कोरोना लस: दारू, मृत्यू आणि आजारपणाशी संबंधित 5 गैरसमज, तथ्य काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
दारू पिता येणार नाही म्हणून आजही बरेच जण कोरोनाची लस टोचून घेण्यास टाळाटाळ करताना दिसतायेत. शिवाय, कुणाला हात निकामी होण्याची भीती, तर कुणाला आधीचे आजारपण वाढण्याची भीती आहे. या समज-गैरसमजांमागचं तथ्य नेमकं काय आहे, हे जाणून घेऊया.
"आजही कोरोनाविरोधी लस टोचून घेण्यासंदर्भात ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर जीव जाईल, कोव्हिडची लागण होईल अशी भीती लोकांमध्ये आहे. तसंच काही दिवस दारू पिता येणार नाही म्हणूनही अनेकजण लस घेत नाहीत," असं लातूर जिल्हा रुग्णालयातील डॉ. गजानन हळखंचे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
ते पुढे सांगतात, "लसीकरण केंद्रात आलेल्या लोकांना लस टोचण्यापूर्वी आम्ही पुढचे काही दिवस दारू प्यायची नाही अशी सूचना करतो. पण असं सांगितल्यावर काही जण लस न घेताच परत जातात."
महाराष्ट्रात ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे. मोठ्या संख्येने लोकांनी कोरोनाविरोधी लस टोचून घेतली आहे. पण लस घेतल्याने डोकं, हात, पाय दुखण्याच्या तक्रारी समोर आल्याने लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत.
16 जानेवारी 2021 पासून भारतामध्ये कोव्हिड -19 साठीच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. 'कोव्हिशील्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' लस वापरून भारतात लसीकरण सुरू आहे. अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केलं आहे.
गैरसमज काय आहेत आणि भीती का आहे?
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लसीकरणासाठी एक सुकाणू समिती नेमण्यात आलेली आहे. तसंच, राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे. यानुसार लसीकरण सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण आजही लोकांमध्ये कोरोनाची लस टोचून घेण्यासंदर्भात अनेक गैरसमज असल्याचं गावकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टर्स सांगतात.
लातूर येथील जिल्हा रुग्णालयाचे डॉ. गजानन हळखंचे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आमच्या रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे पण तरीही मोठ्या संख्येने लोकांमध्ये आजही गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर जीव जाईल अशी भीती आहे. तसंच लस घेतल्याने कोव्हिड होईल असंही काहीजणांना वाटतं."
ते पुढे सांगतात, "लस घेतल्यानंतर एक महिना दारू पिऊ नका असं आम्ही सांगतो. कारण लस टोचल्यानंतर दारू प्यायल्याने अॅलर्जी रिअक्शन किंवा लिव्हरवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच दारूमुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते."
"पण असं सांगितल्यावर ज्यांना दारू प्यायची सवय आहे असे काहीजण लस न घेताच परत जातात," असाही अनुभव आल्याचं त्यांनी सांगितलं.
तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देसले सांगतात, "आमच्या भागातही लोकांमध्ये असे गैरसमज आहेत. हात, पाय दुखतील म्हणून लोक लस घेण्यासाठी जात नाहीत. एकजण कुणीतरी सागतं की लस घेतल्यानंतर पाय दुखायला लागला, मग इतरांमध्येही भीती निर्माण होते. तसंच दारू पिण्यावर काही दिवस बंधन येईल म्हणून टाळाटाळ करतात."

फोटो स्रोत, Getty Images
अनेक गावांमध्ये लस टोचण्यापूर्वी आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोनाची लक्षणं असताना लस घेऊ नये, अशा आरोग्य विभागाच्या सूचना आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी लोकांची अँटिजन चाचणीही करून घेतली जात आहे.
कोव्हिडची लागण झाली असल्यास चार ते आठ आठवड्यांनी लस घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांझणी गावाचे ग्रामसेवक लियाकत शेख सांगतात, "लस देण्यापूर्वी गावातील आरोग्य केंद्रात कोरोनाची चाचणी करून घेतली जाते. कारण कोव्हिडची लागण झालेल्या व्यक्तीला लस देता येत नाही. त्यामुळे अशी चाचणी केल्यानंतर काही लोक पॉझिटिव्ह येतात आणि मग लोकांमध्ये भीती पसरते. आपणही लस घेण्यासाठी गेलो आणि कोरोना चाचणीमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल या भीतीने लोक लसीकरणासाठी येत नाहीत."
ते पुढे सांगतात, "पण ही परिस्थिती हळूहळू सुधारत आहे असंही ते म्हणाले. कोव्हिडची लागण झाल्यास आम्ही गावकऱ्यांना समजावतो की हा बरा होणारा आजार आहे. लसीकरणाबाबतही जनजागृती सुरू केली आहे."
आदिवासी पाड्यांमध्येही कोरोना आजार आणि लस दोन्हीबाबत नागरिकांमध्ये भीती आहे. याठिकाणी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे असंही वैद्यकीय अधिकारी सांगतात.

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कवळे सांगतात, "आदिवासी गाव आणि पाड्यांमध्ये जोपर्यंत त्यांचे स्थानिक नेते किंवा विश्वासू गावकरी सांगत नाही तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाहीत."
"लस घेतल्यानंतर हात लुळा पडतो, ताप येतो, लस टोचल्याने कोरोना होण्याची लक्षणं दिसतात यामुळेही लोक घाबरतात. पण आम्ही लोकांशी बोलून त्यांच्या शंकांचं निरसन करत आहोत." असंही ते म्हणाले.
'शंका दूर करण्यासाठी 15 दिवस लागले आणि 100% लसीकरण पूर्ण झाले'
औरंगाबाद जिल्ह्यातील जानेफळ गावातही लसीकरण केंद्र असून 45 वयोगटावरील गावकरी लस टोचून घेण्यासाठी येत नाहीत, हे सरपंच कृष्णा गावंडे यांच्या लक्षात आले.
गावतल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांना कळाले की लोकांमध्ये लसीकरणाविषयी भीती आहे.
"लस टोचून घेतल्यानंतर ताप येतो, अंग दुखतं, जीव जातो, हात निकामी होतो अशा अनेक गोष्टी लोकांनी इकडून-तिकडून ऐकल्या आहेत," हे सुद्धा कृष्णा गावंडे यांना समजले.

मग त्यांनी गावात एक मोहीम सुरू केली. घरोघरी जाऊन लोकांच्या शंका ते दूर करू लागले.
कृष्णा गावंडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "लस घेतल्यावर हात निकामी होतो किंवा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती सुरुवातीला लोकांमध्ये होती. आम्हाला काही झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार का? असं लोक मला विचारायचे."
"पण लस घेण्यासाठी लोकांना 15 दिवस घरोघरी जाऊन त्यांच्या शंका दूर कराव्या लागल्या. लोकांच्या मनातली भीती आणि गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली,"
गावाची लोकसंख्या 525 एवढी आहे. गावात 45 वयोगटावरील सर्वांचे लसीकरण आता शंभर टक्के पूर्ण झाल्याचं ते सांगतात.
'गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज'
भारत सरकारने देशव्यापी लसीकरण मोहिमेसाठी अर्थसंकल्पात 35,000 कोटींची तरतूद केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला कोरोना साथीच्या आजाराविषयी माहिती विविध माध्यमांतून देण्यात आली. त्याचप्रमाणे लसीकरणाबाबतही लोकांच्या शंका आणि गैरसमज दूर करणं गरजेचं असल्याचं सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
याविषयी बीबीसी मराठीने राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांना संपर्क साधला.
त्या म्हणाल्या, "लोकांमध्ये एवढे गैरसमज असतील तर आम्ही माहिती घेऊ. लोकांमध्ये आरोग्य शिक्षण वाढवण्याचे काम करू. लस घेण्यासाठी ग्रामीण भागातही लोकांच्या रांगा लागत आहेत. लस घेतल्यानंतर अद्याप आरोग्यवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आलेले नाही हे आम्ही लोकांपर्यंत पोहचवू."
कोरोनाची लस सुरक्षित आहे का?
कोरोनावरील लस सुरक्षित असावी, हे लक्षात घेऊन भारत सरकारने ड्रग कंट्रोलर संस्थेला आदेश दिलेत की, लशीला तेव्हाच परवानगी द्यावी, जेव्हा तिने परिणाम आणि सुरक्षेचे मापदंड पार केलेले असतील.
भारतातील लस सुरक्षित असेल, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार, लस टोचून घेतल्यानंतर आरोग्य केंद्रावरच अर्धा तास आराम करावा.

फोटो स्रोत, Getty Images / NurPhoto
"लस टोचल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास झाल्यास तातडीने जवळच्या आरोग्य अधिकारी, डॉक्टर, एएनएम किंवा आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा," असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस इतर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा रुग्णांना कोरोनाविरोधी लस घेण्याचे खूप फायदे आहेत. पण लशीबद्दल प्रश्न असतील तर डॉक्टरांना विचारून शंका निरसन करून घ्यावं असंही डॉक्टर्स सांगतात.
मधुमेह, किडनी आणि हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना औषध घ्यावी लागतात. सरकारच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 लस घेण्याआधी कोणती औषधं घेऊ नयेत याबाबत विशेष सूचना नाही. सामान्यतः सुरू असलेली औषधं घेता येऊ शकतात.
लस देणाऱ्यांना तुम्ही कोणती औषधं घेत आहात याबाबत माहिती द्या, असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय.
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लशीचे साइट इफेक्ट असतात. त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही.
लस दिल्यानंतर अर्धातास लसीकरण केंद्रावरच लस दिलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवलं जातं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लस सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवला तर डॉक्टरांना कळवावे असंही आवाहन करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








