शिवाजी महाराजांचा विषय हा महाराष्ट्रासाठी इतका संवेदनशील का आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राज्यसभेत नुकत्याच निवडून आलेल्या सदस्यांनी २२ जुलैला सकाळी शपथ घेतली. भाजपतर्फे उदयनराजे भोसले यांनीही यावेळी शपथ घेतली. पण, या शपथविधीनंतर नव्या चर्चेला आणि वादाला सुरुवात झाली आहे.
उदयनराजे यांनी इंग्रजीत शपथ घेतल्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. परंतु उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी जय भवानी अशी घोषणाही दिल्याचे कालच्या कामकाजाच्या व्हीडिओत दिसते.
मात्र यावर विरोधी पक्षांच्या बाकांवरुन आक्षेपवजा काही टिप्पणी झाल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हे सभागृह नसून हे माझे चेंबर आहे. शपथ वगळता इतर सर्व कामकाजातून वगळले जाईल असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे नव्या सदस्यांनी यापुढे हे लक्षात ठेवावे असेही सांगितले.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग

हा सर्व कामकाजाचा भाग व्हीडिओतून समोर आल्यावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. ही घोषणा कामकाजातून काढून टाकणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे तो उदयनराजे यांनी कसा सहन केला असे प्रश्न विचारले जात आहेत.
यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवसेना, काँग्रेसचे नेते यावरून भाजपवर उघडपणे टीकाही करत आहेत.
यावरून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हा सर्वाधिक अभिमानाचा विषय तर आहेच, पण सोबतच तो भावनिकदृष्ट्या किती संवेदनशील विषयही आहे हे पुन्हा एकदा दिसते आहे. शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून घडलेले वाद महाराष्ट्राला नवे नव्हेत.

फोटो स्रोत, Getty Images
जेम्स लेन प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम झाला हे सर्वांनी पाहिलं. पण विद्यापीठाच्या नामविस्तारापासून ते नाटकाच्या नावापर्यंत ते राजकीय पक्षांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा वा नाव वापरण्यापर्यंत अनेक गोष्टींवरून भूतकाळात वाद झाले आहेत.
पण असे होण्यामागची कारणं काय? महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वांत महत्त्वाची व्यक्तिरेखा असणा-या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्र संवेदनशील का आहे? जेव्हाही शिवाजी महाराजांबद्दल आक्षेप वाटतील असे उल्लेख येतात तेव्हा महाराष्ट्रात आक्रमक प्रतिक्रिया का येते?
'ऐतिहासिक वारशाचं सर्वोच्च प्रतीक'
"शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचं सर्वोच्च प्रतीक आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल वा त्यांच्याशी संबंधित प्रतिकांचा अन्वयार्थ चुकीचा लावला गेला की त्याची प्रतिक्रिया येते. वाद निर्माण होतात. त्यामुळेच मोदी यांच्यासारख्या सध्याच्या सर्वांत वादग्रस्त राजकीय व्यक्तीशी शिवाजी महाराजांची तुलना केली गेली तेव्हा त्याची प्रतिक्रिया आली. ही तुलना अनुचित आणि अतिशयोक्त होती," ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचं आणि मराठी भाषिकांच्या अस्मितेचं प्रतिक म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. स्वराज्याचे संस्थापक म्हणून तर आहेच पण आजही अनेक राजकीय, सामरिक, प्रशासकीय, व्यवस्थापन, सामाजिक धोरणांचे उद्गाते म्हणून वर्तमानात शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं.
त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळासोबतच आणि स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक चळवळींचं प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना समोर पाहून घेतली गेली.
परिणामी अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वं वेगवेगळ्या विचारधारांशी जोडले गेलेली असतांना, शिवाजी महाराज मात्र महाराष्ट्रात प्रत्येक विचारधारेसाठी जवळचे राहिले आहेत. त्यामुळे आजच्या महाराष्ट्राच्या समाजकारणावर, निवडणुकींच्या राजकारणावर शिवाजी महाराजांच्या प्रभाव सर्वाधिक आहे. परिणामी त्यांच्याशी संबंधित न पटलेल्या उल्लेखांमुळे महाराष्ट्रात भावनिक आंदोलनं सुरू झाल्याचा इतिहास आहे.

फोटो स्रोत, @ncpspeaks
"महाराष्ट्रात मुलांना जन्मापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या जातात. दिवाळीत ते किल्ले बांधतात. शालेय अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास असतो. त्यामुळे लहापणापासूनच जे संस्कार होतात त्यामुळे महाराजांशी संबंधित कोणताही विषय हा मोठं झाल्यावरही संवेदनशील किंवा भावनेचा बनतोच," 'संभाजी ब्रिगेड'चे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड म्हणतात.
'नैतिकता, मूल्य आणि न्यायाचं प्रतीक'
पुढे गायकवाड सांगतात, "शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात नैतिकता, मूल्यं आणि न्यायाचं प्रमाण मानलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही न पटणारं लिहिलं वा बोललं की लोकांना ते सहन होत नाही. त्यांचा अवमान झालेला सहन होत नाही. शिवाजी महाराजांच्या वर कोणीही नाही अशी ती भावना आहे. त्याचवेळेस स्त्रियांचा सन्मान, शेतक-यांना मदत अशा विषयांमध्येही महाराजांनी मापदंड घालून दिलेले असल्याने त्यांच्याविषयी भावना तीव्र आहे.

फोटो स्रोत, BBC hindi
"यामुळे कोणालाही महाराजांविषयी लिखाण करतांना, चित्रपट करतांना वा नाटक करतांना विचार करावा लागतो. त्याचवेळेस शिवाजी महाराजांचं चरित्र महाराष्ट्रात अनेक विचारधारांच्या अंगांनी लिहिलं गेलं आहे. कोणी समतावादी शिवाजी महाराज लिहिले आहेत, तर कोणी हिंदुत्ववादी. एक असं सर्वमान्य चरित्र नाही. त्यामुळे सगळ्यांच्याच भावना तीव्र आहेत. या भावनांमुळेच कोणत्याही वादावेळेस अशा प्रतिक्रिया पहायला मिळतात," प्रविण गायकवाड म्हणतात.
'शिवाजी महाराज हे रयतेचे राजे'
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हिंदुत्ववादी नेते हे वारंवार करत असतात. पण त्यांच्या प्रखर हिंदुत्वाचा विरोध करणारे गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराज यांच्यावर 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिलं होतं.

फोटो स्रोत, Facebook
डाव्या चळवळीशी निगडित असलेल्या या पुस्तकाची राज्यात तर चर्चाच झाली पण या पुस्तकाची दखल भारतातील इंग्रजी माध्यमांनी घेतली आणि हे पुस्तक इंग्रजीतही आलं आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे म्हणजेच कष्टकरी वर्गाचं प्रेम मिळालेले राजे होते अशी मांडणी गोविंद पानसरे यांनी केली आहे.
महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना कुलवाडी भूषण असंही म्हटलं होतं.
'महाराष्ट्राचा डीएनए'
"शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा डीएनए आहे. या राज्याची जी काही अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्व जे काही आहे ते शिवाजी महाराजांपासून सुरू होतं आणि त्यांच्यामुळेच टिकतं. त्यामुळं त्यांची तुलना कोणाशीही केलं गेली की तो इथे अपमान समजला जातो आणि प्रतिक्रिया येते," ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात. "जरी या प्रतिक्रिया बघता ते राजकारण असलं तरीही ते केवळ राजकीय नसतं. शिवाजी महाराजांच्या बद्दल जी भावना आहे त्यामुळे प्रतिसाद सतत मिळत राहतो हेही इथल्या राजकीय पक्षांनी पाहिलं आहे.
शिवसेनेनं कायम शिवाजी महाराजांचं नाव पुढे केलं आहे. 2004 मध्ये जेव्हा भांडारकर संस्थेचं प्रकरण झालं तेव्हा घेतलेल्या भूमिकेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा झाला होता. अशा प्रकारेही महाराजांच्या बद्दल असलेल्या भावनेचे राजकीय परिणाम दिसतात. परंतु गेल्या काही काळात बहुजन समाजातील तरुणांनी अनेक प्रकारे शिवाजी महाराज समजून घेतले आहेत," चोरमारे म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








