किल्लारी भूकंप : '25 वर्षांनंतरही भूकंपाच्या आठवणीने पछाडलं आहे'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"30 सप्टेंबर 1993ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता. सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावं भूकंपाने हादरून गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. ढिगाऱ्यांत अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार माझ्या व्हीडिओ कॅमेऱ्याने टिपले. पण हाहाकाराची ही विदारकता काळीज पिळवटून टाकणारी होती. ही चित्रं माझा पिच्छा सोडत नव्हती. मला फोबिया झाला होता. त्यानंतर माझ्या हातांनी कधी कॅमेऱ्याला स्पर्श केला नाही. हे सारं आठवलं की आजही मनात कालवाकालव होते."
या भूकंपानंतर काही तासांत तिथं पोहोचलेले कॅमेरामन म्हणजे इस्माईल शेख सांगत होते.

फोटो स्रोत, Rahul Ransubhe / Ismail Sheikh
उमरग्यातील बसस्टॅंडपासून काही अंतरावर शेख यांचं 'शम्स मोबाईल्स' हे मोबाईल रिचार्जचं दुकान आहे.
"त्या काळात फोन सगळीकडं पोहोचले नव्हते. त्यामुळे किल्लारी आणि आसपासच्या गावांत नेमकं काय झालं हे लवकर कळलं नाही. काही तरी घडलं आहे, ऐवढ्या माहितीवर आम्ही एक ट्रक मदतीसाठी घेऊन निघालो. मी खांद्यावर कॅमेरा टाकला," दुकानातील काम बाजूला ठेवत इस्माईल सांगू लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
"6.4 रिश्टर स्केलच्या या भूकंपाने सात हजारांवर लोकांचा बळी घेतला, 16 हजार लोक जखमी झाले. तर 52 गावांतील 30 हजार घरं धरणीच्या पोटात गडप झाली. ही आपत्ती नव्हती तर महाप्रलय होता," त्या दिवसांबद्दल सांगतात शेख यांचा आवाज कातर होतो.
ते सांगतात, "भूकंपाची बातमी कळाल्यानंतर आम्ही उमरग्यामध्ये एक टीम बनवली. त्यात पोलीस कर्मचारी, कॉलेजचे विद्यार्थी आणि मित्र होते. एका ट्रकमधून आम्ही एकोंडी या गावात आलो. जे जखमी होते त्यांना ट्रकमध्ये बसवा आणि हॉस्पिटल गाठा, असं आम्ही सांगितलं. आमच्याकडे हत्यार नसल्याने ढिगारे उपसता येत नव्हते. शक्य तितक्या जखमींना आम्ही हॉस्पिटलला पोहोचवले."

फोटो स्रोत, Getty Images
तिथून मी किल्लारीला गेलो. तिथं चौकात आल्यानंतर लक्षात आलं की ही आपत्ती साधीसुधी नसून हा महाप्रलय आहे. मी तिथं थोडं शूटिंग केलं. पण गावात जाण्याचं धाडस मला होऊ शकलं नाही, हे सांगत असताना शेख आवाज गहिवरतात.
किल्लारीतून ते सास्तूरला गेले.
"सास्तूरची स्थितीही काही वेगळी नव्हती. माझ्या कॅमेऱ्यातील बॅटरी तिथं संपली, बॅटरी चार्ज करण्यासाठी मी उमरग्याला गेलो. उमरग्यात हॉस्पिटलमध्ये प्रेतं ठेवण्यासाठीही जागा नव्हती. जखमींवर शक्य ते उपचार करण्याचा प्रयत्न डॉक्टर आणि इतर कर्मचारी करत होते," ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"तोवर बातमी आली की माझ्या मेव्हण्याचाही या भूकंपात मृत्यू झाला आहे. मेव्हण्याच्या दफनविधीसाठी मी सास्तूरला गेलो. दफनविधीनंतर मी परत कॅमेरा हाती घेतला आणि शूटिंग सुरू केलं," त्यांनी सांगितलं.
लष्कराने परिस्थिती पूर्ववत केली
"तोपर्यंत इथं लष्कराला पाचारण करण्यात आलं. ऑपरेशन सहायता युद्धपातळीवर सुरू झालं. लष्काराने इथं अभूतपूर्व असं काम केलं. सैनिकांच्या कष्टामुळेच इथली परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकली," असं ते सांगतात.
"लष्कराने केलेल्या मदतकार्याचं शूटिंगही इस्माईल यांनी केलं. त्यामुळेच शूटिंगला ते सरकारी ठेवा म्हणतात. भविष्यात कधी इतिहासाची पानं चाळावी लागली तर या शूटिंगचा उपयोग होईल," असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
भूकंपात केलेलं शूटिंग त्यांनी 40 व्हीडिओ कॅसेटमध्ये जतन करून ठेवलं आहे. या व्हीडिओ शूटिंगच डिजिटलमध्ये रूपांतर करून एखादी डॉक्युमेंट्री बनवावी, अशी त्यांची इच्छा आहे. "ही डॉक्युमेंट्री भारत सरकार किंवा लष्कराकडे द्यावी," असं ते म्हणतात.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








