कृषी विधेयक: NDA मधून शिरोमणी अकाली दल बाहेर, भाजपनं जुना सहकारी गमावला

मोदी सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिम्रत कौर यांनी याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

शिरोमणी अकाली दल हा भाजपचा NDA मधील सगळ्यात जुना सहकारी होता. जवळपास 22 वर्षे शिरोमणी अकाल दल भाजपसोबत NDA मध्ये होता.

महाराष्ट्रातील शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलाच्या रूपात भाजपनं गेल्या वर्षभरात दुसरा मोठा मित्रपक्ष गमावला आहे.

शिरोमणी अकाली दलाच्या काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी ट्विटरवरून यासंदर्भात सांगितलं की, 1 ऑक्‍टोबर रोजी शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये मोठा शेतकरी मोर्चा काढेल आणि राष्ट्रपतींच्या नावाने राज्यपालांकडे निवेदन सोपवेल.तसंच, NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय शिरोमणी अकाली दलाच्या सर्व नेत्यांनी एकमताने घेतल्याची माहितीही सुखबीर सिंह बादल यांनी दिली.

"कृषी विधेयकासंदर्भात ज्यावेळी केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश आणण्यात आले होते, त्यावेळीही हरसिमरत कौर यांनी अध्यादेशाला विरोध केला होता आणि शेतकऱ्यांच्या भावनांनुसार त्यात बदल करण्यास सुचवले होते. मात्र, आमचे ऐकले गेले नाही," असा दावा सुखबीर सिंह बादल यांनी केला आहे.

दुसरीकडे, पंजाबमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शिरोमणी अकाली दलावर टीका केली आहे.

हरसिम्रत कौर यांचा राजीनामा

शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी 17 सप्टेंबर रोजी कृषी विधेयकाच्या विरोधात केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

त्यांनी याविषयी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, "शेतकऱ्यांच्या विरोधातल्या विधेयकाच्या विरोधात मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. शेतकऱ्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत असल्याचा मला अभिमान आहे."

पंतप्रधान मोदींकडे सोपवलेल्या राजीनाम्यात त्यांनी लिहीलंय, "शेतमालाच्या मार्केटिंगच्या मुद्दयाविषयीच्या शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन न करता भारत सरकारने हे विधेयक पुढे नेण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही धोरणामध्ये शिरोमणी अकाली दलाला सहभागी व्हायचं नाही. म्हणूनच केंद्रीय मंत्री म्हणून सेवा सुरू ठेवणं मला शक्य नाही."

हरसिम्रत कौर यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर सांगतात, "हरसिम्रत कौर यांनी स्वतः या कृषी विधेयकांची यापूर्वी पाठराखण केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीही 5 वेळा अशी पाठराखण केली आहे. आता हे बादल यांचे 'डॅमेज कंट्रोल' साठीचे प्रयत्न म्हणावे लागतील.

आपला मतदारसंघ या कायद्यांमुळे घाबरला असून त्यांना यामुळे भविष्यात मोठ्या कॉर्पोरेट्सच्या अधिपत्याखाली येण्याची भीती वाटत असल्याचं हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्याने बादल यांच्या लक्षात आलं असावं.

हरसिम्रत कौर यांचं हे पाऊल म्हणजे 'अपुरं आणि उशीरा उचलेलं (Too little, too late) आणि खोटारड्या बादलांचं नाटक' असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी म्हटलंय. कदाचित ते योग्य ठरतील."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)