You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाना पटोले - भाजपलाही आता नरेंद्र मोदी नको आहेत : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. भाजपलाही आता नरेंद्र मोदी नको आहेत- नाना पटोले
इंधन आणि गॅसचे दर वाढवून मोदी सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असून उद्योगपती मित्रांचा फायदा करत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. टिळक भवन इथे माध्यमांशी बोलताना पटोले यांनी हे विधान केलं.
"मोदी देश बरबाद करत आहेत हे भाजपलाही कळून चुकले असून त्यांनाही आता मोदी नको आहेत", असा दावाही पटोले यांनी यावेळी केला.
"नरेंद्र मोदींनी देशाची संपत्ती विकायला सुरू केलीये. सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणारे उद्योग कवडीमोल दराने विकले जात आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही 'मोदी चले जाव'चा नारा दिला. त्याला देशातील आणि राज्यातील एकाही भाजप नेत्याने किंवा भक्ताने याला विरोध केला नाही.
मोदी देश बरबाद करत आहेत हे त्यांनाही आता कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्याही लोकांना मोदी नको आहेत," असं पटोले यांनी म्हटलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
2. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत.
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. टेम्पो, ट्रेलर आणि कार अशा पाच गाड्यांचा अपघात झाला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
मृतांमध्ये पाच वर्षाच्या एका लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींपैकी दोघांना पनवेल, दोघांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
3. साप-साप म्हणून भुई थोपटणं अयोग्य- पूजा चव्हाण प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याप्रकरणी बोलताना म्हटलं की, "साप साप म्हणून भुई थोपटण्याची गरज नाही." TV9 मराठीनं ही बातमी दिलीये.
"मागच्या दोन घटनांमध्ये असं लक्षात आलं आहे की, जे आरोप झाले ते तथ्यहीन होते. आता होणाऱ्या आरोपांचा खरे खोटेपणा तपासला जाईल. जर कुणी चुकीचं केलं असेल, दोषी असेल तर त्यात योग्य ती कारवाई होईलच," असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
4. '...तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय'- पी. चिदंबरम
टूलकिट प्रकरणी पर्यावरणवादी दिशा रवी हिला झालेल्या अटकेचा काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी निषेध केला आहे.
22 वर्षांची विद्यार्थिनी जर देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झाला आहे, असं चिदंबरम यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांपेक्षाही जास्त धोकादायक झालं असल्याचंही चिदंबरम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
चिदंबरम यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध करताना म्हटलं आहे की, "भारत ही मूर्खपणाची रंगभूमी बनत चालला आहे आणि दिल्ली पोलिस अत्याचाराचे साधन बनले आहेत ही खेदाची गोष्ट आहे."
दिल्लीतील एका न्यायालयानं 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दिशाला शनिवारी (13 फेब्रुवारी) दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं 'टूलकिट' प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
दिशानं बंगळुरूमधील एका खाजगी कॉलेजमधून बीबीएची पदवी घेतली आहे आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.
शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी बनवलेलं एक वादग्रस्त टूलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी दिशा यांच्यावर ठेवला आहे.
5. गोपनीयतेबाबत सर्वोच्च न्यायालयाची व्हॉट्सअॅपला नोटीस
युरोपियन देशांच्या तुलनेत भारतात व्हॉट्सअॅप युजर्सची गोपनीयता कमी राखत असून न्यायलयानेच लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करावं, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि व्हॉट्सअॅप यांना नोटीस बजावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि व्हॉट्सअॅपला नोटिस जारी करून कर्मण्य सिंह सरीन यांनी 2017 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तरं मागितली आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी यावेळी म्हटलं की, तुमच्या कंपन्या दोन किंवा तीन लाख कोटी डॉलरच्या असतीलही पण लोकांना तुमच्या आर्थिक बाजूपेक्षा गोपनीयतेचे महत्त्व जास्त आहे. युरोपात विशेष माहिती संरक्षण कायदे आहेत, पण भारतात ते पुरेसे नाहीत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)