गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू आणि EVM घोटाळ्याच्या आरोपावरुन राजकीय घमासान

लंडनमध्ये एका कथित हॅकरने 2014च्या लोकसभा आणि 2015च्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) हॅक केले होते आणि त्यातूनच गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप झाल्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची राळ उटलेली आहे. त्यातून #CongBackedHackathon #EVMHacking #EVMs #Syed Shuja #Kapil Sibal असे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होते.

हे रहस्य माहित असलेल्या आपल्या 5 सहकाऱ्यांना ठार मारण्यात आलं आहे, असा दावाही या कथित हॅकरने केला आहे. सय्यद शुजा असं नावं असलेल्या या व्यक्तीने त्याच्या दाव्यांच्या समर्थनासाठी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. शिवाय निवडणूक आयोगाने हॅकिंग संदर्भातील सर्व आरोप फेटाळले आहेत.

लंडनमधील बीबीसीचे प्रतिनिधी गगन सबरवाल या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांचा हा रिपोर्ट

ही परिषद नेमकी काय होती?

इंडियन जर्नॅलिस्ट असोसिएशन ऑफ युरोप आणि फॉरेन प्रेस असोसिएशन लंडन यांनी ही परिषद आयोजित केली होती. अमेरिकेतील सायबर तज्ज्ञ या परिषदेमध्ये भारतात वापरण्यात येतं असलेलं EVM कसं हॅक केल जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक दाखवणार होता. कथित हॅकर शुजा स्वतः या परिषदेला उपस्थित राहून प्रात्याक्षिक दाखवणार होते. पण त्यांनी या परिषदेला न येता स्काईपवरून पत्रकार परिषद घेतली. काही दिवसांपूर्वी आपल्यावर भाडोत्री व्यक्तींनी हल्ला केला होता, असा दावा त्यांनी केला आहे.

शुजा यांनी या पत्रकार परिषदेत स्वतःचा चेहरा झाकला होता. आपण भारतातील Electronics Corporation of India Limited (ECIL)चे कर्मचारी होतो आणि याचं कंपनीने 2014च्या निवडणुकीसाठी EVMs बनवले होते, असा दावा त्यांनी केला.

आपण मूळचे हैदराबादचे आहोत आणि 2014पासून अमेरिकेत राजकीय आश्रय घेतला आहे, असाही दावा त्यांनी केला आहे. भारतातील इतरही काही भाषा आपल्याला अवगत आहेत, असं म्हणणाऱ्या शुजांनी संयोजकांच्या विनंतीवरून या पत्रकार परिषदेला इंग्रजीतून माहिती दिली.

शुजा यांना विचारण्यात आलेले काही प्रश्न :

प्रश्न : अमेरिका आणि काँगो या देशांत EVM कोणत्याही तक्रारींशिवाय कसे वापरले जात आहेत?

शुजा - मी अमेरिकेतील EVMचा अभ्यास केलेला नाही. तशी संधी मला मिळालेली नसल्याने मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही. काँगोतील EVM बद्दल मला काही माहिती नाही.

प्रश्न : गेल्या वर्षी भारतीय निवडणूक आयोगाने EVM हॅक करून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. तुम्ही ते आव्हान का स्वीकारलं नाही?

शुजा : मी अमेरिकेत आश्रय घेतला आहे. जर मी भारतात आलो असतो तर माझ्या सुरक्षेच्या काय शक्यता होत्या? जे हे आव्हान स्वीकारू इच्छित होते त्यांना मी पर्याय देऊ केला होता, पण त्यांनी माघार घेतली.

प्रश्न :तुम्ही आताच या विषयावर का बोलत आहात. आताच्या परिषदेतून काय साध्य होईल, असं तुम्हाला वाटतं?

शुजा :मी कशाचीही अपेक्षा करत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर काहीही होणार नाही. EVM राहणारच आहेत आणि जे सुरू आहे ते सुरूच राहणार, काहीही बदलणार नाही. सर्वांनी मतपत्रिकांची मागणी केली तरीही काही होणार नाही. कारण भाजपकडे मतं विकत घेता येतील इतका पैसा आहे. लोकांना काय हवं ते लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी निवडून न दिलेलं आणि अफरातफर करून सत्तेत आलेलं सरकार नंतर सगळ्याच गोष्टींत अफरातफर करतं आणि ते तसंच करत राहणार आणि त्याबद्दल कुणी काही करूही शकत नाही.

प्रश्न :तुमच्याकडे काय पर्याय आहे?

छेडछाड करता येणार नाहीत, असे EVM भारतात आहेत. पण त्याचा वापर भारत करणार नाही. कसलीही छेडछाड करता येणार नाही अशा EVMचं डिझाईन मी दिलेलं आहे. किचकट रचना असलेलं हे मशिन वायरलेसपद्धतीने कनेक्ट होत नाही किंवा त्यातून कोणतंही ट्रान्समिशन करता येत नाही.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

काँग्रेस नेते आणि खासदार कपिल सिब्बल यांच्याशी आम्ही संवाद साधला. ते म्हणाले, शुजा यांनी जे दावे केले आहेत त्याची पडताळणी करावी लागेल, त्यानंतरच यावर काही भाष्य करता येईल.

काँग्रेस पक्षाच्या वतीने ते इथं आला आहात का? असं त्यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, "संयोजकांतील एक पत्रकार माझे मित्र आहेत. त्यांनी मला आणि इतर काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आंमत्रित केलं होतं. शुजा यांनी काय दावे केले आहेत ते आम्ही ऐकावेत अशी त्यांची अपेक्षा होती."

पुरावे न देता आरोप

हे आरोप करताना शुजा यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. पण कुणा पत्रकाराला यात अधिक खोलवर तपास करायचा असेल तर सर्व ती कागदपत्रं आणि पुरावे देऊ असं ते म्हणाले.

या परिषदेत प्रत्यक्षात EVM कसं हॅक केलं जातं हे दाखवलं जाणार होतं, पण प्रत्यक्षात दूरवर बसलेली एक व्यक्ती मोठंमोठे आरोप करत आहे आणि त्याला कोणतेही पुरावे देत नाही, हेच पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर आरोपांच्या फैरी

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे की 2014च्या मोदी लाटेचा पर्दाफाश झाला आहे. "ती निवडणूक मॅनेज होती. EVM भापजसाठी हॅक करण्यात आले होते."

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. "गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू घातपात असावा, अशी शंका त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना होती. शुजा यांनी जे गंभीर आरोप केले त्यामुळे या शंकेला पुष्टी मिळते. हा आरोप जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकांशी संबंधित असल्याने याची चौकशी झाली पाहिजे."

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचं हे आणखी मोठं असत्य असल्याची टीका केली आहे. "काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA सरकारच्या काळात झालेल्या निवडणुकांत निवडणूक आयोगाने EVM मशिनमध्ये छेडाछाड केली असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. काहीही कचरा फेकला तर लोक तो खातील, असं काँग्रेसला का वाटतं?," असं ते म्हणाले.

भाजपचे नेते मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी कपिल सिब्बल यांना काँग्रेसने पाठवले होते, असा आरोप केला. देश आणि देशाची लोकशाही व्यवस्था बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणतात, "कटकारस्थानांचे बेछूट आरोप करण्यापेक्षा सबळ पुराव्यांनिशी EVM हॅक केले जाऊ शकतात."

तर पत्रकार निखिल वागळे यांनी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी चांगले मुद्दे शोधावेत असं म्हटलं आहे. कुणी सनसनाटी आरोप करत असेल तर पुरावेही दिले पाहिजेत. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीमुळे तर हा थट्टेचा विषय झाला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)