गोपीनाथ मुंडे मृत्यू प्रकरणाची चौकशी आमच्यापासून सुरू झाली तरी चालेल, पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर

फोटो स्रोत, Getty Images
गोपीनाथ मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टनं केला. यानंतर पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. त्यांच्या या मागणीला उत्तर देताना पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
बीडमध्ये आयोजित त्यांच्या मतदारसंघातील विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
पंकजा मुंडे नेमकंकाय म्हणाल्या?
"मी एवढं दिलं न मागता, मग मला तुम्ही मतांसाठी हात पसरायला लावणार आहे? मला नाक घासायला लावणार आहे? मला वंदन करायला लावणार आहे? ह्या साल्या लुच्चा-लबाड्या लोकांना मुंडे साहेबांचा मृत्यूदेखील एक संधी वाटत आहे.
अरे मी मुंडे साहेबांची लेक आहे. मुंडे साहेबांना काही झालं हे मला माहिती असेल तर ज्यानं केलं त्याचा जीव घ्यायची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. मला कुठल्या Investigation Agencyची गरज नाही. माझ्या बापाला काही झालं असेल तर जीव घेऊन त्या माणसाचा स्वत:चा जीव माझा जागच्या जागी जाईल.
शोभतंय हे जयंत पाटलांना? ते म्हणताहेत की, पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे , कारण मुंडे साहेंबाची हत्या झाली. मुंडे साहेबांची हत्या झाली की नाही हा विषय तुमचा नाही महोदय.
आणि तुम्ही जर छातीठोकपणे सगळे जर राष्ट्रवादीचे नेते आणि जे कोणी बोलतात, तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे.
तुम्हाला 4 वर्षांनंतर माझ्या बापाच्या मृत्यूमध्ये राजकारण दिसतं आणि तुम्हाला त्या राजकारणात एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे पंकजा मुंडेंचा राजीनामा पाहिजे, एवढी का पंकजा मुंडेंची तुम्हाला भीती आहे?

फोटो स्रोत, Pankaja Gopinath Munde/FACEBOOK
अरे पंकजा मुंडेंनी जर एक आवाज दिला तर देशाच्या राजधानीपर्यंत हे लोकं स्वत:च्या जीवाची परवा न करता आल्याशिवाय राहणार नाही. माझे लोकं रस्त्यावर यावं, त्यांनी लाठ्याकाठ्या खाव्या, त्यांची बरबादी व्हावी, त्यांनी जेलमध्ये जावं, याच्यासाठी कितीही त्यांनी तुम्हाला चेतवलं, तरी तुम्ही माझ्या आवाजाची वाट बघताय, हे मला माहिती आहे.
तुमची काळजी माझ्या जीवापेक्षा मला जास्त आहे आणि म्हणून तुम्ही कुणीही असल्या फालतू भूलथापांना बळी पडायचं नाहीये.
मी सीबीआय ऑफिसर आहे? मी हॅकर आहे? नाहीये. मी अशी राजकारणी आहे का की, मुंडे साहेबांच्यावर भाषणं बनवून, भाषणं देऊन मला कुणाचे मतं हाडपायचे आहेत. मी एक लेक आहे लेक. एका लेकीवर असा आरोप करता, तुम्हाला काळ कधीही क्षमा करणार नाही. एवढ्या खालच्या पद्धतीचं, एवढं घाणेरडं राजकारण, या महाराष्ट्राच्या इतिहासानं पाहिलं नाही.
तुम्ही जे बोलता, तुमचे जे बोलवते धनी आहेत, ते कोण आहेत, हेपण सगळ्या जगाला माहिती आहे. आज तुमच्या पायाखालची जमीन सरकली आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचं तुम्ही राजकारण करता. तुम्हाला ईश्वर कधीही क्षमा करणार नाही.
मला ज्या दिवशी असं वाटेल तेव्हा मी खंबीर आहे, मला तुमच्या तुमच्या (उपस्थितांच्या) जीवावर मी जगामधलं कुठलंही चॅलेंज स्वीकारू शकते, ही माझ्यात ताकद आहे. देणार ना तुम्ही मला साथ, राहणार ना तुम्ही माझ्याबरोबर? हात वर करा, हाताच्या मुठी आवळा आणि निश्चय करा...

फोटो स्रोत, Pankaja Gopinath Munde/FACEBOOK
या सगळ्या लबाड लांडग्यांना परत तुमच्यापुढे मतदान मागायला यायची त्यांची लायकीसुद्धा ठेवणार नाही, अशाप्रकारचा तुम्हाला निश्चय करायचा आहे.
म्हणून मी आता तुम्हा सगळ्यांना आवाहन करते, आता लोकसभेला मी तुमच्यापर्यंत पोहोचेन किंवा नाही पोहोचेन, पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, माझी साद तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, या हाकेला तुम्ही प्रतिसाद द्या, एवढंच तुम्हाला आव्हान करते."
राष्ट्रवादीची भूमिका काय?
पंकजा यांच्या वक्तव्यावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भूमिका जाणून घेतली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं, "आम्ही गोपीनाथ मुंडेच्या हत्येबाबत राजकारण करत नाहीये. जनतेच्या मनात शंका आहे आणि त्याला एखाद्या हॅकरनं दुजोरा दिला आहे, तर त्याबाबतीत आम्ही राजकारण करतो, असा होता नाही. हॅकर बोलल्यानंतर त्यांच्या भागातील लोकांच्या मनात आहे की, याबाबत चौकशी व्हावी."
"मुंडेंच्या नावानं राजकारण करायचं, मतं मागायची आम्हाला काही गरज नाहीये. हॅकरच्या बोलण्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे तिला आणखी वाव मिळाला आहे, विरोधक असताना एखादा विषय समोर आला तर त्याबाबतीत बोललं पाहिजे," असं त्यांनी पुढे सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
लोकांच्या मनातली शंका आणि हॅकरच्या माध्यमातून या शंकेला दुजोरा मिळाला आहे, म्हणून पक्षाचे नेते त्याबाबतीत बोलले आहेत. मुंडेंच्या नावानं आम्हाला मतं नकोय. तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्हाला चौकशीची सुरुवात आमच्यापासून करायची असेल तर जरूर करा, ते पुढे सांगतात.
मुंडेंचा अपघात की घात? EVM प्रकरणानंतर पुन्हा वादाला सुरुवात
3 जून 2014 चा दिवस उजाडला तोच भाजपसाठी अशुभ बातमी घेऊन. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. मुंडेचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघा अर्ध्या तासाचा प्रवास. पण तेवढ्या वेळात होत्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांना आपले प्राण गमवावे लागले.
मुंडेच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करायला सुरूवात केली. मुंडेंच्या मृत्यूबद्दलचा हाच वाद पुन्हा नव्यानं उफाळून आला आहे. गोपीनाथ मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळं त्यांची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टनं केला.
शुजानं सोमवारी लाइव्ह प्रेस कॉन्फरन्समध्ये ईव्हीएम हॅकिंग आणि मुंडेंच्या हत्येचा संबंध जोडल्यानं गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल पुन्हा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळेच साडेचार वर्षे मागे जात मुंडेंच्या अपघाताचं गूढ तेव्हाही का कायम होतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
अपघाताच्या वेळेची परिस्थिती संशयास्पद
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी म्हटलं, "ज्या परिस्थितीत मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं, त्यावर अनेकांचा विश्वास बसला नाही, डॉक्टरानी अंतर्गत रक्तस्त्राव हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं होतं. मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पीएला कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळेत लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला. आता ईव्हीएम हॅकिंगचा मुंडे यांच्या मृत्यूशी संबंध जोडला गेल्यामुळे त्यासंबंधीच्या चर्चांना नवीन अँगल मिळाला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी गोपीनाथ मुंडेचा अपघात हा अनपेक्षित असल्यानं त्याबद्दल संशय निर्माण झाल्याचं म्हटलं.
केसरी यांनी सांगितलं, " 2014 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण काही महिन्यांतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण त्याचवेळी दिल्लीत अशी चर्चा होती, की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे नव्हते. मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला. मुंडेंचा मंत्रीमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं. अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात चालले होते. तिथे त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र मुंबईला जाण्यासाठी निघाले असतानाच मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. ही अतिशय अनपेक्षित अशी घटना होती."
काही प्रश्न अजूनही अनुत्तरित
व्यंकटेश केसरी यांनी म्हटलं, "शवविच्छेदन अहवालामध्ये मुंडे यांच्या मृत्यूचं कारण रक्तस्त्राव असं सांगितलं असलं तरी, भाजपला लोकांच्या मनातील संशय दूर होईल अशा रितीने हे कारण आजतागायत पटवून देण्यात आलं नाही. त्यामुळेच मुंडेंच्या मृत्यूबद्दल आजही संशय निर्माण होत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचा संबंध ईव्हीएमशी जोडला गेला आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघाचीच होता, हे लोकांना पटवून देणं हे भाजपसमोरचं आव्हान आहे."

फोटो स्रोत, Getty Images
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाला असल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मान्य केलं. मात्र त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचंही उपाध्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
"गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर अतिशय संघर्ष केला होता आणि यशाच्या एका टप्प्यावर ते पोहोचले होते. आणि अशावेळी त्यांचा मृत्यू होणं ही अतिशय धक्कादायक गोष्ट होती. अपघाताच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत गोपीनाथ मुंडे नीट होते, सर्वांशी हसूनखेळून बोलत होते. त्यामुळं त्यांना मानणारा जो एक मोठा वर्ग होता, त्यांच्या मनात उलटसुलट शंका येणं स्वाभाविक होतं. त्यांच्या जन्मगावी म्हणजे परळीला त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळेसही जमाव प्रक्षुब्ध झाला होता. जमावाच्या या प्रतिक्रियेनंतर मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीही करण्यात आली. मात्र हा अपघाती मृत्यू असल्याचं या तपासातूनही निष्पन्न झालं होतं," असं केशव उपाध्येंनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
"मुंडे यांच्या मृत्यूबद्दल नव्यानं जो वाद उफाळून आला आहे त्याबद्दल बोलताना उपाध्ये यांनी म्हटलं, गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल हॅकर जो दावा करत आहे, त्यासाठी कोणताही पुरावा देत नाहीये. केवळ बेछूट आणि बेलगाम आरोप करणं ही काही जणांची खासियतच आहे," असंही केशव उपाध्येंनी म्हटलं.
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. "अचानक ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं, ते संशयास्पद होतं. गाडीची गाडीला जशाप्रकारे धडक बसली होती, ते पाहता त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही. मी स्वतःही गोपीनाथ मुंडेंची गाडी पाहिली होती. म्हणूनच त्यांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह तेव्हाही निर्माण झालं होतं," असं मुंडे यांनी म्हटलं.
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूदिवशीचा घटनाक्रम
गोपीनाथ मुंडे यांनी 26 मे 2014 ला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथविधीनंतर 3 जून 2014 ला सकाळी मुंडे आपल्या 21 लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते.
मुंडे सरकारी गाडीतून जात होते आणि त्यांच्या सोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पीए होते. सकाळी साधारण 6 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड-तुघलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोहोचली. इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली.

फोटो स्रोत, Getty Images
गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला.
त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पीए आणि ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं 'एम्स'च्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. एम्समध्ये पोहचल्यावर त्यांचं ह्रदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या टीमनं सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित केलं.
मुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरींनी हाताळली होती. गडकरी हे महाराष्ट्रातील नेते असल्यामुळं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती सुनील चावके यांनी दिली. "नितीन गडकरी आणि हर्षवर्धन यांनीच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांना सांगितलं होतं. त्यानंतर मुंडे यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात आणून तिथून मुंबईला पाठविण्यापर्यंतची सर्व व्यवस्था गडकरी पाहत होते," असं चावकेंनी सांगितलं.
सीबीआय चौकशीनंतर या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र साडेचार वर्षांनंतर पुन्हा एकदा कथित हॅकर सय्यद शुजाच्या नव्या आरोपांनी या प्रकरणाची जोरदार चर्चा देशभर सुरू झाली आहे. त्याला ईव्हीएम घोटाळ्याची पार्श्वभूमी सय्यद शुजा यांनी जोडल्याने निवडणुकीतही हा मुद्दा तापणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








