डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारताना दिल्या होत्या 'या' 22 प्रतिज्ञा

फोटो स्रोत, VIJAY SURWADE
14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे दरवर्षी लाखो बौद्ध धर्मीय विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरला एकत्र येतात.
डॉ. आंबेडरकरांनी बौद्ध धर्म स्वीकारताना दिलेल्या 22 प्रतिज्ञांचीही नेहमी चर्चा होत असते. किंबहुना, मागील काही वर्षांमध्ये या प्रतिज्ञांवरून राजकीय वातावरण तापवण्याचे प्रयत्नही केले जातात.
असाच एक वाद 2022 मध्ये घडला होता. 5 ऑक्टोबर 2022 च्या दिवशी दिल्लीत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेतर्फे डॉ. आंबेडकर भवन इथे धर्मांतरणाच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात सुमारे दहा हजार जणांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञांचा पुनरुच्चार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हिंदू देवीदेवतांवर टीका करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्लीचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना त्या प्रकरणात राजीनामाही द्यावा लागलेला होता. मात्र ज्या 22 प्रतिज्ञांमुळे हा वाद निर्माण झाला त्या प्रतिज्ञा नेमक्या काय होत्या? त्यामध्ये हिंदू देवी देवतांचा खरोखर अपमान करण्यात आला होता का?
डॉ. आंबेडकरांनी कोणत्या 22 प्रतिज्ञा दिल्या?
बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथे बौद्ध धर्म स्वीकारताना त्यांच्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा किंवा बावीस शपथा घ्यायला लावल्या. यातल्या काही प्रतिज्ञांमध्ये आंबेडकरांनी मूर्तीपूजा किंवा देवी देवतांची उपासना नाकारली आहे.
आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा अशा आहेत :
- मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
- गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
- मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
- मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
- मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.

फोटो स्रोत, MEA
- सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
- मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
- मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
- तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
- मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
- मी चोरी करणार नाही.
- मी व्याभिचार करणार नाही.
- मी खोटे बोलणार नाही.
- मी दारू पिणार नाही.
- ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
- माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
- तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
- आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
- इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
आंबेडकरांनी दिलेल्या या प्रतिज्ञा घेणं ही भारतात त्यानंतर बौद्ध धर्मात प्रवेश करतानाची एक प्रथाच बनली आहे.
आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या?
आंबेडकरांच्या या 22 प्रतिज्ञांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात अशी ओरड होते आहे. पण आंबेडकरांनी दिलेल्या या शपथांमागचा उद्देश कुणाचा अपमान करण्याचा नव्हता, असं बौद्ध धम्माच्या अभ्यासक रुपा कुलकर्णी बोधी स्पष्ट करतात.
त्या म्हणतात, "या प्रतिज्ञा देणं म्हणजे गणपतीचा किंवा विष्णूचा अपमान करणं हे प्रयोजन नव्हतं. तर मूर्तीपूजा, कुलदेवता वगैरे मानणं, कर्मकांड, चमत्कारांच्या आहारी जाणं यातून त्यांना आपल्या समाजाला सोडवायचं होतं. बाबासाहेबांनी या सगळ्यांतला फोलपणा जाणला होता. त्यांना लोकांना एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग द्यायचा होता."

फोटो स्रोत, Getty Images/BBC
बौद्ध धम्माची पुस्तकं वाचणं, त्यातली प्राचीन भाषा समजणं सर्वांसाठी शक्य नाही, याची आंबेडकरांना जाणीव होती.
त्यामुळेच त्यांनी आपल्या अनुयायांना धम्माचं पालन कसं करावं हे सोप्या शब्दांत सांगणाऱ्या या प्रतिज्ञा दिल्या.
ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित पँथरचे सहसंस्थापक अर्जुन डांगळे सांगतात की "लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यावर पुन्हा जुन्या विचारांकडे वळणं बाबासाहेबांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी या प्रतिज्ञा दिल्या. आपण एक वेगळा जीवनमार्ग निवडतो आहे, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं.
बौद्ध धम्माचा स्वीकार म्हणजे द्वेषावर आधारीत व्यवस्था नाकारणं हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. बाबासाहेबांचा एकूण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लोकशाहीवादी, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक होता."
"ज्या माणसांना इथल्या धर्मानं आणि व्यवस्थेनं माणूसपणाची वागणूक दिली नाही किंवा सत्ता,संपत्ती, प्रतिष्ठा दिली नाही, त्या माणसांना एक नवी ओळख देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं.
त्यामुळे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करणं हे केवळ धर्मांतर नव्हतं, तर ती एक सामाजिक क्रांती होती. धर्माची मानसिक गुलामगिरी नाकारण्यासाठी या प्रतिज्ञा आहेत."
पण आंबेडकरांचा हा विचार बाजूला सारून धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जातो आहे, अशी खंतही ते व्यक्त करतात.
बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचीच दीक्षा का घेतली?
बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे. ते वकील होते, विद्वान होते, सामाजिक चळवळीत अग्रेसर होते. मात्र त्यांच्या कार्याचा लसावि काढायचा झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं, त्यांचा आत्मसन्मान वाढवणं आणि आत्मोद्धार करण्यास समर्थ करणं ही त्यांच्या आयुष्याचे मुख्य कार्य होते.
हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करणे, हिंदू धर्माची मानहानी आणि अवनती रोखणे आंबेडकरांना अपेक्षित होते. 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. Anhilation of caste या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर त्यांनी आसूड ओढले होते. शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला.
मात्र हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रुपा कुलकर्णी बोधी म्हणतात, "त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस.एम जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.
अनेक वर्तमानपत्रं केली. त्यातून सवर्ण समाजाचं प्रबोधन केलं. ती वापरत असताना सद्हेतुने कान उघडणी केली. 1942 पासून तर ते राजकारणातही होते. घटनाही लिहिली. घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते. तरीही त्यांचं समाधान झालं नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला."
मे 1956 मध्ये बीबीसीने आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध केलं. भाषणाचा विषय होता मला बौद्ध धर्म का आवडतो? या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, "मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात.बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो.तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे."

फोटो स्रोत, GOVERNMENT OF MAHARAHSTRA
असा केला बौद्ध धर्माचा स्वीकार
1955 सालानंतर त्यांची तब्येत ढासळत चालली होती. कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होईना. त्याच काळात बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचे कामही सुरू होते. आपण हयात असतांनाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं अशी त्यांची इच्छा होती.
24 मे 1956 ला आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली. बाबासाहेबांची प्रकृती खंगतच चालली होती. आपल्या समाजाच्या लोकांसाठी आपण काहीच करू शकलो नाही अशी बोच त्यांना लागली होती. राहिलेल्या अनेक गोष्टी त्यांना करायच्या होत्या.
दीक्षासमारंभ कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं. बुद्धधर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्र गतिमान कऱण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली. जर सर्व भक्तांनी धर्मांतर केलं नाही तर कसं ही भीती एकाने व्यक्त केली तेव्हा आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही ज्यांना माझ्याबरोबर धर्मातर करायचं आहे त्यांनी ते करावं असं बाबासाहेब म्हणाले.
23 सप्टेंबर 1956 ला त्यांनी एक पत्रक काढलं आणि 14 ऑक्टोबर 1956 ला आपण धर्मांतर करत असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी तेव्हाचे सर्वात वयोवृद्ध भिक्खु महास्थविर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आलं. आंबेडकर आणि त्यांची पत्नी 11 ऑक्टोबरला नागपुरात आले. बाबासाहेब नागपूरला आल्याचे कळताच अस्पृश्य वर्गाचे अनेक लोक आठवडाभरापासून नागपुरात येऊ लागले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले, 'बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार' अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्या.
आणि तो दिवस उजाडला...
14 ऑक्टोबर ला सकाळी प्रात;काळी उठले. कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून डॉ.आंबेडकर सकाळी श्याम हॉटेलमधून दीक्षाभूमीवर यायला निघाले. तिथे पोहोचताच प्रचंड जनसमुदायाने त्यांचं स्वागत केलं. जेव्हा ते व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाटाने आसंमत निनादून गेला.
व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धाची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याच्या बाजूंना दोन वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. नंतर चार भिक्षू आंबेडकर आणि त्यांची पत्नी त्यांना 'बुद्धं शरणं गच्छमि', 'संघं शरणं गच्छमि' हे मंत्र म्हणवून घेतले.
जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहण्याविषयीची पंचशीले म्हणवून घेत असताना तीन लाखांचा समूह तो सोहळा तन्मयतेने पाहत होता. आंबेडकर शपथ घेताना बुद्धाच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले. भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केले.
बुद्धमूर्तीला कमलांचा पुष्पहार वाहिला. हे झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्याबरोबर 'बाबासाहेब आंबेडकर की जय', 'भगवान बुद्ध की जय' असा जयजयकार करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहुर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले.

फोटो स्रोत, Getty Images
हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की, "मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेला नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन.
बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन" त्यानंतर ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं रहावं असं आव्हान त्यांनी जनसमुदायाला केलं.
जनतेचा तो समुदाय उभा राहिला. त्यांना पाच शपथा, पंचशील आणि बावीस शपथा म्हणावयास सांगितल्या. त्यादिवशी जवळजवळ तीन लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
बाबासाहेबांच्या कृतीचा परिणाम
दलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं. आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मात्र त्यानंतर अगदी 50 दिवसात त्यांचा मृत्यू झाला.
बाबासाहेबांच्या या कृतीचा बौद्ध धर्मावर झालेल्या परिणामाविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही. 14 ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते.
मात्र त्यात आंबेडकरांना सहभागी होता आलं नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचं आचरण करण्यात येतं पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. ज्या पद्धतशीर पद्धतीने व्हायला हवं होतं ते झालं नाही हे मान्य करावं लागेल."
1935 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्ष कृती करायला त्यांनां 21 वर्षं जावी लागली. या काळात त्यांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
त्यांच्या या कृतीची आठवण म्हणून अजुनही दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. दीक्षाभूमी हे नागपुरातील आणि भारतातील एक महत्त्वाचं स्थळ आहे. हजारो वर्षाच्या दडपशाहीविरुद्ध केलेल्या एल्गाराचे ते प्रतीक आहे. आज 65 वर्षानंतरही बाबासाहेबांची कृती अनेकांना प्रेरणा देते आणि देत राहील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








