राज ठाकरे यांना ईडीची नोटीस, गुरुवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालनं (ईडी) नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्टला त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी ईव्हीएम ऐवजी पुन्हा एकदा बॅलेटपेपरवरच निवडणूक घ्यावी यासाठी विरोधी पक्षांची एक संयुक्त पत्रकार परिषद देखील त्यांनी घेतली होती.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते, 'मला अजूनतरी ईडीवाले हॅलो करायला आलेले नाही'.
दरम्यान, ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर सरकार दबाव टाकत आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
2. कोल्हापूर - सांगलीतल्या पुरासाठी अलमट्टी धरणाला दोष देऊ नका - गिरीश महाजन
"कोल्हापूर आणि सांगलीतल्या पुरासाठी अलमट्टी धरणाला दोष देऊ नका," असं मत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

फोटो स्रोत, Girish Mahajan/facebook
अलमट्टी धरण या पुरास कारणीभूत ठरलं, अशी चर्चा आहे, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हटले, "अलमट्टी धरण सांगलीपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या पुरासाठी कर्नाटकला दोष देणं, जबाबदार धरणं योग्य नाही. धरणातील पाण्याच्या नियंत्रणाविषयी आमचे अधिकारी आणि कर्नाटकचे अधिकारी यांच्यात जुलै 2017पासून संवाद सुरू आहे."
"पुरादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या सतत संपर्कात होते. तसंच पंतप्रधान आणि गृहमंत्र्याशी, संरक्षण मंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली आहे," असंही ते म्हणाले.
3. आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर : राजनाथ सिंह
"पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही बोलणी होणार नाही. आता चर्चा व्हायची असेल, तर ती फक्त आणि फक्त पाकव्याप्त काश्मीर या एकाच विषयावर होईल," असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काल्कामध्ये भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यावेळी ते बोलत होते.

फोटो स्रोत, EPA
"भाजप केवळ सरकार बनवण्यासाठी नाही, तर देश बनवण्यासाठी राजकारण करत आहे. मोदींच्या नेतृत्वात कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर जम्मू -काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी, तसंच स्थानिक युवकांच्या भविष्याचा विचार करता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहे," असं ट्वीटही त्यांनी केलं आहे.
राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलं की, "राजनाथ सिंह यांचं वक्तव्य दाखवून देतं की, भारत एका अवघड स्थितीत फसला आहे. कारण भारतानं जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेला आणि शांतलेला धोक्यात ढकललं आहे."
4. झोमॅटोचं चुका सुधारण्याचं आश्वासन
झोमॅटो या घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म कंपनीनं चुका सुधारण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images
झोमॅटोनं दिलेल्या सवलतींमध्ये तग धरणं शक्य नसल्याचं कारण देत देशभरातील जवळपास 1200 रेस्टॉरंटनी झोमॅटो सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी रविवारी ट्वीट करत म्हटलं, "काही ठिकाणी आमच्याकडून चुका झाल्या असून काही गोष्टी नियोजनाप्रमाणे झालेल्या नाहीत. मात्र, अशा प्रकारे रेस्टॉरंटनी सामूहिकरीत्या बाहेर पडणं हे आमच्यासाठी डोळे उघडवणारं आहे. रेस्टॉरंट आणि ग्राहकांच्या हितामध्येच झोमॅटोचं हित आहे."
5. हिमा दास, मोहम्मद अनसला सुवर्ण पदक
भारताची धावपटू हिमा दास आणि मोहम्मद अनस या दोघांनी चेक गणराज्यमधील अॅथलेटिक मिटिनेक रीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पुरूष गटातील 300 मीटर स्पर्धेत मोहम्मद अनस, तर महिलांच्या 300 मीटर स्पर्धेत हिमा दासनं सुवर्णपदक पटकावलं आहे.
युरोपीय स्पर्धेतील हिमा दासचं हे सहावं सुवर्ण पदक आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








