मुंबईतील वीज पुरवठा 2 तासांनंतर सुरळीत, उद्धव ठाकरेंचे चौकशीचे आदेश

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेलेली वीज आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दक्षिण मुंबई, मुलुंड, विलेपार्ले आणि अंधेरी पूर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मिळत आहे. तसंच रेल्वेसेवा सुद्धा आता सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

महापारेषणच्या 400 KVच्या कळवा-पडघा GIS केंद्रात सर्किट 1ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीज गेली होती.

पुढच्या तासाभरात संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

"महापारेषणच्या 400 KV कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट-1 च्या देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू होतं. त्यावेळी सर्व भार सर्किट-2 वर टाकलेला होता. मात्र, सर्किट-2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई-ठाणे येतील बहुतांश भाग प्रभावित झाला असून, अर्ध्या-पाऊण तासात पुन्हा सुरू होईल. विद्युत कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून, पुन्हा वीज लवकर येईल," असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असंही त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसंच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत.

वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे आणि तात्काळ मदत करावी असंही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षाला सांगितलं आहे.

उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथंही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

अतिरिक्त डिझेल मागवा - पालिका आयुक्त

मुंबईतील रुग्णालयांनी डिझेल जनरेटर किमान 8 तास चालतील एवढ्या डिझेल पुरवठ्याची व्यवस्था करून ठेवावी, तसंच रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित व्हायला नको, विशेषतः ICUचा याची काळजी घ्यावी, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

तसंच आपत्ती निवारण यंत्रणेने सज्ज राहावे, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.

ज्या रुग्णालयांना मदतीची गरज आहे त्यांनी आपत्ती निवारण यंत्रणेशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

तर सर्व रुग्णालयांना तातडीनं पॉवर बॅकअपने वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

इथं करा संपर्क

वीज पुरवठा खंडित झाल्याने आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी मुंबई महापालिकेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. 022-22694727, 022-226947725 आणि 022-22704403 या क्रमांकावर आपत्कालीन स्थितीत नागरिक फोन करू शकतात.

वीज पुरवठा खंडीत झाल्याने मुंबईत रेल्वेसेवा सुद्धा थांबली होती. पण 2 तासांनंतर आता हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

सोशल मीडियावर वीज गेल्याबाबत अनेकांनी माहिती देणारे ट्वीट केले आहेत.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात (पॉवर ग्रीड) बिघाड झाल्याने वीज गेल्याची माहिती 'बेस्ट'ने दिली आहे. या संदर्भात 'बेस्ट'ने ट्वीट केले आहे.

वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, वीज गेल्यानं मुंबईतील अनेक सेवांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. काहींनी कामात व्यत्यय आल्यानं काळजी व्यक्त केलीय, तर काहीजणांनी विनोदही केले आहेत.

@onenemessis नावाच्या युजरने ट्वीट करून म्हटलंय, "आज मला कळलं की, वायफायपेक्षा पंखा बंद असल्यानं अधिक त्रास होतो."

देव कुमार या युजरनं वीज खंडित झाल्याच्या घटनेवर विनोदी मीम शेअर केलं आहे.

मुंबईतील वीज पूर्ववत होण्यास काही तासांचा अवधी जाईल, हे कळल्यावर लोकांना काय वाटलं असले, याची कल्पना वनिता यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मीममधून शेअर केलीय.

मुंबईतील वीज खंडित झाल्यानंतर दहिसरच्या पलिकडे राहणाऱ्या लोकांची काय प्रतिक्रिया असू शकेल, याची कल्पना दिव्यांग लिंबाचिया यांनी मीममधून मांडली आहे.

बऱ्याच जणांचे फोन चार्ज नसतील आणि अशावेळी नेमकी वीज गेल्यानं काय स्थिती झाली असेल, हे आपण केवळ कल्पना केलेलीच बरी. @Madan_Chikna या युजरनं 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील पात्रांच्या आधारे हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय.

भाजपची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईत वीज गायब होण्याला ठाकरे सरकार आणि वीज कंपन्या जबाबदार आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

"सरकारकडे पैसे नाहीत, सप्लाई व्यवस्थित नाही, दुरूस्तीचं योग्य नियोजन नाही. त्यामुळे ग्रीड फेल्युअर झालंय. ठाकरे सरकारचे मंत्री वीज मोफत देऊ म्हणतात. हे लोकांची बत्ती गूल केल्याशिवाय रहाणार नाहीत,"असं सोमय्या यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)