You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्मृती इराणींच्या वक्तव्यावर चर्चा : 'पाळी अपवित्र असेल तर संपूर्ण मानवजात अपवित्र'
"मासिक पाळीदरम्यान रक्तानं माखलेला पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का? तुम्ही नाही जाऊ शकत, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तर मग मासिक पाळीत देवाच्या घरी जाणं योग्य आहे, असं तुम्हाला का वाटतं?" केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी याचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे.
एक महिला असतानाही महिलांविषयींचा असा दृष्टिकोन चूक असल्याचं मत बीबीसी मराठीच्या अनेक वाचकांनी म्हटलं आहे. आज होऊ द्या चर्चामध्ये वाचकांनी दिलेल्या मतांपैकी काही निवडक आणि संपादित मतं इथं देत आहोत.
विषय महिलांचा आहे, म्हणून आजच्या या गोषवाऱ्यात महिलांच्या मतांना प्राधान्य देण्यात आलं आहे.
प्रज्ञा कंकाळ म्हणतात, "पाळी ही नैसर्गिक गोष्टी आहे. तुम्ही या गोष्टीला देवधर्माशी जोडतात कशाला? पाळी आल्यावर स्त्री मंदिरात जाऊन आली तरी तिचं काही वाकडं होतं नाही. स्वानुभव सांगते, काहीच होत नाही. सारं थोतांड आहे. स्त्रियांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हेतुपुरस्सर समाजाने रचलेले कटकारस्तान आहे. या गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या जरा."
अॅड. वंदना खरात गायकवाड म्हणतात, "बुध्दी असलेल्या लोकांना हे तर माहिती पाहिजे ना, ज्या मासिक रक्ताला विटाळ मानताय तेच रक्त बाळाला जन्म देतं. तुम्ही-आम्ही, तुमचे आईवडील आणि त्यांचे पूर्वज ज्यातून जन्मले, काय तर म्हणे विटाळ."
पायल ठाकूर म्हणतात, "तुम्ही आपले सॅनिटरी नॅपकिन्स हातात घेऊन मंत्रालयात जाता काय? तुमच्या एकंदर व्यक्तिमत्त्वावरून आपल्याला किती लागत असतील नाही. कुणी तुम्हाला मंत्री बनवले?"
शुभांगी जुमले म्हणातात, "बघा, एक स्त्री असूनही याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. उदाहरण, मी मागच्या वेळी नाशिकमध्ये मासिक पाळी आली असताना मंदिरात गेले होती."
माहेश्वरी घाग यांच्या मते "हजारो वर्षांपासून ज्या परंपरा आम्ही मानतो, त्या अशा अचानक कुणाच्या तरी सांगण्यावरून का सोडाव्यात? आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो आणि या धर्माचे नियम आम्ही पाळू. गैर हिंदू किंवा नास्तिक लोकांनी हा विषय हाताळू नये."
स्वाती ओळकर म्हणतात, "स्मृतीजी, भंपक मॉडर्न लोकांना कसला आलाय धर्म आणि विधिनिषेध? त्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांचा एकच धर्म - नागडेपणा."
आसावरी शास्त्री म्हणतात, "ज्या रक्तस्रावातून नवा जीव जन्म घेतो, तो रक्तस्राव अपवित्र असेल तर संपूर्ण मानवजात अपवित्र आहे. कारण त्या स्रावातच मानवाचा देह आकार घेतो. त्याचं प्राथमिक पोषण त्यामुळेच होते. तेव्हा स्मृती इराणी बाई तुम्ही तुध्दा तेवढ्याच अपवित्र आहात जेवढे सॅनिटरी पॅड्स."
समृद्धी अनंत म्हणतात, "या काळात महिलांनी सुरुवातीचे दोन दिवस आराम करायला हवा. त्याने नक्कीच मदत होते. टीका करणं थांबवा. काळजी आणि सन्मान महत्त्वाचा."
विशाल मोकळ लिहितात, "पाळीचे रक्ताळलेले कपडे घालून आत जाण्याची कुणीही परवानगी मागीतली नाही. बगल देण्याचं काम एक स्त्री करते, याचा संताप आहे. फक्त महिलांना आत प्रवेश आहे, हाच एक विषय आहे. ते महिलांनी ठरवावं. तसंच भारतात अशी कोणतीच महिला दर्शन घेणार नाही, हे स्पष्ट आहे."
रमेश भोसले पाटील यांच्यामते, "मंदिरच जर का विटंबली गेली असती तर देवाने ती स्थिती महिलांना दिलीच नसती. मुळात मंदिर नाही तर मेंदू शुद्ध करण्याची गरज आहे सगळ्यांना."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)