संजय राऊत वादग्रस्त बोलून सरकारला अडचणीत आणत आहेत की ही ठरलेली रणनिती?

- Author, टीम बीबीसी मराठी
- Role, नवी दिल्ली
शिवसेना नेते आणि 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. तसंच इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीमला भेटल्या होत्या, असं म्हटल्यानंतर वाद उफाळला.
ठाकरे सरकारमध्ये ऊर्जा मंत्री असलेल्या नितीन राऊत यांनी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. शिवसेना भाजपसोबत होती त्यावेळी सामनातून भाजपवर टीका केली जायची पण आता ती खपवून घेतली जाणार नाही, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.
अशीच भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आपलं विधान मागे घेतलं. शुक्रवारी अग्रलेख लिहून त्यांनी इंदिरा गांधींबद्दल आपल्याला आदरच आहे हे देखील स्पष्ट केलं आहे.
पण संजय राऊत सातत्याने वाद निर्माण करत आहेत का? त्यांच्या विधानांनी शिवसेनेची अडचण होत आहे की हा राजकीय रणनीतीचा एक भाग आहे. या प्रश्नांचा आढावा घेण्याच प्रयत्न बीबीसीने केला आहे.
इंदिरा गांधी यांच्यावरील वाद कसा सुरू झाला?
दैनिक लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यावेळी संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राऊत यांच्यामध्ये खडाखडी झाली. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले ज्यांना मुंबईचा इतिहास माहीत नाही त्यांनी या विषयावर बोलू नये.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
करीम लाला पुख्तून-ए-हिंद या पठाणांच्या संघटनेचे प्रमुख होते. त्या निमित्ताने त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतली आहे. म्हणून ते इंदिरा गांधींना भेटायला गेले होते, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं. तरीदेखील काँग्रेसने टीका करणं सोडलं नाही. यानंतर मात्र संजय राऊत यांना माघार घ्यावी लागली. जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेतो असं त्यांनी स्पष्ट केलं.
छत्रपतींचे वंशज आणि राऊत यांच्याशी वाद
याआधी त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्याशीही वाद घातला. दिल्लीत भाजपच्या कार्यालयात जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या सोहळ्यानंतर संजय राऊत यांनी वक्तव्य केलं भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी तत्काळ राजीनामा द्यावा.

फोटो स्रोत, Ani/getty
"महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. नरेंद्र मोदींशी महाराजांची तुलना करणं राज्यातील भाजप नेत्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं," असं संजय राऊत यांनी म्हटलं.
पुन्हा ते उदयनराजेंना म्हणाले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात याचा पुरावा द्या.
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. 'उद्धवजी संजय रौतांचा जीभेला लगाम लावा' असं ट्वीट त्यांनी केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
त्यानंतर संजय राऊत यांनी या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं मी नेहमीच छत्रपतींच्या गादीचा मान राखला आहे. त्यांना न आवडण्यासारखं मी काय बोललो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
शिवाजी महाराजांच्या घराण्याला सातत्याने लक्ष्य करत असल्याबद्दल साताऱ्याचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले उदयनराजे भोसले यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही. तो मोठ्ठा कधीच नव्हता. दरवेळी म्हटलं जातं की वंशजांना विचारा. जेव्हा शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारून शिवसेना हे नाव तुम्ही ठेवलं का," असा सवाल उदयनराजेंनी त्यांचं नाव न घेता केला.
"वंशज म्हणून आम्ही काय केलं आहे? जे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं की तेच आम्ही केलं. जर कुणी आमच्याविरोधात ब्र काढला तर बांगड्या आम्ही पण भरलेल्या नाहीत," असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला.
सांगली आणि सातारा बंद
संजय राऊत यांच्याविरोधात सातारा आणि सांगलीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. संभाजी भिडेंनी 17 जानेवारीला सांगली बंदची हाक दिली. उदयनराजे भोसले हे शिवरायांच्या परंपरेचे पाईक आहेत. त्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. असं म्हणत संभाजी भिडे यांनी बंदाची हाक दिली.

फोटो स्रोत, Swati patil/bbc
"छत्रपती परंपरा ही देशाची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचे प्रतिनिधी असलेल्या छत्रपती उदयनराजे यांचा अपमान सहन केला जाणार नाही. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना पदावरून काढून टाकावं," असं भिडे यांनी म्हटलं.
'लक्ष विचलित करण्यासाठी ही विधानं आहेत का?'
लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत म्हणाले होते की जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा राऊत यांची कार फोडण्यात आली आणि जाळण्यात आली.
त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले "संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत. राज ठाकरेंनी त्यांना सामनामध्ये आणलं नसतं तर त्यांनी आयुष्यभर कारकुनी केली असती."

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
संजय राऊत यांच्या विधानांबद्दल मनसेला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना फोन केला. ते म्हणाले, "सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत यांना काही महत्त्व उरलं नाही, त्यांच्या भावालाही मंत्रिपद मिळालं नाही. त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाहीये.
राज ठाकरे यांच्या नावाला एक वलय आहे. त्यांचं नाव घेतलं की आपण चर्चेत येऊ हे देखील त्यांना ठाऊक आहे. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ते असं करत आहेत."
"सत्तेत आल्यावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं वचन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. पण अद्याप ते कोणतंही ठोस पाऊल उचलू शकले नाहीत यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत अशी विधानं करत आहेत," असं देशपांडे म्हणाले.
राऊत पूर्वीही बोलत, आताही बोलतील पण..
संजय राऊत सध्या जी विधानं करत आहे त्या मागचा अर्थ काय असं विचारलं असता वरिष्ठ पत्रकार आणि 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' या पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी सांगतात की "संजय राऊत हे आधी देखील बोलत असत. त्यावेळी ते भाजपबरोबर सत्तेत होते. एखाद-दोन अपवाद वगळता भाजपने त्यांच्या टीकेला फारसं मनावर घेतलं नव्हतं. 1 मे 2014 रोजी त्यांनी सामनातून लिहिलेल्या अग्रलेखातून गुजराती समुदायावर टीका केली होती."

फोटो स्रोत, Getty Images
"त्यावेळी त्यांनी शाल आणि साडी यांची डिप्लोमसी चालणार नाही असं लिहिलं होतं. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इंदिरा गांधी यांच्याबद्दल विधान केल्यामुळे काँग्रेसकडून अशीच नैसर्गिक प्रतिक्रिया आली आहे. करीम लाला यांना इंदिरा गांधी भेटल्या होत्या याचा अर्थ इंदिरा गांधी यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते असा अर्थ काढला जाऊ शकतो."
"म्हणून काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपसोबत सत्तेत असताना संजय राऊत यांनी विधान करणं हे वेगळं होतं आणि आता विधान करणं वेगळं आहे. तेव्हा ते सत्तेसोबत होते आता त्यांची सत्ता आहे. त्यामुळे पूर्वीइतके आक्रमक राऊत आता दिसणार नाहीत," कुलकर्णी सांगतात.
"पण 'सामना'ने सरकारविरोधी भूमिका घेणं हे नवीन नाही. 1995 मध्ये शिवसेना सत्तेत होती तेव्हा देखील सामनामध्ये ते सरकारविरोधी भूमिका घेत असत. कदाचित हा पक्षाच्या स्ट्रॅटेजीचाही भाग असू शकतो. पण सामनाने सरकारविरोधात टीका करणं हे नवीन नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत यांची पत्रकारितेतली कारकीर्द क्राइम रिपोर्टर टू एडिटर अशी झाली आहे. बहुतेक वेळा राजकीय पत्रकार हेच संपादक बनतात त्यामुळे ते बोलताना थोडं सावधपणे राहतात, पण संजय राऊत हे क्राइम रिपोर्टर होते त्यामुळे ते बेधडक बोलतात असं मला वाटतं," कुलकर्णी सांगतात.
'लक्ष विचलित करण्यासाठी ही विधानं नाहीत'
लक्ष विचलित करण्यासाठी किंवा या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे संजय राऊत यांची वक्तव्यं आली आहेत का, असं विचारलं असता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ही शक्यता फेटाळली.

फोटो स्रोत, Shiv sena
ते सांगतात, "आधीच्या सरकारला जे निर्णय घेण्यासाठी दोन-दोन वर्षं लागत होती. ते निर्णय आम्ही महिन्याभरात घेतले. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि यथायोग्यवेळी या निर्णयाची अंमलबजावणी होईल. बाळासाहेब थोरात यांनी बोलल्यानंतर संजय राऊत यांनी विधान मागे घेतलं आहे. त्यामुळे याविषयावर आता बोलण्यासारखं फार काही नाही," असं सावंत यांनी स्पष्ट केलं.
'उदयनराजेंवरील टीका जाणीवपूर्वक असू शकते'
उदयनराजे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेली टीका ही जाणीवपूर्वक असू शकते, असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी म्हटलं.
"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे. शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे तो हिंदुत्ववादी आणि शिवाजी महाराजांना मानणारा आहे. पण गेल्या निवडणुकीत भाजपने शिवाजी महाराजांना वंदन करून आपण प्रचार करत आहोत अशी भूमिका घेतली. नंतर छत्रपती संभाजी, शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे भाजपमध्ये गेले.

फोटो स्रोत, SAI SAWANT
शिवसेनेचं प्रतीकच शिवाजी महाराज आहे. ते आपल्यापासून भाजपने हिरावून घेतलं अशी भावनाही शिवसेनेची असू शकते त्यामुळे त्यांनी ही विधानं केली असवीत," असं देसाई यांना वाटतं.
"आपली प्रतीकं कायम राखण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे. पण त्यांच्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे असं आपण म्हणू शकतो. जर त्यांनी अशी विधानं पुन्हा पुन्हा केली तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या गोष्टीची दखल घ्यावी लागेल. कारण आता ते केवळ पक्षप्रमुखच नाहीत तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि सगळ्यांना सांभाळून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे," देसाई सांगतात.
इंदिरा गांधी यांच्याबद्दल आदरच : राऊत
इंदिरा गांधी यांच्याविषयी आपल्याला आदरच आहे. अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.
"मी इंदिरा गांधी यांची नेहमीच स्तुती केली आहे. त्यांना मी आयर्न लेडी म्हणतो. उलट ज्या लोकांना इंदिरा गांधी यांचा इतिहास नकोसा झाला आहे तेच लोक इंदिराजींसाठी गळा काढत आहेत," असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं.
ज्या लोकांना मुंबईचा इतिहास माहीत नाही ते लोक माझं वाक्य मोडून तोडून सादर करत आहेत असं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Photo division
शुक्रवारच्या अग्रलेखात सामनाने म्हटलं आहे की 'एकेकाळी पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास 'पेढेवाले' वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचं हसे करणाऱ्यांच्या पाठीमागे भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. सामनाने म्हटलं आहे की भाजपला सध्या काही काम नसल्यामुळे ते जुन्या गोष्टी उकरून काढत आहेत.'
'शिवसेनेनी सैदव इंदिराजींच्या महान व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्यातील मर्दानगीचा आदर केला. जेव्हा इंदिरा गांधींचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा शिवसेना ढाल बनून मध्ये उभी राहिली,' असंही सामनाने म्हटलं.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना 'सामना'च्या अग्रलेखाविषयी विचारले असता ते म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने नेहमी लोकापयोगी कार्यांनाच प्राधान्य दिलं आहे. सरकार स्थापन होऊन दीड महिना उलटला आहे. शेतकरी कर्जमाफीचं काय झालं याबाबत तुम्ही बोला. त्यांच्याकडे अद्यापही ठोस कृती कार्यक्रम नसल्यामुळे ही टीका होत आहे."
उदयनराजे - संजय राऊत वाद मिटणार का?
इंदिरा गांधी यांना पंतप्रधान म्हणून अनेक लोकांशी भेटावं लागत होतं. त्यांची समजूत काढावी लागत होती. असं स्पष्टीकरणही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलं आहे.
इंदिरा गांधी यांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी माघार घेतली आहे. पण या अग्रलेखातून त्यांनी उदयनराजे यांच्यावर पुन्हा टीकेची तोफ डागली आहे. उदयनराजे जेव्हा राष्ट्रवादीत होते तेव्हा ते म्हणाले होते की कोण मोदी? मोदी हे तर आमच्याकडे पेढेवाले आहेत. याचा संदर्भ सामनाच्या अग्रलेखात देण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उदयनराजे यांच्यात सुरू असलेला वाद मिटण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत, असं हेमंत देसाईंचं निरिक्षण आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








