You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन, आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नवी दिल्लीतल्या AIIMS हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या 9 आठवड्यांपासून ते रुग्णालयात होते. आज दिल्लीत स्मृतीस्थळ, विजयघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सकाळी 9.50 - निवासस्थानाहून पार्थिव निघाले
अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव लष्करी वाहनावरून भाजप मुख्यालयाकडे निघालं. मोठा जनसमुदाय उपस्थित.
भाजप मुख्यालयात दुपारी एकपर्यंत वाजपेयींचं दर्शन घेता येणार.
सकाळी 8.00 - थोड्याच वेळात पार्थिव भाजप मुख्यालयात
अटल बिहारी वाजपेयी याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या 6, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी येत आहेत. थोड्याच वेळात वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना होणार आहे.
रात्री 9.19 - एका युगाचा अंत - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हीडिओ संदेश जारी करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते मला वडिलांसारखे होते, त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कुणीही भरून काढू शकत नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
रात्री 8.45 - 'राजकीय संवाद सुरूच राहावा'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणात राजकीय संवाद कधीच बंद होऊ नये, ही वाजपेयींची शिकवण महत्त्वाची वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
रात्री 8.30 - 'अटलजींचे स्वप्न पूर्ण करणे हीच श्रद्धांजली'
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बीबीसी प्रतिनिधी रोहन टिल्लू यांनी संवाद साधला.
रात्री 8.16 - पार्थिव निवासस्थानी आणण्यात आलं
वाजपेयी यांचं पार्थिव त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. दिल्लीतल्या स्मृतीस्थळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
रात्री 8 - पार्थिव निवासस्थाकडे रवाना
वाजपेयी यांचं पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात आलं आहे. तिथं ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
संध्याकाळी 7.49 - पद्मजा फेणाणींकडून आठवणींना उजाळा
गायिक पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींची कविता गाऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
संध्याकाळी 7.42 - विरोधकांचा सन्मान केला - सुमित्रा महाजन
वाजपेयी राजकारणाच्या आकाशात एका लखलखत्या ताऱ्या प्रमाणे होते, त्यांच्यात सर्वांना एकत्र आणण्याची हातोटी होती, तसंच त्यांनी कायम विरोधकांचा सन्मान केला, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे.
संध्याकाळी 7.34 - देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर
देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
संध्याकाळी 7.28 - प्रणव मुखर्जींनी व्यक्त केला शोक
वाजपेयींच्या जाण्यानं देशात एक पोकळी निर्माण झाली आहे. भारताच्या या सुपुत्राला माझी श्रद्धांजली, असं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.
संध्याकाळी 7.16 - आरएसएसकडून श्रद्धांजली
भारतीय संस्कृतीच्या मूल्यांना आपल्या विचारांतून राष्ट्र जीवनात प्रतिष्ठा देणारं एक व्यक्तीमत्व हरपलं, असं ट्वीट आरएसएकडून करण्यात आलं आहे.
संध्याकाळी 7 - ते सतत प्रेरणा देत राहतील - फडणवीस
वाजपेयी आपल्यात नसले तरी त्याचं द्रष्टेपण कायम राहील, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते सतत प्रेरणा देत राहतील असं एएनआयशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे.
संध्याकाळी 6.45 - 'माझ्यावर दुंःखाचा डोंगर कोसळला आहे'
"अटल बिहारी वाजपेयी यांच्या जाण्यानं माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी त्यांना वडिला समान मानत होते. माला माझे वडिल गेल्यासारखंच दुःख झालं आहे," असं लता मंगेशकर यांनी ट्वीट केलं आहे.
संध्याकाळी 6.38 - सचिन तेंडूलकरने वाहिली श्रद्धांजली
संध्याकाळी 6.30 - राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. भारतानं आपला लाडका सुपुत्र आज गमावला आहे असं म्हणत त्यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
संध्याकाळी 6.25 - त्यांची उणीव सदैव भासेल - अडवाणी
दु:ख आणि शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. भारताच्या अतुल्य व्यक्तिमत्वाला आपण पारखे झालो आहोत. आमचा स्नेह गेल्या 65 वर्षांचा होता. मी माझा घनिष्ठ मित्र गमावला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक असल्यापासून माझा आणि त्यांचा परिचय होता. भारतीय जन संघाच्या स्थापनेचा काळ, आणीबाणाचा कालखंड तसंच 1980मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उदयाचा काळ अशा विविध कालखंडात आम्ही एकत्र होतो.
स्थिर बिगरकाँग्रेस सरकारची मुहुर्तमेढ अटलजींनी रोवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपपंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
प्रत्येक कसोटीच्या क्षणी त्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांची नेतृत्वशैली, अमोघ वक्तृत्व, जाज्वल्य देशाभिमान यांच्याबरोबरीनं त्यांची माणुसकी, वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन मनं जोडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यांच्या कार्याचा माझ्या जीवनावर ठसा आहे.
संध्याकाळी 6.23 - एम्सबाहेर लोकांची गर्दी
वाजपेयी यांच्या निधनाची वार्ता कळताच एम्स रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. अटल बिहारी वाजपेयी अमर रहे, अशा घोषणा तिथं दिल्या आहेत.
संध्याकाळी 6. 11 - अटलजींच्या मराठी मित्रानं सांगितलेले किस्से
संध्याकाळी 6 - थोड्याच वेळा मंत्रिमंडळाची बैठक
संध्याकाळी साडेसहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे.
AIIMS ने पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. गेल्या 36 तासांमध्ये त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरप ठेवण्यात आलं होतं.
जवळपास नऊ आठवड्यांपूर्वी त्यांना नियमित तपासणीसाठी AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर युरिन इन्फेक्शनसाठी उपचार सुरू होते.
पण गेल्या 36 तासांमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याचं AIIMSने एका मेडिकल बुलेटिनद्वारे सांगितलं आलं होतं. मागील तीन दिवसांपासन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांयकाळी आणि गुरुवारी दुपारी AIIMS हॉस्पिटलमध्ये वाजपेयी यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून वाजपेयी यांच्या निधनाची माहिती देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना आठवणींना उजाळा दिला आहे.
"आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं कळल्यावर अत्यंत दुःख झालं. ते एक खरे भारतीय नेते होते. त्यांचं नेतृत्व, दूरदृष्टी, परिपक्वता आणि वक्तृत्व शैली अनोखी होती. सगळ्यांनाच त्यांची उणीव भासेल."
गुरुवारी सकाळीही भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही AIIMS हॉस्पिटलला भेट दिली होती.
1998 ते 2004 या काळात वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. घणाघाती वक्ता, प्रतिभावान कवी आणि सद्गृहस्थ राजकारणी, अशी प्रतिमा असलेले वाजपेयी गेल्या 14 वर्षांत क्वचितच सार्वजनिकरीत्या दिसले.
2004 साली 'शायनिंग इंडिया'ची घोषणा देणारा भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला आणि काँग्रेस सत्तेत आली. त्यानंतर वाजपेयींचा सार्वजनिक जीवनातला वावर एकाएकी कमी झाला.
वाजपेयी पंतप्रधान असतानाच 2000 साली त्यांच्या उजव्या गुडघ्याची वाटी बदलण्याचं ऑपरेशन मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झालं होतं. 2009 साली वाजपेयींना एक पक्षाघाताचा झटका आला होता आणि त्यांचं बोलणं पूर्णतः बंद झाल्याची माहिती त्यांचे मित्र N. M. घटाटे यांनी बीबीसीला दिली.
मार्च 2015मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)