उद्धव ठाकरे यांना 'नंबर-1' ठरवणारी प्रश्नम संस्था कोणाची आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात 'नंबर-1' चे मुख्यमंत्री आहेत, अशा आशयाच्या बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत.
व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि सोशल मीडियावर, उद्धव ठाकरे 'नंबर-1' मुख्यमंत्री, अशा बातम्या आणि पोस्ट शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर व्हायरल केल्या जात आहेत.
यात 'प्रश्नम' नावाच्या, एका सर्व्हे करणाऱ्या संस्थेच्या रिपोर्टचा हवाला दिला जातोय. 'प्रश्नम'ने देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल लोकांमध्ये एक सर्व्हे केला होता.
पण, देशातील मुख्यमंत्र्यांबद्दल सर्वेक्षण करणारी ही संस्था काय आहे? ही संस्था कोणाची आहे? याबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
काय आहे 'प्रश्नम'?
'प्रश्नम' काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही या संस्थेच्या वेबसाईटला भेट दिली. देशातील विविध राज्यांच्या मुंख्यमत्र्यांबद्दल सर्वेक्षण करणारी ही संस्था फार जुनी किंवा प्रसिद्ध नाही, असं दिसून आलं.
'प्रश्नम'च्या वेबसाईटवर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने, लोकांकडून त्यांचं, खरं मत जाणून घेणारी ही पहिलीच संस्था असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
लोक काय विचार करतात? ग्राहकांचे विचार काय? महिला, युवा काय विचार करतात? यांची मतं ही संस्था जाणून घेणारी ही संस्था असल्याचं दिसून आलं.
ही संस्था काय करते?
'प्रश्नम'च्या वेबसाईटवर यूज केसेस नावाचा एक कॉलम देण्यात आला आहे.
ज्यात कॉरपोरेट कंपन्यांना ब्रॅंडबद्दल माहिती, मीडियाला प्रेक्षकांची मतं जाणून घ्यायची असली, राजकारण्यांना मतदार काय म्हणतात? निवडणूक कोण जिंकेल? अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्याचं काम ही संस्था करते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
याचा अर्थ, कॉर्पोरेट कंपन्या, राजकारणी आणि इतरांसाठी लोकांकडून घेण्यात आलेल्या माहितीच्या आधारे सर्व्हे करून त्याचा अभ्यास करण्याचे काम ही संस्था करते.
ही संस्था कशी काम करते?
प्रश्नम संस्थेच्या वेबसाईटनुसार, सर्व्हेक्षणासाठी सॅम्पल (नमुने) रॅंडम पद्धतीने (यादृश्चिक) घेतले जातात.
फोन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने हजारो लोकांची मतं काही तासांमध्ये नोंदवण्यात येतात. जे काम करण्यासाठी इतरांना काही आठवडे लागतात ते काम काही तासांतच होतं असा या संस्थेचा दावा आहे.
ही संस्था कोणाची आहे?
'प्रश्नम'च्या वेबसाईटवर राजेश जैन या संस्थेचे संस्थापक, तर, चिराग पटनायक 'प्रॉडक्ट आणि टेक्निकल टीमचे प्रमुख असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रश्नमच्या टेक्निकल मार्गदर्शक समुहात नामांकित शास्त्रज्ञ आणि सांख्यकीतज्ज्ञ असल्याचं सांगण्यात आलंय.
देशातील मुख्यमंत्र्याबद्दलचं सर्व्हेक्षण
प्रश्नमने, वेबसाईटवर देशातील मुख्यमंत्र्यांबद्दलच्या सर्व्हेक्षणाचे निष्कर्ष अपलोड केलेत.
- मुख्यमंत्र्यांबाबतच्या सर्व्हेसाठी देशभरातून 17,576 लोकांची मतं नोंदवण्यात आली.
- तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल काय वाटतं? त्यांच्या कामाबद्दल मत काय? काम चांगलं असेल तर पुन्हा व्होट करणार का? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
- बिहार, गोवा, गुजरात, हरिणाया, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगाणा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या 13 राज्यात सर्व्हे करण्यात आला.
- महाराष्ट्रात 1108, पंजाबमध्ये 2405, उत्तरप्रदेशात 1140, मध्यप्रदेशमध्ये 1511, गुजरात 1390 आणि राजस्थानमध्ये 1561 लोकांना त्यांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल मतं विचारण्यात आली.
यात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम चांगलं असल्याचं 49 टक्के लोकांनी, तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं काम चांगलं असल्याची पोचपावती 44 टक्के लोकांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह, यांचं काम सर्वांत खराब असल्याचं 60 टक्के लोकांचं मत आहे. असंच काहीसं मत, उत्तराखंडच्या भाजप मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्त करण्यात आलंय.
या सर्व्हेबद्दल संस्थापक काय म्हणतात?
देशातील मुख्यमंत्र्यांच्या या सर्व्हेबद्दल 'द प्रिंट'मध्ये प्रश्नमचे संस्थापक, राजेश जैन यांनी इतर राज्यांमध्ये सर्व्हेक्षण का करण्यात आलं नाही, याची माहिती दिलीये.
द प्रिंटमध्ये लिहिलेल्या आर्टिकलमध्ये ते सांगतात, "पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये सरकार स्थापन होऊन काहीच दिवस झालेत. त्यामुळे या राज्यांचा समावेश करण्यात आला नाही."
तर, आंध्रप्रेदश, छत्तीसगड, दिल्ली आणि हिमाचलप्रदेशमध्ये सर्व्हेक्षणासाठी पॅनल नसल्याने, या राज्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं नाही. पण, येत्या काळात या राज्यांनाही सर्वेक्षणात घेतलं जाईल अशी माहिती त्यांनी दिलीये.
असे सर्व्हे कशासाठी केले जातात?
सीएसडीएस (CDS) ही देशात राजकीय सर्व्हे करणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेशी संबंधित प्रा. संजय कुमार यांना आम्ही, प्रश्नम आणि त्यांनी केलेल्या सर्व्हेबाबत विचारलं.

फोटो स्रोत, Getty Images
तेव्हा ते म्हणाले, "मी अशा कुठल्याही सर्व्हे करणाऱ्या संस्थेचं नाव कधी ऐकलेलं नाही. प्रश्नमच्या सर्व्हेत फक्त 2 प्रश्न विचारण्यात आले होते असं मी वाचलंय. आजकाल, होणाऱ्या सर्व्हेमध्ये खूप त्रूटी असतात."
"2 किंवा 3 प्रश्नांच्या आधारे निष्कर्ष काढणं योग्य नाही. सर्व्हेची क्वालिटी फारच निराशजनक असते. सर्व्हे कोणत्या पद्धतीने केला, याची पुरेशी माहिती सार्वजनिक करत नाहीत. सँपल साईज सांगत नाहीत. खूप फास्ट सर्व्हे केले जातात," असं प्रा. कुमार पुढे सांगतात.
सर्व्हेमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व योग्य प्रमाणात असलं पाहिजे. देशाच्या सर्व्हेच्या नावाखाली खूप छोट्या भागातल्या लोकांचं मत घेऊन ते देशांच्या लोकांचं मत आहे हे सांगितलं जातं. हे फार चुकीचं आहे, असंही संजय कुमार सांगतात.
मग हे असे सर्व्हे तयार का केले जातात? प्रा. संजय कुमार सांगतात, "सर्व्हेच्या माध्यमातून आकडे मिळतात. याचा वापर पुरावा म्हणून केला जातो. सरकारला त्यांनी केलेल्या कामाचा पुरावा विश्वसनीयरित्या द्यायचा असतो. त्यासाठी सर्व्हेच्या आकड्यांचा उपयोग होतो."
प्रा. कुमार यासाठी एक उदाहरण देतात. "महागाईचे आकडे किंवा बेरोजगारी दराचे आकडे लोकांमध्ये विश्वसनीयता आणि ओपिनिअन तयार करतात. मग आपली घटत असलेली लोकप्रियता सुधारण्यासाठी कधीकधी वेगवेगळ्या सर्व्हेंचा आधार घेतला जातो."
सर्व्हेबाबत प्रश्नमने काय म्हटलं आहे?
हा सर्व्हे कसा करण्यात आला याबद्दल बीबीसी मराठीने प्रश्नमचे संस्थापक राजेश जैन यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी माहिती दिली.
"सर्व्हेतील सर्व माहिती रॉ-डेटामध्ये देण्यात आली आहे. प्रश्नमकडून सर्व्हेतील संपूर्ण माहिती सार्वजनिक केली जाते."
"हा सर्व्हे इंटरॅक्टिव्ह व्हॅाइस रिस्पॅान्सने करण्यात आला होता. लोकांना ऑटोमॅटिक फोन कॅाल करण्यात आले होते."
प्रश्नम 2020 मध्ये सुरू करण्यात आलंय.
प्रश्मनने त्यांनी केलेल्या सर्व्हेच्या रॉ-डेटामध्ये किती महिला आणि पुरुषांनी या सर्व्हेमध्ये भाग घेतला याची माहिती दिली आहे. त्याचसोबत, त्यांच्या वयाची माहिती देण्यात आली आहे.
युवा, मध्यमवयीन वर्ग आणि कोणत्या शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला याची माहितीदेखील सार्वजनिक केली आहे, अशी माहिती राजेश जैन यांनी म्हटलं आहे.
संजय कुमार यांच्या आरोपांना राजेश जैन यांचे उत्तर
सर्वेक्षणावर उपस्थित संजय कुमार यांनी जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं राजेश जैन यांनी बीबीसी मराठीला ईमेलद्वारे पाठवली.
राजेश जैन यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून हे सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीनेच केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आपल्या इमेलमध्ये ते म्हणतात, "जागतिक पारदर्शकतेची मानकांचे पालन करून आम्ही हे सर्वेक्षण केलं आहे. त्यानुसार आम्ही नमुने आणि त्यातून मिळालेली माहिती जाहीर केली आहे. अशा प्रकारची सर्व्हे पद्धत कोणत्याच भारतीय राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून वापरली जात नाही.
संजय कुमार यांनी केलेल्या आरोपांबद्दल राजेश जैन म्हणतात,
संजय कुमार यांनी दोन प्रमुख आरोप केले आहेत.
1. प्रश्नमने केलेल्या सर्व्हेतील माहितीबाबत छेडछाड केली जाऊ शकते, तसंच यातून आलेला निकाल विश्वासार्ह नाही.
2. प्रश्नमने वापरलेली पद्धत संशयास्पद आहे.
संजय कुमार यांना आमचं आव्हान आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेबाबत तुमची स्वतःची 'विश्वासार्ह' पद्धतीने एखादा सर्व्हे करून त्याचे निकाल प्रकाशित करा. प्रश्नमने केलेल्या सर्वेक्षणातील माहितीशी छेडछाड करण्यात आली, आणि लोकांच्या मताशी विसंगत असा निकाल यातून मांडला गेला हे तुम्ही सिद्ध करा.
अथवा
प्रश्नमचा वापर करून हेच सर्वेक्षण तुम्ही स्वतः करा. त्यातून काय निष्कर्ष समोर येतात, हे तुम्ही पाहा. त्यासाठी तुम्ही वेगळ्या जिल्ह्यांतील वेगळे नमुनेही वापरू शकतात.
असं राजेश जैन यांनी म्हटलं आहे.
प्रश्नमने याआधी केलेले सर्व्हे
प्रश्नमने याआधी, कोरोना काळात उत्तराखंडमध्ये आयोजित कुंभमेळाबद्दल लोकांमध्ये सर्व्हे केला होता.
कोरोनाविरोधी लशीबाबत लोकांमध्ये भीती होती. त्यामुळे लस न घेतलेल्या लोकांची मतं जाणून घेतली होती.
एकेकाळी कॉंग्रेसमध्ये असलेले नेते जतीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी, ज्या लोकसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं. त्याठिकाणचे मतदार काय म्हणतात याबाबत सर्व्हे केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








