You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावत: 'आदित्य ठाकरेंचे मुव्ही माफियांसोबतचे संबंध उघड केले हाच माझा गुन्हा'
मुंबईतून मनालीला रवाना झालेल्या कंगनानं शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.
"मी मुव्ही माफिया, सुशांत सिंहचे खुनी आणि ड्रग रॅकेटचं पितळ उघडं पाडलं आहे. याच लोकांसोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरेंचे संबंध आहेत. त्याबद्दल बोलणं हाच माझा सर्वांत मोठा गुन्हा आहे. त्यामुळेच ते माझ्यामागे लागले आहेत," असं ट्वीट कंगनानं केलं आहे.
कंगना राणावतच्या या आरोपावर शिवसेनेचं अद्याप उत्तर आलेलं नाही.
दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाच्या ड्रग्ज रॅकेटबद्दल माहिती असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
"कंगना हिमाचल प्रदेशला निघून गेली, याचं आश्चर्य वाटतंय. ड्रग्ज माफियांच्या बॉलिवूड कनेक्शनबद्दलच्या तिच्या दाव्यांचं काय? आपल्याकडे असलेली माहिती NCB ला देणं हे तिचं कर्तव्य नाही का? एखाद्या गुन्ह्याची माहिती दडवणे हे आयपीसीच्या कलम 176 व 220 नुसार गुन्हा नाही का?" असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.
मुंबई महापालिकेकडून ऑफिसचं अनधिकृत बांधकाम तोडण्यासंबंधीची नोटीस बजावल्यानंतर कंगना मनालीहून मुंबईला आली होती. मुंबई महापालिकेनं ज्यादिवशी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली, त्यादिवशी कंगनानं एकापाठोपाठ एक ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यामध्ये तिनं 'बाबराची सेना' असाही उल्लेख केला होता.
रविवारी (13 सप्टेंबर) कंगनानं या कारवाईबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
सोमवारी (14 सप्टेंबर) कंगना मनालीला जाण्यासाठी रवाना झाली. परत जातानाही कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट केले.
'रक्षकच भक्षक बनून लोकशाहीचं वस्त्रहरण करत आहेत, मला कमकुवत समजण्याची चूक ते करत आहेत. एका महिलेला घाबरवून, कमी लेखून आपलीच प्रतिमा मलीन करत आहेत,' असं कंगनानं आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं.
चंदीगढमध्ये उतरल्यानंतर आता माझी सुरक्षा नाममात्र आहे. लोक माझं अभिनंदन करत आहेत. यावेळी मी बचावले, अशी भावना निर्माण झालीये. यापूर्वी मला मुंबईमध्ये आईच्या पदराखाली आल्याप्रमाणे शांत वाटायचं, आता मात्र जीव वाचला पुष्कळ झालं असं वाटतंय. शिवसेना सोनिया सेना झाल्यानंतर मुंबईत दहशतीचं राज्य आहे, असं कंगनानं ट्वीट करून म्हटलं होतं.
आदित्य ठाकरेंवर नारायण राणेंचा आरोप
भाजप नेते नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते.
"दिनो मोरिया कोण आहे? सुशांतच्या घराजवळ त्याचा बंगला आहे. तिथे या सरकारमधला एक मंत्री का येतो? 13 तारखेला बंगल्यावर जमून सुशांतकडे पार्टी करायला कोण गेलं? त्यांची चौकशी का होत नाही? सरकारवर दबाव का आहे? याचा खुलासा झाला पाहिजे," असं नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं.
राणे यांनी यावेळी कुठल्याही मंत्र्याचं नाव घेतलं नाही. पण राणे यांच्या या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंनी मात्र ट्विटरवरून त्यांची भूमिका जाहीर करत एक पत्रक प्रसिद्ध केलं.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. हे गलिच्छ राजकारण असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं.
महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असं कृत्य माझ्या हातून घडणार नाही, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं होतं.
कंगना-शिवसेना वाद
3 सप्टेंबर रोजी कंगना राणावतनं न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीची लिंक शेअर करत, त्यावर म्हटलं, "मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे?"
कंगनानं मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केल्यानंतर तिच्याविरोधात टीका सुरू झाली. 'आमची मुंबई' या हॅशटॅगद्वारे मुंबई किती सुरक्षित आहे हे कंगनाला सांगितलं गेलं.
सर्वसामान्य लोकांसह राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार यांनीही कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला.
कंगनावर होणाऱ्या टीकेविरोधात भाजपकडून आमदार राम कदम पुढे आले. कंगनाच्या ट्वीटवर भाजप नेते राम कदम यांनी अशा पोकळ धमक्यांना 'झाशीची राणी' कंगना घाबरणार नाही असं लिहिलं.
शुक्रवारी (4 सप्टेंबर) कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेचं नाव न घेता आव्हान दिलं.
भाजपचे पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश साहीब सिंग यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटला कोट रिट्वीट करत कंगनानं म्हटलं, "मुंबईत न येण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. पण आता मी ठरवलंय की, पुढच्याच आठवड्यात म्हणजे 9 स्पेटेंबरला मुंबईत यायचं. मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळही मी इथे पोस्ट करेन. कुणाच्या बापात हिंमत असेल, तर मला थांबवून दाखवावं."
9 सप्टेंबरला मुंबई महापालिकेनं कंगना राणावतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या कारवाईनंतर कंगनानं बीएमसी आणि शिवसेनेचा उल्लेख बाबराची सेना असा केला.
नंतर तिने तिच्या पाली हिलच्या कार्यालयाचे तोडफोड झालेले व्हीडिओ फेसबुकवर शेअर केले आणि एक व्हीडिओ ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर टीका केली आहे
"उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू फिल्म माफियांबरोबर मिळून माझं घर तोडलं आणि माझा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे उद्या तुझी घमेंड तुटेल. मला वाटतं की तू माझ्यावर फार उपकार केले आहेस," असं कंगना राणावतनं या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)