सोलापूर लोकसभा : राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे यांची लढत चुरशीची होणार?

- Author, गणेश पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. पण रविवारी (24 मार्च) राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
प्रणिती शिंदे यांना आधी भाजपची ऑफर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्यांनी त्या सगळ्या चर्चांना बाजूला ठेवून गेल्या काही दिवसांपासून मतदार संघाचे दौरे, गावभेटी आणि कॉर्नर बैठका घेत प्रचार सुरू केला होता.
प्रणिती यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे.
वडील केंद्रात मंत्री असताना प्रणिती शिंदेंनी 'जाई-जुई' या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम सुरू केलं.
2009 साली प्रणिती शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सोलापूर मध्य इथून विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा प्रणिती यांनी माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा पराभव केला होता.
2014 मध्ये भाजपची लाट असताना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवला, तर 2019 मध्ये प्रणिती शिंदेनी आमदारकीची हॅट्रिक केली.
सध्या प्रणिती या राष्ट्रीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य आहेत. तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष पद त्यांच्याकडं आहे.
आता 2024मध्ये काँग्रेसनं प्रणिती शिंदेना पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन लोकसभा निवडणुका पाहता सोलापूर लोकसभेचा पेपर भाजपसाठी सोपा गेला आहे.
दोन्ही वेळा भाजपने नवीन उमेदवार देऊनही त्यांना घवघवीत यश मिळालं. यंदाही भाजपने नवीन उमेदवार जाहीर केला आहे.
प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन्ही नेते तरुण आहे. दोघांचे भाषणकौशल्य चांगलं आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेची निवडणूक ही लढत चुरशीची होणार आहे.
प्रणिती शिंदे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात दौरे करून जनसंपर्क वाढवल्याचं सांगितलं जातंय.
पण 2024च्या आधी प्रणिती शिंदे क्वचितच आपला विधानसभा मतदारसंघ सोडून बाहेर पडल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा प्रभाव मर्यादित आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
कधीकाळी वडील सुशीलकुमार शिंदेंचं वर्चस्व असलेला सोलापूर मतदारसंघ प्रणिती शिंदे पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणतील का? की लिंगायत आणि पद्मशाली समाज बहुल मतदारसंघ परंपरेप्रमाणे भाजप म्हणजे राम सातपुते यांचीच साथ देणार? हे आपण जाणून घेऊयात.
कोण आहेत राम सातपुते?
राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते म्हणाले, "सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. 'सच्च्या कार्यकर्त्यांना संधी' हे माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे आणि हे तत्त्व पक्ष काटेकोरपणे पाळतो, याचा खरोखर अभिमान वाटतो."
राम सातपुते यांनी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकलं. ते मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. वडील ऊसतोड कामगार होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब माळशिरससारख्या ऊस पट्ट्यात आले आणि इथेच स्थायिक झाले.

फोटो स्रोत, RAM SATPUTE
राम सातपुते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. तेव्हापासून त्यांनी सक्रियपणे विद्यार्थी संघटनेचे काम केले.
2015 च्या दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थी नेत्यांना अटक झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे समर्थन केलं होतं.
या पार्श्वभूमीवर राम सातपुते आणि इतर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठे आंदोलन केलं. त्यानंतर सातपुते चर्चेत आले होते.
वर्षभरापूर्वी विधानसभेमध्ये राम सातपुते यांच्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख झाला होता. त्यावर विधानसभेत गदारोळ झाला होता. त्यानंतर सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
1952 मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली.
तेव्हापासून अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे.
2009मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा राखीव मतदार संघ म्हणून घोषित करण्यात आला.
तेव्हा सुशीलकुमार शिंदे निवडून आले. पण 2014च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि त्याठिकाणी भाजपच्या शरद बनसोडे या नवख्या उमेदवाराचा विजय झाला होता.
2014 पासून हा मतदारसंघ भाजपकडेच आहे. 2019मध्ये भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडून आले. तेव्हा त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचाच पराभव केला होता.

फोटो स्रोत, ANI
यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा होती. त्यामुळेच याठिकाणी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात उशीर झाला, असं सांगण्यात येत आहे.
2014 आणि 2019 मध्येही सोलापूरसाठी उमेदवार शोधण्यासाठी भाजपला धडपड करावी लागली होती.
पण भाजप धक्कातंत्र देण्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेवटच्याक्षणी एक हटके नावही पुढे येऊ शकते, असाही बोलबाला होता. पण तसं यंदा घडलं नाही.
सोलापूरची सामाजिक आणि राजकीय गणितं
बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाला लागून आहे. सोलापूर शहरात मराठी, तेलुगू आणि कन्नड मातृभाषा असणारे नागरिक राहतात.
"सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते-पाटील यांच्यात अनेकवर्षं एक अलिखित नियम होता. त्यानुसार सुशीलकुमार शिंदे त्यांचा मतदारसंघ आणि सोलापूर शहराचं राजकारण सांभळणार. तर उर्वरीत सोलापूर जिल्ह्याचे राजकारण मोहिते पाटील पाहणार," असं लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा लिंगायत बहुल मतदारसंघ आहे.
त्यानंतर पद्मशाली समाज, मुस्लीम अनुसूचित जाती, धनगर समाज यांचा क्रमांक येतो. इथला लिंगायत समाज परंपरेप्रमाणे भाजपला मतदान करत आला आहे.
2014 साली शरद बनसोडे आणि 2019 मध्ये जयसिद्धेश्वर स्वामींनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. त्यावेळी लिंगायत समाजाचं एकहाती मतदान हे भाजपला पडलं होतं.
पण वंचित बहुजन आघाडीसुद्धा अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर आपला दावा करत आहे.
सोलापूर मतदारसंघात 2014च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि 2019ला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता.
त्याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता. त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता.
पण सध्या प्रकाश आंबेडकर हे INDIA आघाडीमध्ये गेले तर तिथे तिथली मत पुन्हा कॉंग्रेसला मिळतील. दलित मुस्लिम मतांचं विभाजण होणार नाही. MIM जरी वंचितपासून वेगळी झाली असली तरी मविआमध्ये जाण्यासाठी त्यांचेही प्रयत्न चालू आहेत.
मतदारसंघातील प्रमुख समस्या
या मतदारसंघाचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित मतदारसंघ आहे.
तसंच इथल्या विकासाच्या मुद्द्यांकडे राजकीय नेत्यांची कायम अनास्था दिसून येते.
सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आहे. सोलापूरच्या लोकांची आणि शेतीची तहान भागावी म्हणून हे धरण बांधण्यात आलं. पण अजूनही सोलापूर शहरात आठवड्यातून एक किंवा दोनवेळाच पाईपलाईनद्वारे पाणी येते. उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे शहराला पाणी पुरवलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून समांतर पाईपलाईनचा प्रश्न रखडला आहे. त्याचं काम संथगतीने सुरू आहे.
'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी या मतदारसंघाची अवस्था आहे.
दुसरीकडे मोठे उद्योग आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण व्यवस्था नाहीये. सोबत गटातटाचे राजकारण आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत नसल्याचं सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक पत्रकार सांगतात.











