जेव्हा फक्त 6 दिवसांच्या युद्धामुळे सुएझ कालवा तब्बल 8 वर्षांसाठी बंद पडला होता

फोटो स्रोत, Getty Images
इजिप्तमधला सुएझ कालवा हा जगभरातल्या व्यापाराचा कणा आहे. तांबड्या समुद्राला भूमध्य समुद्राशी जोडणाऱ्या या एकाच कालव्यातून जगभरातली दहा ते बारा टक्के मालवाहतूक होते. त्याची किंमत सुमारे 9.5 अब्ज डॉलर्सहून अधिक आहे.
सध्या हा कालवा पुन्हा चर्चेत आला आहे कारण तांबड्या समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या येमेनमधले हुथी बंडखोर इथून जाणाऱ्या इस्रायल समर्थक देशांच्या जहाजांवर हल्ले करत आहेत.
साहजिकच सुएझ कालव्यातून होणाऱ्या मालवाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश व्यापारी जहाजांना सुरक्षेचा विचार करता सुएझ कालव्याऐवजी आफ्रिकेला वळसा घालून लांबच्या मार्गानं जावं लागत आहे.
हा संघर्ष मिटेपर्यंत ही स्थिती बदलणार नाही, अशी चिन्हं आहेत.
पण सुएझ कालवा बंद होण्याची किंवा एखाद्या युद्धामुळे इथली वाहतूक ठप्प होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
2021 साली एव्हरगिव्हन हे व्यापारी जहाज सुएझ कालव्यात आडवं अडकल्यानं या समुद्री मार्गावर ऐतिहासिक ट्रॅफिक जॅम लागला होता.
400 मीटर लांब आणि 60 मीटर रुंदीचं हे जहाज सोडवण्यासाठी लाखो टन वाळू उपसावी लागली. त्यानंतर सुएझ कालव्यातील वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.
त्याआधी जून 1967 मध्येही एका युद्धामुळे हा कालवा बंद झाला होता.

त्यावेळी इजिप्त, सीरिया आणि जॉर्डनचं इस्रायलसोबत युद्ध सुरू झाल्यानं 15 व्यापारी जहाजं सुएझ कालव्यात अडकली होती. त्यातलं एक बुडालं आणि पुढची जहाजं तब्बल आठ वर्षं तिथेच कैद होऊन अडकली.
इतिहासामध्ये हे युद्ध 'सहा दिवसांचं युद्ध' म्हणूनच ओळखलं जातं. कारण सहाच दिवस हे युद्ध चाललं होतं.
पण सुएझ कालवा इतकी वर्षं बंद का ठेवला गेला? आणि या संघर्षाची नेमकी सुरूवात कशी झाली होती?
अरब-इस्रायल युद्ध
राष्ट्रपती गमाल अब्दुल नासिर यांच्या नेतृत्वाखाली इजिप्तने मे, 1967 साली इस्रायलच्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवायला सुरूवात केली होती.
इस्रायलसोबत कोणत्याही तऱ्हेचा संघर्ष उद्भवलाच, तर या शेजारी देशाला पूर्णपणे उद्धवस्त करण्याचाच त्यांचा हेतू होता.
सीरियानेही इस्रायलला नेस्तनाबूत करण्याच्या धमक्या द्यायला सुरूवात केली.
अनेक आठवडे तणाव कायम राहिल्यानंतर पाच जून 1967 ला निर्वाणीची लढाई सुरु झाली. त्याच दिवशी इस्रायलनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत इजिप्तवर बॉम्ब हल्ला केला आणि त्यांच्या हवाई दलाचं 90 टक्के नुकसान केलं.

फोटो स्रोत, Getty Images
सीरियाच्या हवाई दलाचीही अवस्था इस्रायलनं अशीच केली होती. जेव्हा हा बॉम्बहल्ला सुरू होता तेव्हा बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, फ्रान्स, पोलंड, स्वीडन, पश्चिम जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिकेची 15 व्यापारी जहाजं सुएझ कालव्यातून प्रवास करत होती.
पीटर फ्लॅक त्यावेळी ब्रिटनच्या 'एगापेनोर' जहाजावर होते. त्यांनी 2020 साली बीबीसी रेडिओ फोरशी बोलताना म्हटलं होतं,
"आमचं जहाज सुएझ कालव्याच्या दक्षिण टोकाला पोहोचलं, आमच्या कॅप्टननं सांगितलं की, इस्रायल आणि अरब देशांदरम्यान युद्ध सुरू झालं आहे."
"आम्ही पुढे सरकलो तसं आम्ही लढाऊ विमानं वाळवंटावरून उडताना पाहिली. मला अजूनही आठवतंय. इस्रायली विमानं खूप खालून उडत होती. इजिप्तच्या हवाई तळांवर ते बॉम्ब टाकत होते आणि त्यांचा नेम अचूक होता."
सुएझ कालव्याचा रस्ता
मलेशियाहून रबर आणि प्लॅस्टिकची खेळणी घेऊन चाललेलं 'एगापेनोर' हे ब्रिटीश जहाज सुएझ कालव्यात अडकलेल्या 15 जहाजांपैकी एक होतं.
चीनवरून अक्रोड आणि पाम तेल घेऊन जाणाऱ्या 'मेलम्पुस' जहाजावर त्यावेळी तैनात असलेल्या जॉन ह्यग्स यांनी बीबीसी रेडिओ फोरला सांगितलं होतं,
"सिनाईच्या वाळवंटातून दोन इस्रायली लढाऊ विमानांनी उड्डाण केलं. ते आमच्या जहाजावरून गेलं. कानाचे पडदे फाटतील एवढा मोठा त्या विमानाचा आवाज होता."
इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात एक जहाज बुडालं. ते अमेरिकन जहाज होतं. याच दरम्यान सुएझ कालव्यात असलेल्या जहाजांना ग्रेट बिटर तलावात आश्रय घेणं भाग पडलं.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील कँपबेल विद्यापीठात सागरी मार्गाच्या इतिहासाचे प्राध्यापक असलेले सेल मर्कोग्लियानो सांगतात, "सुएझ कालव्यात त्यावेळी अडकलेल्या जहाजांना कोणाचाही निशाणा बनायचं नव्हतं. त्यामुळेच त्यांना ग्रेट बिटर तलावात आश्रय घ्यावा लागला."
युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इजिप्तनं सुएझ कालव्याच्या अगदी शेवटच्या टोकाला एक जहाज बुडवलं. तिथे स्फोटकं आणि सुरूंग पेरले, जेणेकरून तो मार्ग बंद होईल आणि इस्रायल येण्या-जाण्यासाठी सुएझ कालव्याचा वापर करू शकणार नाही.
तिन्ही अरब देशांच्या पराभवानंतर हे युद्ध दहा जूनला संपलं. मात्र इजिप्तनं सुएझ कालव्याचा रस्ता बंदच ठेवला आणि तिथे अडकलेली 14 जहाजं बाहेर पडू शकली नाहीत.
संघर्ष टोकाला पोहोचल्यावर आणि हे युद्ध संपल्यानंतरही ग्रेट बिटर तलावात अडकलेल्या जहाजांवरच्या लोकांचं आयुष्य कठीण बनलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
2010 साली बीबीसी रेडिओ फोरवर प्रसारित झालेल्या 'द यलो फ्लीट' या कार्यक्रमात प्रेझेंटर पीटर स्नो यांनी सांगितलं की, राजनयिक चर्चांनंतर जहाजावर अडकलेल्या लोकांना घरी पाठविण्यात आलं, पण त्यांच्यापैकी काही जणांना तीन महिन्यांपर्यंत तिथेच राहावं लागलं होतं.
प्रोफेसर सेल मर्कोग्लियानो सांगतात, "सुएझ कालव्यात अडकलेली जहाजं त्या देशांची होती, ज्यांचा इजिप्त आणि इस्रायलसोबत कोणताही तह होऊ शकला नव्हता. काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही."
सुएझ कालवा अनिश्चित काळासाठी बंद राहिल अशी चिन्हं दिसायला लागली, तेव्हा जहाज कंपन्यांनी आपापल्या जहाजांवरील सामान आणि मशिनरीच्या देखभालीसाठी आपल्या स्टाफची नेमणूक करायला सुरूवात केली आणि वेळोवेळी त्यांची बदली केली जाऊ लागली.
मर्कोग्लियानो यांनी सांगितलं की, इथं अडकलेल्या जहाजांवर तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी 'ग्रेट बिटर लेक असोसिएशन' ची स्थापना केली, जेणेकरुन त्यांचं काम चालू राहिल आणि ते मानसिकदृष्ट्याही सक्षम राहतील.

फोटो स्रोत, Getty Images
'ग्रेट बिटर लेक असोसिएशन'ने ऑलिंपिकच्या धर्तीवर एका क्रीडा स्पर्धेचंही आयोजन केलं होतं. त्यामध्ये डायव्हिंग, शूटिंग, स्प्रिंटिंग, वॉटर पोलो, तीरंदाजीसारख्या 14 खेळांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. इतकंच नाही तर सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांचंही वाटप केलं होतं.
असोसिएशनने टेबल टेनिसपासून फुटबॉलपर्यंत अनेक खेळ खेळून पाहिले. स्वतःचं पोस्ट ऑफिस उघडलं. अगदी पोस्टाची तिकिटंही काढली, जी नंतर जगभरातील संग्राहकांना देण्यात आली.
मर्कोग्लियानो सांगतात, "मात्र जेव्हा अनेक वर्षांनंतरही जहाजांची कोंडी कायम राहिली, तेव्हा अनेक कंपन्यांनी आपली जहाजं निकामी झाल्याचं घोषित करून विमा कंपन्यांकडे नुकसानभरपाईचे दावे केले."
या जहाजांवर सिनाईच्या वाळवंटातून येणाऱ्या पिवळ्या रेतीचा थर जमा झाला होता आणि असंच सोडून दिल्यामुळे या जहाजांना 'यलो फ्लीट' असंही म्हटलं जाऊ लागलं होतं.
सुएझ कालवा बंद ठेवल्याचा नेमका परिणाम काय झाला?
इतिहासकार लिंकन पेन यांनी 'द सी अँड द सिव्हिलायझेशन : अ मेरिटाइम हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड' या नावानं एक पुस्तक लिहिलं आहे.
त्यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं की, सुएझचा कालवा 1869 पासून खुला झाला होता. पण 1960 च्या दशकापर्यंत या मार्गावरून होणारा व्यापार प्रचंड वाढला होता. हा एक अतिशय महत्त्वाचा सागरी मार्ग बनला होता आणि या मार्गानं जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेहून जावं लागायचं नाही."

फोटो स्रोत, Getty Images
लिंकन पेन सांगतात, "त्यामुळेच 1967 साली जेव्हा हा मार्ग बंद झाला होता, तेव्हा त्याचा परिणाम सगळ्या जगावर झाला. दीर्घकाळापर्यंत तो टिकून राहिला. सर्वाधिक प्रभाव इजिप्तवर झालेला पहायला मिळाला. कारण इजिप्तच्या जीडीपीचा चार टक्के हिस्सा हा सुएझ कालव्यातून जाणाऱ्या जहाजांमधूनच यायचा."
"अरब देशांसमोरील अडचणही वाढली. कारण त्यांच्या देशातून जाणाऱ्या तेलाची वाहतूकही याच मार्गानं व्हायची. परिणामी युरोपला रशिया अधिक तेल विकायला लागला. जगाच्या आर्थिक चक्राला अमेरिका आणि युरोपच गती देत होते. तेव्हा चीन आर्थिक महासत्ता बनला नव्हता. युरोप जी जहाजं पाठवायचा, ती छोटी असायची. त्यांना आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरून पुढे जावं लागायचं त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढायचा."
लिंकन पेन पुढे सांगतात, "आफ्रिकेचा हा रस्ता चांगलाच लांब पल्ल्याचा पडायचा. त्यामुळे नंतर हे ठरवलं गेलं की दोन लहान जहाजं पाठविण्याऐवजी एकच मोठं जहाज पाठवलं जावं. त्यानंतर जहाजांचा आकार वाढत गेला. 1975 साली जेव्हा सुएझ कालव्याचा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला, तेव्हा अशी काही जहाजं होती, जी त्या मार्गानं जाऊ शकत नव्हती. त्यामुळेच इजिप्तनं कालव्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेतलं."
सुएझ कालवा खुला कसा झाला?
लिंकन पेन सांगतात," सुएझ कालव्याचा रस्ता बंद करून इजिप्त पाश्चिमात्य देशांना एक संदेश देऊ पाहत होता. पाश्चात्य देश इस्रायलचं समर्थन करतात, असा इजिप्तचा समज होता. तेलाचा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळा निर्माण करून अमेरिका आणि युरोपला मध्य पूर्वेबद्दलची भूमिका बदलण्यास भाग पाडू असं इजिप्तला वाटत होतं. "
मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. सुएझ कालव्याची नाकाबंदी चांगलीच ताणली गेली. आपण कमकुवत नाहीये, हेच दाखविण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न होता.
सुएझची ही कोंडी पुन्हा एकदा एका युद्धानेच फुटली.

फोटो स्रोत, Getty Images
1973 साली योम किप्पुरची लढाई झाली. यामध्ये इजिप्त आणि सीरियानं इस्रायलवर हल्ला केला. हा हल्ला ज्यू कॅलेंडरमध्ये सर्वांत पवित्र मानल्या गेलेल्या दिवशीच केला गेला.
लिंकन पेन सांगतात की, योम किप्पुरच्या लढाईनं सर्वच पक्षांना चर्चेसाठी एकत्र यावं लागलं. सुएझ कालव्याचा मार्ग खुला केला जावा, यावरच तडजोड झाली.
सुएझ कालवा बंद ठेवून कोणाचंच काही भलं होणार नाही, हे सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं. नासर यांचे उत्तराधिकारी अन्वर अल् सादात यांच्या नेतृत्वाखाली इजिप्तनं आपला जुना निर्णय बदलला.
बुडवलेली जहाजं तसंच स्फोटकं हटविण्यामध्ये वर्षभराचा वेळ गेला आणि अखेरीस पाच जून 1975 ला सुएझ कालवा वाहतुकीसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आला. ज्या दिवशी अरब-इस्रायल युद्ध सुरू झालं होतं, तोच हा दिवस होता.
तिथं अडकलेल्या 14 जहाजांपैकी केवळ दोनच जहाजं पुन्हा समुद्रात प्रवास करण्याच्या योग्यतेची राहिली होती. ही दोन्ही जहाजं जर्मनीची होती. बाकी जहाजांना तिथून ओढून बाहेर काढलं आणि नष्ट करण्यात आलं.
मर्कोग्लियानो सांगतात की, अशाप्रकारे आलेल्या अडचणीतूनच सुएझचा कालवा किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित होत गेलं. एक अडकलेलं जहाज किंवा एक छोटी वाटणारी लढाईही जगाच्या व्यापारात अडचणी निर्माण करू शकते.











