You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विद्यार्थ्यांना कॉपी का करावी लागते? मुलांवर एवढा ताण कशाचा?
- Author, भाऊसाहेब चासकर
- Role, अॅक्टीव टिचर्स फोरम’चे संयोजक
औरंगाबादेतल्या MIT नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सचिन वाघ या विद्यार्थ्याला कॉपी करताना पर्यवेक्षकांनी पकडलं. आधी नापास होण्याच्या भीतीने कॉपी केली आणि आता ती पकडली गेल्यानंतर होणाऱ्या "बदनामी"मुळे त्याच्या मनात धडकी भरली. आणि याच भीतीपोटी त्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
मुलांच्या मनाचा असा कडेलोट का होतोय? याची चर्चा आता सुरू झाली आहे. अर्थात असं काहीतरी धक्कादायक, अघटीत घडल्याशिवाय संबंधित प्रश्नांकडे समाजाचं लक्षच जात नाही. चर्चाविश्व ढवळून निघत नाही, याचंच वैषम्य वाटतं.
पालकांच्या असंख्य आशा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन मुलं शाळा-महाविद्यालयांत येतात. मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं उघड्या डोळ्यांना दिसतं. त्याचं वजन मोजता येतं. पण मन-मेंदूवरचं ओझ, दडपण कितीतरी पटींनी जास्त असलं तरी ते काही दिसत नाही, म्हणून त्याकडे दुर्लक्ष होते.
शाळा-महाविद्यालयांमधला अभ्यास प्रत्यक्ष जगण्यापासून तुटलेला असतो. तो इतका निरस आणि कंटाळवाणा असतो की त्यासाठी बुद्धी, कौशल्य आणि अंगभूत क्षमता यांचा अतिशय कमीत कमी वापर करायला लागतो. शिकणं म्हणजे समृद्ध होणं, उन्नत होणं असे काही नसतं. या प्रक्रियेला मुले कंटाळतात. त्यात 'मूल्यमापन म्हणजे केवळ लेखी परीक्षा!' असा इथला खाक्या आहे.
काही सांस्कृतिक समूहातील मुलांकडे लिहून व्यक्त होण्याच्या कौशल्यांचा पिढीजात अभाव आहे/असतो. (याचा अर्थ ही मुलं काहीच शिकायच्या लायकीची नसतात, असं नव्हे! परीक्षा आणि इथली विशिष्ट व्यवस्था मात्र लेबल लावत असा गिल्ट पुष्कळ मुलांना देते.)
दोष कुणात - विद्यार्थ्याचा की शिक्षणपद्धतीचा?
नववी-दहावीपासून पुढच्या परीक्षांतले प्रश्नं विशिष्ट साच्याचे असतात. अनेकदा तर ते केवळ स्मरणावर आधारित असतात. आधी म्हटल्याप्रमाणे ज्या मुलांकडे पाठांतराला पूरक 'सांस्कृतिक भांडवल' नसतं, त्या मुलांचं यात मरण होतं. घोकंपट्टी किंवा पाठांतर अपरिहार्य बनतं. या गोष्टी आपसूकच मन-मेंदूवरचा ताण वाढवतात. मुलांना त्रासाच्या खाईत ढकलतात.
शैक्षणिक मानसशास्त्र सांगतं की "प्रत्येक मूल वेगळं असतं, युनिक असतं. मूल स्वत:च्या गतीने शिकतं."
आपल्याकडे 'सर्वांसाठी शिक्षण' याचा विचार करताना आम्ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील वैविध्य नाकारलं आहे! एखाद्या घटकाविषयी वर्गात एकदा 'लेक्चर' दिलं जातं. त्यातल्या आशयाचं मुलांना आकलन व्हावं, असं शाळा-महाविद्यालयांचं भन्नाट गृहीतक असतं. पुढे जाताना मुलांना किती समजलेलं आहे, याची खात्री करून घेतली जात नाही.
दहावीनंतरचा अभ्यासक्रम भयंकर बोजड आहे. विषयाच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नसताना, विषयाचं आकलन नसताना, त्यांचा अभ्यास स्वत: कसा करायचा आणि करड्या शिस्तीच्या वातावरणात लेखी परीक्षा द्यायची! मुलांवर काय बितत असेल? याची कल्पनाच केली बरी.
अभ्यासाच्या शाखा जर का तांत्रिक स्वरूपाच्या असतील आणि उत्तरं परक्या भाषेत लिहायची असतील तर मुलांच्या मेंदूचं भजं होतं. परीक्षेत विचारलेल्या अपेक्षित प्रश्नांची 'अपेक्षित उत्तरं' सर्वच मुलांना लिहिता आली पाहिजेत, ही अपेक्षाच मुळात किती अमानुष आहे.
नुसती घोकमपट्टी?
विषयांचं आकलन झालेलं नसताना लेखी परीक्षेला सामोरं जायची वेळ ओढवते तेव्हा 'शैक्षणिक रितेपण' मुलांना खायला उठतं. कॉपी करण्याचा मोह मुलांना होतो. संकल्पना पुरेशा स्पष्ट झालेल्या नसताना पाठ करून पेपरात उतरवणं (आणि पेपर लिहिल्यावर विसरून जाणं!) हीदेखील एकप्रकारची कॉपीच (कॉपी-पेस्ट) आहे, हे मानायला व्यवस्था तयार नाहीये.
पाठांतरवाली 'कॉपी-पेस्ट' करून किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कॉपी करून पेपर लिहून गुण मिळवून इथपर्यंत आलेले लोक आज धोरणकर्ते आहेत किंवा महत्त्वाच्या जागी बसलेत आणि ते कॉपीच्या विरोधात वगैरे असतात! त्यांच्या या कॉपीविरोधी मानसिकतेला नैतिकतेच्या मोजपट्ट्या लावायच्या नसतात! तसं केलं की ते भलतं खवळतात, अंगावर येतात.
मूल्यमापन म्हणजे 'फीड बॅक' घेणे. मूल्यमापनाचा अपरिहार्य भाग म्हणून परीक्षांचं विशिष्ट महत्त्व नाकारायचं काहीच कारण नाही. मात्र हल्ली मूल्यमापनाचा मूळ हेतू कुठे तरी हरवलाय, हेच खेदाने नमूद करायला लागतं. परीक्षा आणि मूल्यमापनामधून आपल्याला काय येतंय, काय येत नाही. आपली बलस्थानं काय आहेत आणि शिकण्याच्या शक्यता काय असू शकतात, हे मुलांना सांगणारं मूल्यमापन हवं.
करेक्शन करायला मुलांना वाव मिळायला हवा. शिकवणाऱ्या व्यक्तीला आपण कुठे कमी पडतोय, आपल्या पुढच्या कामाची दिशा कशी असावी, हे त्यातून समजायला हवं. "तुम्हाला काहीच येत नाही. तुम्ही काही कामाचे नाही आहात," असेच जणू आजची परीक्षापद्धती लक्षावधी मुलांना सांगत असते! त्यांचा आत्मविश्वास खलास करते. नापासीचा शिक्का भाळी मारत असते.
वास्तविकतः मुलं नापास होतात, तेव्हा शिक्षकांपासून सरकारच्या धोरणापर्यंत सारेच घटक नापास होत असतात.
शिकतोय सगळं, कामाचं किती?
वर्गात शिकणं-शिकवणं सुरू असतं म्हणजे प्रत्यक्षात नेमकं काय घडतं? अपयशी होणारी मुले काय करत असतात? त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं? त्यांच्यातील क्षमतांचा ते अधिक वापर का करत नाहीत? भीती आणि अपयश याचा परस्पर संबंध काय असतो? मुलांना अपयश कशामुळे येतं? आपली शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं, मूल्यमापन आणि परीक्षा याचा साकल्याने विचार केल्याशिवाय पुढे कसं जाता येईल?
मुंबई विद्यापीठात उच्च शिक्षण घेणारी अश्विनी म्हणाली, "दुःख परीक्षा असण्याचं नाहीये. परीक्षेच्या स्वरूपावर आमचे आक्षेप आहेत. त्यात आयुष्याशी जोडलेलं काहीच नाही. नाविन्य नसल्याचा वैताग आहे. इतक्या मास स्केलवर मुलांच्या मूल्यमापनासाठीचे नवे टूल तयार केलेले नाहीत. अभ्यासक्रम application based हवा. थिअरीसोबतच प्रॅक्टीकल्स, प्रोजेक्ट्सचं महत्त्व वाढायला हवं. काहीतरी घडलं की हा चर्चेचा विषय होतो. काही काळ हळहळ व्यक्त होते. पुढे काय होतं आपल्याला माहितीच आहे!"
परीक्षेतले प्रश्न मुलांना सापळ्यात अडकवण्याच्या हेतूने निवडले जातात. म्हणूनच "परीक्षा म्हणजे व्यवस्थेने मुलांविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे," असे 'प्रिय बाई' या जगभर गाजलेल्या पुस्तकात मुलं लिहितात!
परीक्षा नावाच्या जीवघेण्या प्रकाराकडे मुलांचं हे असं बघणं मोठ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं आहे. दहावी, बारावीत किंवा त्यापुढे उच्च शिक्षण घेणाऱ्या बहुसंख्य मुलांच्या मनात लेखी परीक्षेविषयी इतकी भीती का असते? याविषयी आपण गंभीर होऊन विचार आणि उपाय करत नाहीत तोपर्यंत कॉपी केसेस होत राहतील आणि पेपर फुटतच राहतील. तरुण जीवनिशी जातच राहतील. चार दिवस लोक हळहळतील...
वास्तविक परीक्षेतील गैरप्रकारांचे कॉपीचं समर्थन करणं हा लेखाचा उद्देश नाही. मात्र एक मोठी सामाजिक समस्या म्हणून माध्यमांनी कॉपी या प्रकाराचे महाभयंकरीकरण केले आहे. यामुळेच कॉपी पकडली गेल्यानंतर संबंधित मुलांना गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. त्या कथित बदनामीतून मुलं आत्महत्येसारखा टोकाचा पर्याय अंगीकारतात. अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळायच्या भीतीनेही मुले स्वत:ला संपवताहेत. परीक्षेच्या हंगामात कॉपीविषयी उच्चारवात बोलणारी माध्यमे एकूण शिक्षण प्रक्रियेचे मूल्यमापन करायला का धजावत नाहीत?
'करिअर मॅनिया'
शिक्षण मुलांना समृद्ध करण्यासाठी असते. इथे मात्र मुलांच्या संयमाचा सहनशीलतेचा कडेलोट होताना दिसतोय, तो का होतोय? सन 2000 नंतर जन्मलेल्या मुलांना प्रचंड वेगळं एक्सपोझर मिळालं आहे. त्यांचे भावविश्व भिन्न वेगळं आहे. पालक-शिक्षक मात्र पारंपरिक दृष्टिने त्यांच्याकडे बघतायत.
मुलांना नकार पचवणं जमत नाहीये. साध्या साध्या गोष्टीवर मुलं हिंसक होत आहेत, टोकाची प्रतिक्रिया देत आहेत. शालेय वयापासूनच करिअर, ताणतणाव, शरीराची वाढ-विकास याविषयी बोलायला हवं. त्यासाठी शाळाशाळांत समुपदेशक नेमले पाहिजेत.
एखादी परीक्षा जीवन मरणाचा प्रश्न कशी काय बनते? कथित अपयश मुलांना का छळतं? याचं कारण शिक्षण रोजगाराचं साधन बनलं आहे. नोकरीच्या संधी आणि मुलांची संख्या यांचं गुणोत्तर अत्यंत विषम आहे. या जीवघेण्या स्पर्धेतून परीक्षा अटीतटीची लढाई बनते. यशस्वी करिअर होणं, ही गोष्ट अनेक मुलांना तीव्र काळजीच्या खोल डोहात बुडवू बघतेय. मुले गटांगळ्या खाताय. निराशा, वैफल्य, विमनस्कता, मानसिक ताणतणाव वाढतच चाललेत. मुलांची मनं पोखरली गेलीत. व्यसने वाढलीत. तरुण स्वतःला समाजमाध्यमांत करमवताहेत. मनोविकास तज्ज्ञ काळजीत आहेत.
एका अभ्यासानुसार भारतातले 76 टक्के युवक 'करिअर मॅनिया'तून जात आहेत, असं अलिकडेच वाचण्यात आलं. समाज म्हणून हा आपल्या समोरचा चिंतेचा विषय असला पाहिजे. दुर्दैव हे आहे की सध्या तरी तसं दिसत नाहीये. घराघरांत मोठ्या संख्येने असलेल्या 'बच्चों के मन की बात' समाजधुरीण करू लागतील, तोच सुदिन!
शिक्षणशास्त्राचे किशोर दरक याविषयी बोलताना म्हणाले, की "कॉपी आणि त्यावरील उपायांबाबत 'आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी' अशी अवस्था आहे. असमान सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा व्यवस्थेच्या सोयीसाठी एकाच प्रकारे घेऊन त्याद्वारे त्यांची भविष्यकालीन कार्यजगतातली योग्यायोग्यता ठरवणं, हेच कॉपीचं मूळ आहे."
समाधान काय?
"यातून बाहेर पडायचं असेल तर योग्य मूल्यमापनासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण करणं, शिक्षण जगतात विश्वासाचे वातावरण निर्माण करून शिक्षकांना स्वायत्तता देणं आणि शालेय परीक्षांमधील गुणांचा भविष्यकालीन संधींशी असलेला यांत्रिक संबंध कमी करत कालांतराने पूर्णपणे संपुष्टात आणणं, हेच दीर्घकालीन उपाय असू शकतात," असं ते सांगतात.
वक्ता म्हणून प्रसिद्ध असलेले शिव खेरा यांच्या भाषणाचा व्हिडिओ युट्युबवर बघत होतो. त्यातलं एक दृश्य आठवलं - नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाच्या नाकातोंडाला व्हँटीलेटर बसवलेलं आहे. बाळाचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे... शिव खेरा यांचं त्यावरचं भाष्य मोठे चपखल आहे. ते म्हणतात "युही तो कहाँ जाता है कि ये शुरुआत की तकलीफें है। लेकीन सच ये है कि यह तकलिफों की शुरुआत है।"
"निरोगी मुलं ही आपल्या देशाची खरीखुरी संपत्ती आहे," असे सुविचार शाळेच्या भिंतीवर लिहून उपयोगाचं नसतं. मुलांसाठी हे जग सुंदर बनवलं पाहिजे! मोठ्यांनी आपलं मोठेपण सिद्ध करायला मुलांसाठी इतकं तरी केलंच पाहिजे, नाही का?
(लेखक हे नगर जिल्हा परिषदेच्या बहिरवाडी शाळेत शिक्षक असून 'अॅक्टीव टिचर्स फोरम'चे संयोजक आहेत. लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)