काश्मीरमधून परतलेल्या कार्यकर्त्यांना तिथं दिसल्या या गोष्टी

फोटो स्रोत, Hindustan Times/getty
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
दिल्लीच्या प्रेस क्लब ऑफ इंडियाचा हॉल पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भरून गेला होता. काश्मीरमध्ये पाच दिवस घालवलेल्या चार जणांना ऐकण्यासाठी ही गर्दी जमा झाली होती. अर्थतज्ज्ञ ज्याँ ड्रेझ, अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंटचे विमल भाई, सीपीआयएमएल या पक्षाच्या कविता कृष्णन आणि अॅप्वा संघटनेच्या मैमूना मोल्लाह हे पाच दिवस काश्मीरमध्ये राहून आले आणि तिथल्या परिस्थितीचं त्यांनी वर्णन केलं.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगर, सोपोर, पंपोर, शोपियान आणि अनंतनाग या काश्मीरमधील भागात 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान राहून आलेल्या या मंडळीने तेथील परिस्थिती दाखवणारे फोटो आणि व्हीडिओ दाखवणार असं सांगितलं होतं.
पण पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अचानक सांगितलं की ते फोटो आणि व्हीडिओ दाखवू शकणार नाहीत. कविता कृष्णन यांनी सांगितलं की, "प्रेस क्लब ऑफ इंडियानं आम्हाला सांगितलं की आम्ही हे सर्व दाखवण्यासाठी प्रोजेक्टर वापरू शकणार नाहीत कारण त्यांच्यावर दबाव आहे."
जेव्हा मी प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या प्रवक्त्यांशी बोलले, तेव्हा त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आणि सांगितलं की त्यांच्यावर फोटो किंवा व्हीडिओ दाखवण्यावर कसलेही निर्बंध लावण्यात आले नाहीत.
पण मैमूना मोल्लाह यांनी म्हटलं की, "प्रेस क्लबने स्पष्टपणे कुठलंही कारण दिलं नाही, पण सांगितलं की त्यांच्यावरही काही निर्बंध आहेत म्हणून इथं काही दाखवता येणार नाही."
पत्रकार परिषदेनंतर ते फोटो आणि व्हीडिओ पत्रकारांना इमेलद्वारे पाठवण्यात आले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
ज्याँ ड्रेझ यांनी मीडियाच्या सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावर बोलताना म्हटलं की काश्मीरबाबत काय बातम्या दाखवल्या जाव्यात, यावर सध्या सरकारचा दबाव आहे आणि एक प्रकारे मीडियाकडून काश्मीरचं विशिष्ट चित्रच दाखवलं जावं अशी अपेक्षा आहे.
ज्याँ ड्रेझ पुढे म्हणाले, "स्थानिक काश्मिरी मीडिया काम करू शकत नाहीये, त्यांच्यावर दबाव तर आहेच, पण माहिती मिळवण्याचे मार्गही नाहीत. राष्ट्रीय स्तरावर बहुतांश मीडिया निष्पक्षपणे आपलं काम करत नाहीये, केवळ न्यूयॉर्क टाइम्स, रॉयटर्स, बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करणारे भारतीय नागरिक काश्मीरमध्ये फिरून बातमी मिळवून ती छापत आहेत."

फोटो स्रोत, kavita krishnan
कविता कृष्णन यांनी काढलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की वर्तमानपत्रांचे काही पानं केवळ रद्द झालेल्या लग्नांच्या जाहिरातीने भरले आहेत.
मैमूना मोल्लाह म्हटल्या की, वर्तमानपत्रांना छापण्यासाठी लागणारा कागद, म्हणजे 'न्यूजप्रिंट' संपत चालला आहे. दिल्लीहून न्यूजप्रिंट मागवण्यासाठी त्यांच्याकडे कुठले साधनही नाही.
हिंसाचाराचा दावा
या मंडळींनी मीडियाला उपलब्ध करून दिलेल्या फोटोंमध्ये छर्रे उडवणारी बंदूक म्हणजे पेलेट गनने गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा फोटो आहे.

फोटो स्रोत, vimal bhai
ज्याँ ड्रेझ या फोटोबाबत बोलताना म्हणाले की, "आम्ही श्रीनगरच्या रुग्णालयात अशा दोनच लोकांना भेटलो, पण आम्हाला माहीत आहे की सौरा येथे 10 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली ज्यामध्ये अनेक जण जखमी झाली आहेत. पण आम्हाला तिकडे जाऊ दिले नाही."
काश्मीरमधील मोठ्या राजकीय नेत्यांसोबतच राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वकील, व्यापारी आणि जे सरकारच्या विरोधात बोलू शकतात अशा लोकांना ताब्यात घेतले गेले आहे, असे ज्याँ ड्रेझ यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, kavita krishnan
किती लोकांना ताब्यात घेतलं गेलं आहे, कोणत्या कायद्यांतर्गत त्यांना उचललं गेलं, त्यांना कुठं ठेवलं गेलं आहे, याबाबत त्यांना कोणतीही माहिती नाही.
ज्याँ ड्रेझ यांचा दावा आहे की, श्रीनगर आणि त्याच्या लगतच्या शहरांमध्ये, गावांमध्ये लोक भयग्रस्त आहेत आणि केवळ आपली ओळख लपवण्याच्या अटीवरच लोक बोलायला तयार होते.
जम्मू काश्मीर पोलिसांनी बुधवारी श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना मान्य केले की गेल्या काही दिवसांमध्ये काही लोक पेलेट गनमुळे जखमी झाले आणि त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
ईद आणि संचारबंदी
श्रीनगरसह अनेक भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे कोणत्याही ठिकाणी चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याला बंदी आहे.
मैमूना मोल्लाह यांचं म्हणणं आहे की अधिकृतपणे संचारबंदी लागू नसतानाही या भागांमध्ये संचारबंदीसारखे वातावरण आहे.

फोटो स्रोत, kavita krishnan
त्या म्हणाल्या, "आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाताना खूप अडचणी आल्या. प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे कर्फ्यू पास मागितला गेला, पण कर्फ्यू लागू नसल्यानं पास दिलेच जात नव्हते. अशा परिस्थितीत काटेरी तारा आणि बॅरिकेड्सने बंद केलेले रस्ते आम्ही ओलांडूच शकत नव्हतो."
आपल्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलंय की ईदच्या दिवशीही विशेष मोकळीक देण्यात आली नव्हती. ईदची नमाज जामा मशिदीत होते, मात्र ती गल्लीतच करावी लागली अशी तक्रार लोकांनी केल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय.

फोटो स्रोत, vimal bhai
ही टीम लडाख आणि जम्मूमध्ये नाही गेली. पण कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लोकांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याच्या सरकारच्या दाव्याला त्यांनी चुकीचं म्हटलंय.
कविता कृष्णन यांनी म्हटलं की त्या शेकडो लोकांना भेटल्या पण केवळ एकाच व्यक्तीनं आनंद व्यक्त केला आणि ती व्यक्ती भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता होती.
त्यांचं म्हणणं आहे की लोकांशी बोलताना हे शब्द वारंवार ऐकायला मिळत होते, "उद्ध्वस्त, बंदुकीची बळजबरी, विश्वासघात, कब्रस्तान आणि अन्याय."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








