खर्डा लढाई कशी झाली होती? त्यामुळे देशावर काय परिणाम झाला?

नाना फडणवीस, मराठी, पेशवे, महाराष्ट्र, पानिपत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणवीस
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

'शत्रूच्या दिशेनी (मराठ्यांच्या दिशेने) एक रॉकेट आले आणि त्याने वझीर खानाला टिपले. त्यात निजामाचा सरदार वझीर खानाचा मृत्यू झाला,' असं वर्णन एक इंग्रज अधिकारी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याला लढाईचा वृत्तांत सांगताना करतो.

खर्ड्यात जी लढाई झाली होती त्यामध्ये केवळ अग्निबाणच नाही तर मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याचा वापर करण्यात आला होता.

'मराठ्यांना खंडणी का द्यावी त्यापेक्षा हा पैसा आपण युद्धावर खर्च करू' असं म्हणणारा निजामाचा पंतप्रधान लढाईत पराभूतच नाही तर बंदिवान देखील झाला.

11 मार्च 1795 ला झालेल्या ही लढाई मराठा साम्राज्याची शेवटची यशस्वी लढाई म्हणून ओळखली जाते.

15 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार जामखेड तालुक्यातील खर्डा येथे 74 फुटांचा भगवा ध्वज उभारणार आहेत. त्यामुळे खर्ड्याचं नाव सध्या चर्चेत आहे.

रोहित पवार

फोटो स्रोत, @RRPSpeaks

फोटो कॅप्शन, खर्डा येथील किल्ला

'खर्डा येथील किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे पण त्याचबरोबर या किल्ल्याची तसेच खर्ड्याच्या लढाईची माहिती जनमानसाला व्हावी या उद्देशाने आपण हा ध्वज उभारणार आहोत,' असं रोहित पवार यांनी सांगितले आहे.

त्यानिमित्ताने खर्ड्याची लढाई काय आहे आणि ती कशामुळे झाली होती लढाईचे ऐतिहासिक महत्त्व काय? याविषयी शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

या लढाईची पार्श्वभूमी काय?

11 मार्च 1795 रोजी ही लढाई निजाम अली खान असफजाह दुसरे आणि पेशवे सवाई माधवराव यांच्या फौजांमध्ये झाली होती. या लढाईत मराठ्यांनी निजामांच्या फौजांचा धुव्वा उडवला होता.

1761 ला मराठ्यांचा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पराभव झाला होता. या पराभवानंतर तत्कालीन पेशवे नानासाहेब खचले आणि त्यानंतर त्यांचे निधन झाले.

पानिपत युद्ध

फोटो स्रोत, BRITISH LIBRARY

फोटो कॅप्शन, सदाशिवराव भाऊ पेशवे आणि इब्राहिमखान गारदी

मराठा साम्राज्याची जबाबदारी थोरले माधवराव पेशवे यांच्यावर आली. मराठा साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा माधवराव पेशव्यांनी प्रयत्न सुरू केले.

मराठा साम्राज्याचा पुन्हा विस्तार करण्यासाठी मोहिमांचा धडाकाच त्यांच्या काळात सुरू झाला. माधवराव पेशवे यांचे सरदार महादजी शिंदे यांचा उत्तर भारतात दबदबा वाढला होता.

उत्तरेत महादजी शिंदे तर पुण्यात नाना फडणवीस मराठा साम्राज्याच्या वृद्धीसाठी कार्य करू लागले.

नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्या साहाय्याने थोरल्या माधवरावांनी मराठा साम्राज्याची घडी पुन्हा नीट बसवली होती.

पण माधवराव अल्पायुषी ठरले. 9 वर्षं पेशवेपद सांभाळल्यानंतर 1772 मध्ये त्यांचे निधन झाले.

अल्पकाळ नारायणराव पेशवे यांच्याकडे पेशवेपदाची सूत्रं आली. नारायणराव पेशवे आनंदीबाई आणि रघुनाथराव यांच्या कटकारस्थानांना बळी पडले आणि त्यानंतर सवाई माधवराव हे पेशवे बनले. 1774 ते 1795 या काळात ते पेशवेपदाच्या गादीवर होते.

महादजी शिंदेंचा उदय

सवाई माधवराव यांचा जन्म 1774 साली झाला होता आणि त्याच वर्षी ते पेशवे झाले होते. त्यामुळे त्यांच्या वतीने सर्व कारभार नाना फडणवीस आणि महादजी शिंदे हेच पाहात.

महादजी शिंदे
फोटो कॅप्शन, महादजी शिंदे

महादजी शिंदे आणि नाना फडणवीस हे दोघेही कर्तृत्ववान होते आणि त्यांच्या जीवावरच मराठा साम्राज्याचा डोलारा उभा राहिला होता पण या दोघांमध्ये अनेक कुरबुऱ्या सुरू झाल्या होत्या.

महादजी शिंदे पुण्यापासून कसे जास्तीत जास्त कसे दूर राहतील याचा प्रयत्न नाना फडणवीस करत.

महादजी शिंदेंनी या गोष्टीकडे संधी म्हणून पाहिलं. दरबारी राजकारण करण्यापेक्षा त्यांचा जोर युद्ध गाजवण्यावरच होता. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि आपले कर्तृत्व सिद्ध केले. पूर्ण उत्तर भारतच त्यांनी काबिज केला.

मुघल साम्राज्याचा अस्त आणि मराठ्यांचा उदय

1707 मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली होती. या काळात अनेक मुघल बादशाह झाले पण त्यांचा प्रभाव कमीकमी होत गेला. इतका कमी झाला की शाह आलम द्वितीय याला इंग्रजांनी अलाहाबादेत नजरकैदेत ठेवले.

सहा वर्षं इंग्रजांकडे राहिल्यावर 1772 मध्ये महादजींनी त्याला सोडवून आणले आणि पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले. त्यानंतर मुघल बादशाह हा केवळ नामधारी बादशाह राहिला. त्याच्या वतीने सर्व कारभार महादजी शिंदेच बघत होते.

औरंगजेब याचे चित्र

फोटो स्रोत, PENGUIN INDIA

फोटो कॅप्शन, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा दरारा पूर्वीसारखा राहिला नव्हता.

महादजी शिंदे सर्व कारभार ग्वाल्हेरमधून पाहत असत. शाह आलम द्वितीयला महादजी शिंदेंचा पाठिंबा असला तरी त्याच्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांची कमी नव्हती.

1788 मध्ये गुलाम कादिर या रोहिला सरदारासोबत मिळून महमूद शाह बहादूरने शाह आलमला हटवले आणि स्वतःलाच दिल्लीचा बादशाह घोषित केले.

महादजी शिंदेना कळताच त्यांनी दिल्ली गाठले. रोहिल्यांचे बंड मोडून काढले आणि पुन्हा शाह आलमला दिल्लीच्या तख्तावर बसवले. तेव्हापासून मराठा साम्राज्याला आव्हान देणारा भारतात कुणीच उरला नाही.

महादजी शिंदेंना 'वकील उल मुतलक' म्हणजेच बादशाहचे कारभारी ही पदवी देण्यात आली होती, त्यामुळे महादजी शिंदे हे त्यावेळचे भारतातील सर्वांत मोठ्या सरदारांपैकी एक म्हणून नावारूपाला आले.

चौथाई देण्यास टाळाटाळ

उत्तरेत महादजींचा दबदबा होता पण त्यांना थेट आव्हान न देता स्वतःचे हित साधणाऱ्यांची देखील काही कमी नव्हती. अशा संस्थानिकांपैकी एक होता हैदराबादचा निजाम अली खान असफ जाह द्वितीय.

दक्षिणेत मुघलांच्या वतीने निजाम कारभार पाहत असे. निजामाचा प्रदेश मराठ्यांच्या प्रदेशाला लागून होता.

राज्यावर आक्रमण करू नये म्हणून मांडलिकाने उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग देणे बंधनकारक होते. त्याला चौथाई म्हटले जात असे.

बाजीराव पेशव्यांच्या काळापासून ते माधवराव पेशव्यांच्या निधनापर्यंत निजामाने कुरबूर न करता मराठ्यांना चौथाई दिली.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या स्मृतिदिनी हरियाणामध्ये जत्रा

1772 मध्ये माधवरावांचे निधन झाले. त्यानंतर मराठा साम्राज्यात अनेक स्थित्यंतरं झाली. मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा आणि संघर्षाचा फायदा उचलण्याचा निजामाने प्रयत्न केला. त्यामुळेच 1774 ते 1782 या काळात निजामाने चौथाईच दिली नाही.

1782 मध्ये संधी झाली. तेव्हा काही वर्षं तणाव निवळलेला दिसला पण चौथाई देण्याचा विषय निजामाने पूर्णतः टाळला होता. मराठ्यांना दूर ठेवण्यासाठी निजाम इंग्रजांच्या जवळ जाऊ लागला होता.

महादजी शिंदे उत्तरेतून पुण्याला 1792 मध्ये आले. अनेक वर्षांनंतर ते पुण्यात आले होते. महादजी शिंदे आणि त्यांच्या फौजा पुण्यात दाखल झाल्यानंतर नाना फडणवीसांचा आत्मविश्वास वाढला.

निजामांकडून चौथाई वसूल करण्यासाठी पुन्हा जोर लावला.

महादजी शिंदेंची ताकद निजाम ओळखून होता. त्याने एक दोन वर्षं टाळाटाळ केली. तोपर्यंत ही रक्कम तीन कोटी रुपयांच्या वर गेली.

याच बरोबर बीड जिल्ह्याचा भागसुद्धा निजामाने मराठ्यांच्या हवाली करावा अशी मागणी नाना फडणवीसांनी केली. या भागाचं उत्पन्न 33 लाख रुपये इतकं होतं.

एक शेवटचा प्रयत्न म्हणून निजामाने इंग्रजांची मदत मागितली. हा तंटा इंग्रजांनी सोडवावा असं त्याला वाटत होतं. पण इंग्रजांना मराठ्यांची नाराजी परवडणारी नव्हती.

गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर यांनी निजामाची मागणी अमान्य केली आणि तटस्थ राहण्याची भूमिका निवडली.

महादजी शिंदेंचा मृत्यू

जर महादजी शिंदेंचा फेब्रुवारी 1794 मध्ये मृत्यू झाला नसता तर कदाचित खर्ड्याची लढाई झाली नसती. कारण ती होण्याचं काही कारण देखील नव्हतं.

ते असते तर निजामाला मराठ्यांची चौथाई द्यावीच लागली असती पण महादजींच्या मृत्यूनंतर निजामाने वाटाघाटीच बंद केल्या आणि चौथाई देणारच नाही असं ठणकावलं.

नाना फडणवीस यांना हा अपमान जिव्हारी लागला. त्यांनी निजामाकडून थकबाकी वसूल केली जाईल असं सांगितलं.

निजामाचा दिवाण (पंतप्रधान) अझीम उल उमरा (मुशीर-उल-मुल्क) याने निजामाला म्हटले की इतकी खंडणी देण्यापेक्षा हा पैसा आपण आपल्या फौजांवर खर्च करू. जिंकलो तर आपल्याला पैसाही द्यावा लागणार नाही आणि वर जी लूट होईल ती देखील आपली राहील.'

लढाईची तयारी

डिसेंबर 1794 पासून या लढाईची तयारी सुरू झाली. निजामाचं सैन्य कोणत्या वाटेनी येणार याची माहिती मराठ्यांनी गुप्तहेरांच्या मदतीने काढली.

या लढाईत मराठ्यांकडे घोडेस्वार- 73,600, पायदळ- 38,000 पायदळ आणि तोफा - 192 होत्या. या तोफांपैकी 98 तोफा एकट्या दौलतराव शिंदेंच्या (महादजींचे पुतणे आणि शिंदे घराण्याचे वंशज) होत्या.

त्यांचे गोलंदाज जीवाबादादा बक्षी हे होते. तर निजामाच्या सैन्यात मन्सोर रेमंड हा युरोपियन सैनिक तोफखान्याचा प्रमुख होता. निजामाकडे घोडेस्वार- 45,000, पायदळ- 44,000 आणि तोफा - 108 होत्या.

निजामाचं सैन्य उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा किल्ल्यात आश्रय घेणार आणि तेथेच तळ ठोकून बसणार आणि संधी मिळताच निजाम पुण्यावर चाल करून येणार अशी माहिती गुप्तहेरांकडून मराठ्यांच्या हाती लागली.

निजामाला रस्त्यात अडवण्यासाठी मराठ्यांनी घोडेगाव येथे आपला तळ ठोकला. निजामाचं सैन्य बिदरहून कूच करत होतं. त्यांची आणि मराठ्यांची गाठ खर्डा येथे पडली.

11 मार्चला काय घडलं?

खर्ड्याजवळच्या रणटेकडीवर दोन्ही सैन्य आपसांत भिडले. परांडा किल्ल्याचा आश्रय घेण्याचा डाव यामुळे हाणून पाडला गेला. आता काही झालं तरी निजामाच्या सैन्याला याच ठिकाणी मराठ्यांशी लढा द्यायचा होता.

इतिहासकार व्ही. जी. दिघे यांनी संपादित केलेला 'मराठा अँड निजाम्स रिलेशन' या पुस्तकात तत्कालीन पत्रांच्या द्वारे युद्धात काय घडलं याचा तपशील देण्यात आला आहे.

निजामांच्या फौजांसोबत असलेल्या इंग्रजी अधिकाऱ्यांना मॅलेट यांना रिपोर्ट पाठवले आहे. त्या पत्रांमध्ये 11 मार्चचा वृत्तांत देण्यात आला आहे.

दिघे यांच्यापुस्तकानुसार, 'असद अली खान, रोशन खान आणि वझीर खान यांच्या तुकड्यांनी मराठ्यांवर हल्ला चढवला. रेमंड एका दिशेला तोफगोळ्यांचा भडिमार करतच होता. हे सर्व सुरू असताना शत्रूंचा ( मराठ्यांचा) एक अग्निबाण ( रॉकेट असा उल्लेख पुस्तकात आहे) आला आणि त्याने वझीर खानला टिपले. त्यात वझीर खानचा मृत्यू झाला.'

वझीर खान पडल्यानंतर इतर सरदारांचा सामना रघुजी भोसले यांच्या तुकडीशी झाला. या तुकडीसमोर असद अली खानचा निभाव लागला नाही आणि त्यांना माघार घ्यावी लागली.

मराठ्यांच्या फौजेकडून सातत्याने तोफांचा मारा सुरू होता. त्यामुळे रेमंडची (निजामाच्या तोफखान्याचा प्रमुख) दुरवस्था झाली. त्यांच्यासमोर टिकून राहणे हेच आव्हान बनले होते.

या दरम्यान जीवाजी बक्षीने हळुहळू आपली आगेकूच सुरूच ठेवली आणि ते रेमंडच्या तळाजवळ आले.

जीवाजी बक्षींने पुन्हा मारा सुरू केला पण यावेळी रेमंडने जशास तसे प्रत्युत्तर दिले आणि मराठ्यांना माघार घेऊन रेमंडच्या तुकडीशी अंतर राखावे लागले.

परशुराम भाऊ पटवर्धन, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर, रघुजी भोसले या मराठा योद्धांनी अर्धवर्तुळाकार रचना करून निजामाच्या सैन्यास जेरीस आणले.

निजामाची खेळी

निजाम अली खान याला आपला पराभव डोळ्यांनी दिसू लागला.

निजामाचा सरदार नूर मोहम्मद खानाने पेशव्यांचे निजामाच्या दरबारातील वकील गोविंद किशन यांच्याशी आपण बोलणी करायची का? असं विचारलं. त्यावर निजाम अली खानचे काहीच उत्तर आले नाही. त्याने पुन्हा निजामाला विचारले की काय करू?

"तू तुझं ठरव आणि तुझं काम काय आहे त्याचा विचार कर. मी काय तुला उत्तर देऊ?" असं निजामाने म्हटलं.

निजामाचा पंतप्रधान अझीम उल उमराने ( मुशीर उल मुल्क) मोहम्मद खानला सांगितले की तू जाऊन गोविंद किशन यांच्याशी बोलणी सुरू कर आणि त्याने निजामाला सल्ला दिला की आपण खर्ड्याच्या किल्ल्यात आश्रय घेऊ.

खर्ड्याच्या किल्ल्यात आश्रय

खर्ड्याचा किल्ला निजामाच्याच मुलुखात होता. 1745 मध्ये राजे निंबाळकरांनी बांधला होता. हा भुईकोट किल्ला आहे.

परांड्याच्या किल्ल्यात जी सुरक्षितता मिळाली असती ती या ठिकाणी मिळण्याची शक्यता नव्हती पण काही तास या ठिकाणी थांबून पुन्हा परांड्याच्या दिशेने कूच करायची हा विचार निजामाने केला.

इंग्रज अधिकारी कॅप्टन पॅट्रिक यांनी मॅलेट यांना जो रिपोर्ट पाठवला आहे त्यामध्ये तो म्हणतो की रेमंडचा अपवाद वगळता इतर कोणत्या सरदाराने आपली कामगिरी चोख बजावली नाही.

निजामाने त्याच्या कुटुंबकबिल्यासह किल्ल्यात आश्रय घेतला. चहूबाजूंनी मारा करत शेवटी मराठ्यांच्या फौजांना किल्ल्याला वेढा घातला. निजामासमोर तह करण्यावाचून उपायच शिल्लक राहिला नाही.

तहामध्ये बोलणी झाली त्यानुसार तीन कोटी थकबाकी, 33 लाखांचा मुलूख आणि दोन कोटी नुकसानभरपाई निजामाने मराठ्यांना द्यावी असं ठरलं. नंतरच्या काळात निजामाने दोन कोटी रुपयांतून सूट मिळवली होती.

भविष्यात इंग्रजांविरोधात निजामाचा वापर करता आला तर ती संधी कायम राहावी म्हणून नाना फडणवीसांनी तसा निर्णय घेतला होता. निजामाचा पंतप्रधान अटकेत ठेवण्यात आला पण नंतर त्यालाही सोडून द्यावे लागले.

महाराष्ट्र स्टेट गॅझेटरमध्ये या लढाईला 'डेड सी फ्रुट' असं म्हटल्याचा उल्लेख आहे. कारण निजामाने तहाच्या अटी कधीच पूर्ण केल्या नाहीत.

खर्ड्यात विजय पण मराठा साम्राज्याचे नशीब पालटले

खर्ड्यात मोठा विजय मिळवल्यानंतर मराठा साम्राज्याचे जुने दिवस पुन्हा येतील अशा आशा पल्लवित झाल्या होत्या पण विजयाचं सुख अल्पकाळच टिकलं. कारण काही महिन्यातच सवाई माधवरावांचा अपघाती मृत्यू झाला.

सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजीरावकडे पेशवेपद आले. मराठ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष झाला.

शनिवार वाडा

फोटो स्रोत, Getty Images

खर्ड्याचं युद्ध हे अनेक विरोधाभासांनी नटलेलं आहे असं निरीक्षण 'बॅटल ऑफ खर्डा - चॅलेंजेस अँड रिस्पॉन्स'चे लेखक जी. टी. कुलकर्णी यांनी मांडलं आहे. ते म्हणतात 'या लढाईत ज्याचा पराभव झाला त्या निजामाचे साम्राज्य विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले पण विजेते मराठे या लढाईचे 20 वर्षानंतरच संपले.'

'या लढाईत ज्यांनी बघ्याची भूमिका बजावली ते इंग्रजच सर्वांत जास्त फायदेशीर ठरले. जशी प्लासीची लढाई देशाच्या भवितव्यामध्ये निर्णायक ठरली तेच स्थान खर्ड्याच्या लढाईचं आहे. खर्ड्याची लढाई एक असं संकट होतं ज्यामुळे भारतातली जुन्या राजकीय व्यवस्थेनी (मराठ्यांच्या नेतृत्वातील भारत) नव्या व्यवस्थेला जागा निर्माण करू दिली,' असं कुलकर्णी पुढे म्हणतात.

रोहित पवार यांच्या स्वराज्य ध्वजाच्या निमित्ताने खर्ड्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दलची चर्चा पुन्हा एकदा झाली. पण त्यामुळे खर्ड्याचा शौर्याचा इतिहास घराघरात पोहोचेल का? या लढ्यापासून मराठी माणूस प्रेरणा घेईल का? किल्ल्यांचे संवर्धन होण्यास मदत होईल का या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल.

(संदर्भ - महाराष्ट्र गॅझेटर, बॅटल ऑफ खर्डा - चॅलेंजेस अँड रिस्पॉन्स- लेखक जी. टी. कुलकर्णी, महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड - महाराष्ट्र शासन, मराठा अॅंड निजाम्स रिलेशन - संपादक व्ही. जी. दिघे)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)