शीतल म्हात्रेंचा व्हीडिओ व्हायरल, ठाकरे गटाने म्हटलं ‘हा बेशरमपणा’…

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्या खालीलप्रमाणे –

1. शीतल म्हात्रेंचा व्हीडिओ व्हायरल, ठाकरे गटाने म्हटलं ‘हा बेशरमपणा’…

शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

झाल्या प्रकाराबद्दल शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. ही बातमी TV9 मराठीने दिली आहे.

शीतल म्हात्रे म्हणाल्या, ““स्त्री म्हणून आज वेदना होत आहेत. आवडीपोटी राजकारणात आले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले स्वत:ला सिद्ध केलं. ज्यानंतर निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांचा विचार घेऊन निघालेल्या एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचं ठरवंल. गेल्या 8-9 महिन्यात ट्रोल केलं जात आहे, कमेंट केल्या जात आहेत. मात्र आम्ही आमच्या कामाकडे लक्ष देवून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र काल मागाठणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमात आले होते. तेव्हा मॉर्फ करुन वाईट मेसेजसह व्हीडिओ तयार करण्यात आला. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर बोललं जातं.”

या प्रकरणी दोन लोकांना अटक झाली आहे.

दुसरीकडे ठाकरे गटानेही याला प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणं म्हणजे बेशरमपणा आहे. त्यांना वाटतं की आमच्याकडे काही उद्योग नाही. ज्यांनी स्वत:च नाव बदनाम केलंय. ज्यांनी 50 खोके खाऊन काम करतायेत, आम्ही त्यांच्यासाठी व्हीडिओ बनवणार?” असा सवाल ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित केला आहे.

2. ‘शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही’ - कृषी मंत्री अब्दुल सत्तार

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान अशातच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र असे असताना शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, “शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही.”

अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. ही बातमी ABP माझाने दिली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली असल्याचं देखील सत्तार म्हणाले.

3. ‘15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली’ व्यावसायिकाच्या पत्नीचा आरोप

सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासची पत्नी सान्वी मालू पतीवर गंभीर आरोप करत आहेत.

सतीश यांची हत्या विकासने केली असल्याचा आरोप सान्वी सातत्याने करत आहे. विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते. त्याच्याकडे 15 कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली असल्याचं सान्वी म्हणत आहेत.

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

यावर आता या सगळ्या प्रकरणावर सतीश यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी मौन सोडलं आहे. माध्यमांशी बोलताना त्या “पोलिसांनी संपूर्ण तपास केला आहे. यानंतरही सतीश यांची हत्या करण्यात आली असं ती (सान्वी मालू) का बोलत आहे? हे कळत नाही. पोलिसांनीही या प्रकरणामध्ये तपास करावा असंही मला वाटत नाही. कारण जे काही घडलं ते सगळं समोर आहे.”

4. तपास यंत्रणांच्या गैरवापरावर विरोधक केंद्राची कोंडी करणार; रणनीती आखण्यासाठी बैठक

संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत असून वित्त विधेयक संमत करण्यास आमचे प्राधान्य असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे, तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होत असलेली कारवाई व अदानी उद्योगसमूहाबद्दल झालेले आरोप या दोन मुद्द्यांवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित काळात केंद्र सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे.

ही बातमी लोकमतने दिली आहे.

केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखण्याकरिता विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी होणार आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी उद्योगसमूहाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याची केंद्र सरकारने उत्तरे द्यावी, अशी मागणी काँग्रेस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातही लावून धरणार आहे, असे त्या पक्षाचे नेते के. सुरेश यांनी सांगितले. अदानी उद्योगसमूहावरील आरोपांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने संयुक्त संसदीय समिती नेमावी, या मागणीचाही काँग्रेसने पुनरुच्चार केला आहे.

5. समलैंगिक विवाह आदर्श नाही, हे देशाच्या परंपरेच्या विरोधात: केंद्र

केंद्र सरकारने समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे. त्यासाठी केंद्राने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

या प्रतिज्ञापत्रत केंद्र म्हणाले, स्त्री व पुरुष (विषमलिंगी) यांचा विवाह समाजाचे अस्तित्व आणि सातत्य राखण्याचे मूलभूत तत्त्व आहे. समलैंगिक विवाह आदर्श होऊ शकत नाहीत. ते भारतीय परंपरेच्या विरुद्ध ठरतात.

ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.

केंद्र सरकार असंही म्हणाले, भारतात कुटुंबव्यवस्थेची संकल्पना म्हणजे पती-पत्नी आणि त्यांची अपत्ये अशी आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाल्यास हुंडा, काैटुंबिक हिंसाचार कायदा, घटस्फाेट, पाेटगी, हुंडाबळीसारख्या सर्व कायदेशीर बाबींची अंमलबजावणी करणे कठीण हाेईल. हे सर्व कायदे पुरुषाला पती व महिलेस पत्नी मानून तयार करण्यात आले आहेत. सर्वाेच्च न्यायालयात साेमवारी या प्रकरणात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठासमाेर याचिकेवर सुनावणी हाेईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)