You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेरियार हे तामिळनाडूतले डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते का?
- Author, ए. डी. बालसुब्रमण्यम, बीबीसी तामीळ प्रतिनिधी
- Role, नीलेश धोत्रे, बीबीसी मराठी प्रतिनिधी
तामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात पेरियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची. म्हणूनच त्यांना औपचारिक आदरणीय व्यक्तीपल्याड असा सन्मान मिळतो.
ई. व्ही. रामास्वामी उर्फ पेरियार यांचा तामिळनाडूच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरचा प्रभाव वादातीत आहे. कम्युनिस्ट ते दलित चळवळ तसंच तामीळ राष्ट्रवादी ते पुरोगामी चळवळी, अशा विविध विचारप्रवाहांचं ते प्रेरणास्थान तसंच मार्गदर्शक आहेत.
त्यांनी कायम विवेकाची कास धरली. ते नास्तिक होते आणि उपेक्षित वर्गाचे तारणहार होते, मात्र त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल खाचखळग्यांनी भरलेली होती.
पेरियार यांनी 1919 मध्ये गांधीवादी विचारसरणीचे समर्थक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते काँग्रेसचे सदस्य होते. गांधीजींच्या मद्यविरोधी धोरण आणि अस्पृश्यता निवारणसारख्या विचारांनी ते आकर्षित झाले.
त्यांनी पत्नी नागम्मई आणि बहीण बालंबल यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त केलं. मद्यविक्री दुकानांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात या दोघी अग्रेसर होत्या. मद्यविक्रीला विरोध म्हणून पेरियार यांनी घराजवळील ताडीची झाडं तोडून टाकली होती.
पेरियार असहकार चळवळीतही सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना अटकही झाली होती. काँग्रेस पक्षाच्या मद्रास (आताचं चेन्नई) विभागाचे अध्यक्ष होते.
वायकोम सत्याग्रह
1924 मध्ये केरळमध्ये त्रावणकोर राजाने दलितांना मंदिरात प्रवेशबंदी केली होती. त्याविरोधात आंदोलन उभं राहिलं होतं. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना राजाने अटक करून तुरुंगात टाकलं. आंदोलन पुढे चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक होतं. त्यावेळी आंदोलनातील कार्यकर्त्यांनी पेरियार यांना नेतृत्व करण्याची विनंती केली.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी पेरियार यांनी मद्रास काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं. गांधीजींच्या आज्ञेविरुद्ध जाऊन त्यांनी ही भूमिका स्वीकारली. राजाचा मित्र असल्यानं त्रावणकोरमध्ये त्यांचं भव्य स्वागत झालं. मात्र राजाच्या धोरणाविरोधातच होणाऱ्या आंदोलनाचं निमित्त असल्याने पेरियार यांनी त्रावणकोर संस्थानतर्फे होणारं स्वागत नाकारलं.
राजाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनात सहभागी झाल्याने, मित्र असूनही त्यांना अटक करण्यात आली. अनेक महिने ते तुरुंगावासात होते. पेरियार यांच्या पत्नी नागम्मई यांनीही केरळमध्ये प्रचलित अस्पृश्येतविरोधात आवाज उठवला.
जातीआधारित आरक्षणाची काँग्रेस सभांमधली पेरियार यांची मागणी फेटाळण्यात आली. काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निधीवर चालणाऱ्या चेरनमादेवी गावातील वा. वे. सुब्रमण्यम अय्यर यांच्या गुरुकुल शाळेत भोजन देताना ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर असा भेदभाव करण्यात येत असल्याचं पेरियार यांना समजलं.
ब्राह्मण असणाऱ्या अय्यर यांना असं न करण्याची विनंती पेरियार यांनी केली. मात्र पेरियार यांची विनंती अय्यर यांनी धुडकावली. काँग्रेसने अय्यर यांच्या शाळेला देण्यात येणारा निधी पुरवठा थांबवावा, अशी त्यांची मागणीही मान्य करण्यात आली नाही. दोन्ही आघाड्यांवर अपयश आल्यानं पेरियार यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी ब्राह्णेतर समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली. या मंडळींना द्रविड कुळाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. (ब्राह्मण आर्य वंशाचे असल्याने त्यांनी द्रविड वंश स्वीकारला)
त्यानंतर 1916 मध्ये पेरियार साऊथ इंडियन लिबरल फाऊंडेशन अर्थात जस्टीस पार्टीचे अध्यक्ष झाले. ही ब्राह्णेतर चळवळ होती.
द्रविड कळगम्
द्रविड कळगम् पक्षाच्या स्थापनेसाठी 1944 मध्ये पेरियार यांनी स्वसन्मान मोहीम आणि जस्टीस पार्टी यांचं विलिनीकरण केलं. तामिळनाडूत हा पक्ष अनेक वर्षं सत्तेत आहे.
रशियाच्या दौऱ्यावर असताना पेरियार कम्युनिस्ट विचारसरणीकडे आकर्षित झाले. कम्युनिस्ट पार्टीचा जाहीरनामा तामीळ भाषेत भाषांतरित करण्याचं श्रेय पेरियार यांना जातं. महिलांच्या स्वातंत्र्यासंदर्भात त्यांचे विचार आजही प्रागैतिक आणि काळापुढचे समजले जातात.
बालविवाहाची प्रथा मोडीत निघावी, विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा, साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी, लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही तर सहजीवन असावं, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
मुलांना जन्म देण्याचं ओझं त्यांनी झुगारून द्यावं तसंच महिलांनी शिक्षण घ्यावं, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पेरियार यांच्या अनुयायांनी लग्न सोहळ्यातील रुढी बाजूला सारण्यासाठी प्रयत्न केले. लग्न झालेल्या महिलांना मंगळसूत्र परिधान करण्याची सक्ती नसावी यासाठी त्यांनी मोहीम आखली. महिलांच्या हक्कासाठी आयोजित परिषदेतच त्यांना पेरियार (महान) ही बिरुदावली मिळाली.
समाजातील अंधश्रद्धा आणि भेदभाव यांचं मूळ वैदिक हिंदू धर्मात आहे, असं पेरियार यांचं मत होतं. वैदिक हिंदू धर्मात समाजाची रचना एका उतरंडीसारखी असून ब्राह्मण अव्वल स्थानी आहेत. कडवे नास्तिक असल्याने त्यांनी देवाच्या अस्तित्वाला विरोधाची मोहीम राबवली.
दक्षिणेकडील राज्य स्वतंत्र भारतात सामील होण्याला पेरियार यांचा विरोध होता. दक्षिण भारत मिळून स्वतंत्र द्रविड नाडू अर्थात 'द्रविड राष्ट्र' असावं, असं त्यांचं मत होतं. मात्र अन्य राज्यांनी पेरियार यांना सहमती दर्शवली नाही.
समाजातल्या वंचित गटाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 1937 मध्ये तामीळ भाषिक जनतेला हिंदी बोलण्याची सक्ती करण्याच्या निर्णयाचा त्यांनी विरोध केला होता.
पेरियार यांनी कामाच्या निमित्ताने तामिळनाडू पिंजून काढला. अनेक सभा तसंच सार्वजनिक ठिकाणी त्यांनी आपले विचार मांडले. "मी बोलतोय, म्हणतोय म्हणून गोष्टी मान्य करू नका. सारासार विचार करा. तुमच्या मनाला पटलं तरच तसं वागा. अन्यथा सोडून द्या," असे त्यांचे उद्गार प्रसिद्ध होते.
नास्तिकवाद आणि ब्राह्मणविरोधी विचारांचे पाईक असूनही पेरियार आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी एकमेकांचे मित्र होते. सैव्यियट मठाचे धर्मगुरू कुंद्रकुडी अधीनाम यांच्याप्रती पेरियार यांना आदरभाव होता. अधीनाम यांनाही पेरियार यांच्याप्रती आस्था होती.
विवेकवाद, सर्वसमावेशकता, स्वसन्मान, धर्म आणि देवाच्या अस्तित्वाला विरोध, जात आणि पितृसत्ताक पद्धतीचं निर्मूलन या सगळ्या गोष्टींचा वारसा पेरियार यांनी दिला. धार्मिक भावना दुखावणं आणि परंपरांना विरोध यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
पेरियार आणि आंबेडकर
पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विचार मिळते-जुळते होते. ते एकप्रकारे तामिळनाडूचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते की त्यांच्याही पलिकडे जाणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं?
याबाबत लेखिका आणि पेरियार विचारक व्ही. गीता बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात,
"पेरियार यांचा चार गोष्टींना विरोध होता. ते नेहमी म्हणायचे की, जर तुम्हाला माझं तत्त्वज्ञान समजून घायचं असेल, तर मी ब्राह्मणांचा विरोध करतो, कारण ते स्वतःला इतर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ मानतात, मी श्रीमंतांच्या सामर्थ्याचा विरोध करतो, कारण ते भ्रष्टाचार करू शकतात आणि सगळ्यांच्या नशिबाचा फैसला करू शकतात. मला सुशिक्षित लोकांबद्दल साशंकता वाटते, कारण ते नेहमीच न्यायाच्या बाजूने उभे रहातात असं नाहीत आणि मी सर्व धर्मांच्या विरोधात आहे, कारण धर्म तुम्हाला विचार करण्यापासून रोखतो."
पेरियार हिंदू धर्माचे टीकाकार होते. त्यांचा खरंतर सर्वच धर्मांना विरोध होता, पण त्यांनी आंबेडकरांच्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी आंबोडकरांना पाठिंबा दिला होता.
"पेरियार जो लढा रस्त्यांवरुन, परिषदांमधून लढत होते त्याला राष्ट्रीय स्तरावर कायदेशीर स्वरुपात आणण्याचा प्रयत्न डॉ आंबेडकर करत होते," पेरियार विचारक अरुलमोळी याबाबत अधिक माहिती देताना सांगतात.
आंबेडकर आणि पेरियार यांच्या लढ्यात आणि विचारांमध्ये अनेक साम्यस्थळं आहेत, पण एका मुलभूत मुद्द्यावर मात्र आंबेडकर आणि पेरियार यांचे विचार अत्यंत वेगळे होते तो म्हणजे भारतीय संघराज्य. भारत हा उच्चवर्णीय, उत्तर भारतीय हिंदूंचाच देश राहील, अशी पेरियार यांना शंका होती.
"पेरियार हे भारत संघ-राज्याबाबत खूपच साशंक होते. त्यामुळेच अगदी घटना समितीतल्या चर्चेदरम्यान ते फारसे खूष नसायचे. त्यांना वाटायचं की ठीक आहे आपण घटनेच्या माध्यमातून अस्पृश्यतेची प्रथा बंद केली आहे, पण आपल्याकडे आजही जात आहेच. आंबेडकरांना मूर्ख बनवलं गेलं आहे, असं ते म्हणायचे," असं व्ही. गीता सांगतात.
उजव्या विचारांच्या लोकांचा विरोध
उजव्या विचारांच्या लोकांनी कायमच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे नेते म्हणून पेरियार यांच्याकडे पाहिलं आहे. संघ आणि भाजपने आंबेडकर स्वीकारले, पण पेरियार स्वीकारले नाहीत.
चेन्नई शहराचे आरएसएस प्रमुख गोपालकृष्णन के याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात,
"आर्य-द्रविड ही कल्पना ब्रिटीशांनी तयार केली... आणि पेरियारांनी याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला आणि पूर्णपणे नकारात्मक अशी जातीवर आधारीत विभागणी तमिळ समाजात केली."
ते पुढे सांगतात,
"आंबेडकर हे पूर्णपणे राष्ट्रवादी होते. त्यांचं सर्व लक्ष हे दलित समाजाला वर आणण्यावरच होतं. त्यासाठी त्यांनी खूप काम केलं आणि पूर्णपणे राष्ट्रवादी दृष्टिकोनातून केलं आहे. पण पेरियार यांच्याबाबत हीच समस्या आहे की त्यांनी फक्त हिंदू समाज, हिंदू श्रद्धा, हिंदू परंपरांवरच हल्ला केला आणि पूर्ण दांभिकतेने हल्ला केला. त्यांनी विवेक आणि नास्तिकतेचा केवळ तत्त्व म्हणून पुरस्कार केला नाही तर आपलं राजकारण पुढे नेण्यासाठी एक हत्यार म्हणून त्याचा वापर केला."
तामिळनाडू स्थित्यंतराच्या दिशेने?
पण आता मात्र तामिळनाडूचा समाज आणि मतदार स्थित्यंतराच्या वाटेवर आहे का? इथले तरुण उजव्याविचारांकडे जास्त आकर्षित होत आहेत का? तामिळनाडूच्या विधानसभेत भाजपच्या आमदारांचा झालेला प्रवेश त्याचंच द्योत्यक आहे का?
हेच सवाल आम्ही द हिंदूचे चेन्नईतले उपनिवासी संपादक डी सुरेश कुमार यांना विचारले. ते सांगतात,
"इथले तरुण आता विभागले गेले आहेत. तुम्ही असं नाही म्हणू शकत की सगळेच तरुण हे पेरियार यांची विचारसरणी मानणारे आहेत. ते विखुरलेले आहेत. काहींची साम्यवादी विचारसरणी आहे, काहींची पेरियार विचारसरणी आहे. आता तर अनेक तरुण असेही आहेत जे भाजपमध्ये जाऊन दाखल होत आहेत. तरुण उघडपणे प्रश्न विचारत आहेत. खास करून जर समाज माध्यमं पाहिलीत, तर तुम्हाला दिसेल की तरुण असा सवाल करत आहेत, की तुम्ही हिंदुत्व आणि हिंदूंचा विरोध का करत आहात?"
पूर्वी पेरियार यांच्या अनुयायांनी रामाच्या फोटोला चपलांचा हार घातला आणि गणपतीच्या मूर्ती फोडल्या, असं आजही तामिळनाडूतले वयोवृद्ध पत्रकार सांगतात. पण त्याच पेरियारांची नास्तिक परंपरा सांगणाऱ्या द्रविड मुन्नेत्र कळगमच्या स्टॅलिन यांना निवडणुकीआधी हातात मुरगन या देवतेचा भाला हातात घ्यावा लागला. गेली 5 दशकं पेरियारांच्या विचारांनी प्रभवित राजकारणात गेल्यानंतर आता तामिळनाडूनत बदल होताना दिसतोय. करुणानिधी आणि जयलालिता या दोघांच्या निधनानंतर भाजपने तिथे मोठे प्रयत्न केले, पण त्यांना लगेच यश नाही मिळालं. तरीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत डी सुरेश कुमार सांगतात,
"जसं पूर्वी ख्रिश्चन मिशनरी करायचे, तसं आता हिंदू गट तिथे जात आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये जात आहेत, दलित वसाहतींमध्ये जात आहेत. तेथे जाऊन हे पाठशाळा काढत आहेत. विनामूल्य पुस्तकं देत आहेत. विनामूल्य शिक्षण देत आहेत. त्याच बरोबर तिथे एक प्रार्थनाही घेतात. हळूहळू ते तरुणांना आरएसएसच्या शाखांप्रमाणे तयार करत आहेत. तर अशा प्रकारचे सोशल इंजिनियरिंग घेऊन येत आहेत."
तामिळनाडूचा समाज आणि राजकारण आता एक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन उभे आहेत. पेरियार यांच्या विचारांना उघड आव्हान देणाऱ्या भाजपसोबत अण्णाद्रमुकने युती केली आणि निवडणूक लढवली. त्यात अण्णाद्रमुकचा सपाटून पराभव झाला, पण भाजप मात्र 4 जागा जिंकू शकली. पेरियारना विरोध करून तामिळनाडूच्या विधानसभेत 4 जागा जिंकून आणणं, याचा अर्थ काय हे येणाऱ्या दिवसांत आणखी स्पष्ट होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)