You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात एसटीचा प्रवास पुन्हा सुरू होणार, ई-पासची गरज नाही
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही असं राज्य परिवहन मंडळाने म्हटलं आहे.
राज्यात आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही पास किंवा परवानगीची गरज नसेल असेल राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
एसटीचा प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची खबरदारी घ्यावी असेही या पत्रकात म्हटले आहे. याआधी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एसटी सुरू करण्यात आली होती. आता संपूर्ण राज्यभर एसटी धावणार आहे. प्रवासाआधी आरक्षण काढावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची नोंद राहील.
एसटी महामंडळातर्फे स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर करण्यात येईल. त्यानुसारच पूर्ण प्रवास होणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने तज्ज्ञांशी सल्लामसलत केली.
कंटेनमेंट झोन आणि पायाभूत सुविधांबाबतचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
एसटी व्यतिरिक्त जे खासगी वाहनाने प्रवास करतील त्यांना ई-पासची गरज असेल.
साध्या, निमआराम, शिवशाही बसेस सुरू होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली 5 महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. 20 ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.
परिवहन मंत्री परब म्हणाले, "उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही."
दि. 23 मार्चपासून कोविड-19च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विध्यार्थाना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर - सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे.
दि. 22 मे पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज सुमारे 1300 बसेसमधून सरासरी 7287 फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवाशी सेवा एसटीने पुरविली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)