपीएफ गुंतवणूक आणि त्यावर मिळणारं व्याज करमुक्त आहे. दरवर्षी 31 मार्चला गुंतवणुकीच्या वर्षात केंद्रसरकारन निर्धारित केलेल्या व्याजदराने तुमच्या खात्यात व्याज जमा होते.
पोस्ट ऑफिस आणि बँकेतून पीपीएफ खातं उघडता येतं. मात्र, एका व्यक्तीला एकच पीपीएफ खातं उघडता येतं. अल्पवयीन मुलं किंवा वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी घरातली कमावती व्यक्ती वेगळं खातं उघडू शकतं. मात्र, तेही अल्पवयीन मुलं किंवा वरिष्ठ नागरिकाच्या नावावरच उघडावं लागतं.
यात गुंतवलेल्या पैशावर टॅक्स लागत नाहीत. मात्र, पीपीएफमधील गुंतवणूक 7 वर्षांपर्यंत काढता येत नाही. मात्र, 7 वर्षांनंतरही काही टक्के रक्कमच काढता येते. याला लॉकिंग पीरियड म्हणतात.
दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरते, असं तज्ज्ञांना वाटतं. दर महिन्याला किमान 500 रुपये आणि वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवू शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)