हिंदुत्वावर निवडणुका, भाजपसाठी विकास मुद्दा नाही - सुब्रमण्यम स्वामी

फोटो स्रोत, @Swaym39
येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्व हात मुद्दा असेल, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे नेते आणि राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं. बीबीसी हिंदीसोबत झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी विविध विषयांवर त्यांची मत मांडली. राम मंदिर, रफाल विमान खरेदी, नोटाबंदी, सीबीआयमधील वाद अशा विविध विषयांवर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
या लाईव्हमध्ये बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. हिंदुत्व हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारच्या आर्थिक धोरणांवरही प्रश्न उपस्थित केले.
सुब्रमण्यम स्वामी यांनीची सविस्तर मुलाखत अशी :
राम मंदिराच्या मुद्द्यापासून भाजप दूर का आहे?
भाजप सत्ताधारी पक्ष आहे. भाजपला या मुद्दयापासून दूरच रहायला हवं. मी राम मंदिरासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. राम मंदिर हा कोणत्याही एका पक्षाचा मुद्दा होता कामा नये. दु:खद बाब म्हणजे भाजप आणि विश्व हिंदू परिषदेनेच हा मुद्दा उपस्थित केला आहे.
भारतीय पुरातत्त्व खात्याने या वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होत हे मान्य केलं आहे. तिथे मंदिरानंतर मशीद बांधली गेली. इस्लाम आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे की मशीद त्या जागेचा अनिवार्य घटक नाही आणि नमाज पठण कुठंही होऊ शकतं.
त्यामुळे मला असं वाटतं की ही रामाची जन्मभूमी आहे आमि रामासंदर्भातील श्रद्धेनुसार रामाचा जन्म याच जागेवर झाला होता. या जागेवर पुन्हा मंदिर उभारणीला सर्व समाजाने मान्यता दिली पाहिजे.
शिवसेनेचे आव्हान
शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. लोकशाहीत इतका विरोध तर होतोच. मात्र मला असं वाटतं की भाजप आणि शिवसेनाची युती कोणत्याही परिस्थितीत तुटणार नाही.
मंत्रिमंडळात नसल्याचं काही दु:ख आहे का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की ज्यांनी मला बाहेर ठेवलं त्यांना दु:ख व्हायला हवं.
'हिंदूंवरही अन्याय होतो'
सैय्यद शहाबुद्दीन यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी मुस्लिमांवर अन्याय झाला तर मदत करू असं म्हटलं होतं. पण आता ते राम मंदिराचं समर्थन करत आहेत. यावर स्वामी म्हणाले, "हाशिमपूरा हत्याकांडात न्याय मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. जिथं अन्याय होतो तिथं मी लढा देतो. हिंदूंवरही अन्याय होतो, तिथं ही न्याय झाला पाहिजे."
कर्तारपूरला विरोध का?
मला असं वाटतं, "कर्तारपूर कॉरिडॉरच्या कामासाठी दोन्ही मंत्र्यांना जायला नको. तो तयार करण्याचा आदेश देण्यात काही गैर नाही. मात्र हा कार्यक्रम एखादा सण असल्यासारखा साजरा करणं योग्य नाही. पाकिस्तानच्या सरकारमधील काही लोक 26/11 च्या हल्ल्यानंतर आनंद साजरा करत होते. भारताकडून पाकिस्तानात मंत्री गेले की पाकिस्तानच्या प्रस्तावाला सन्मान मिळाल्यासारखं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडाही सन्मान मिळू नये."
सीबीआय वादावर काय म्हणतात स्वामी?
सुब्रमण्यम स्वामी यांनी राकेश अस्थाना यांची 2016ला स्तुती केली होती. मात्र नुकतंच त्यांनी अस्थाना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची बाजू घेतात अशी टीका केली होती.
यासंदर्भात स्वामी म्हणतात, "6 डिसेंबर 2014ला चिदंबरम यांची सीबीआय मुख्यालयात चौकशी झाली होती. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्याच्या जागी राकेश अस्थाना आले."
तेव्हा मी त्यांना तुम्ही आरोपपत्र दाखल केलं नाही किंवा काही स्टेटस रिपोर्ट दिला नाही, अशी विचारणा केली होती. त्यावर त्यांनी सप्टेंबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचं वचन दिलं होते.

फोटो स्रोत, AFP
मात्र ते आरोपपत्र आतापर्यंत दाखल झाले नाही. नंतर कळलं की त्यांचे आणि चिदंबरम यांचे अप्रत्यक्ष संबंध होते. अंमलबजावणी संचलनालायाने सीलबंद कव्हर मध्ये स्टेटस रिपोर्ट दिला होता.
रॉबर्ट वढेरा प्रकरणात शांत का?
कारण सोनिया गांधी त्यांना स्वत: काढू इच्छितात. आतली गोष्ट अशी आहे की प्रियंका गांधींना मुक्त करण्यासाठी ते वढेरा यांची हकालपट्टी करायची आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रफाल बाबत स्वामी म्हणतात जर विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला तर ते मदत करणार नाही. ज्या लोकांनी हा मुद्दा उपस्थित केला ते स्वत: कष्ट का करत नाहीत? मी जसं नॅशनल हेराल्ड प्रकरण लावून धरलं तसं हे लोक का करत नाहीत?
सरकारचं आर्थिक धोरण
सरकारचं कोणतंही आर्थिक धोरण नाही. अर्थमंत्री अरुण जेटली तेच करतात जे अधिकारी त्यांना सांगतात. त्यांना अधिकारी भूलवतात. जीएसटी संदर्भात चिदंबरम यांनी जी धोरण आखली होती, तीच जेटली पुढं नेत आहेत.
नोटाबंदी हे योग्य पाऊल होतं. मात्र त्यासाठी पुरेशी तयारी झाली नव्हती. त्यासाठी अरुण जेटली जबाबदार आहेत.
निवडणुकीत मुद्दे कोणते आहेत?
विकास हा मुद्दा कधीच आमचा मुद्दा नव्हता. अटबिहारी वाजपेयी वाजपेयी आणि नरसिंह राव यांचाही विकास हाच मुद्दा होता. सबका साथ सबका विकास या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत.
मात्र हिंदुत्वामुळे खरी चेतना आणि आस्था जागृत होणार आहे. जेव्हा लोक आपल्या जाती पलीकडे जाऊन मत द्यायला तयार होतात तेव्हाच आमचा विजय होतो.

फोटो स्रोत, Getty Images
आगामी निवडणुकांमध्येसुद्धा हिंदुत्वाचा मुद्दाच आघाडीवर असेल. मागच्या वेळी आमची मतं 21 टक्के वरून 31 टक्क्यांवर गेली आणि विजय झाला.
मला असं वाटतं की ब्राह्मण जन्माला येत नाहीत. जे ज्ञानी आणि त्यागी वृत्तीचे असतात ते ब्राह्मण असतात.
काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचं आव्हान
काँग्रेसचं सध्या काहीच अस्तित्व नाही. जेव्हा राहुल गांधी बोलतात तेव्हा आमचं मत एका टक्क्याने वाढतं. इंदिरा गांधी यांच्यासमोरही अनेक मातब्बर उभे होते. प्रादेशिक पक्षाचं कोणतंच आव्हान नाही.

फोटो स्रोत, EPA
आम्ही या पाच वर्षांत खूप काम केलं. काही लोक नाखूश आहेत. मात्र आम्ही अशी कामं केली जी आधी कुणीच केली नाहीत. सोनिया गांधींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांना जामीन घ्यावा लागला.
हे सगळं मी केलं हे ही खरं आहे. यात भाजपाचं काही योगदान नाही. मात्र मी भाजपाचा आहे. त्यामुळे जे केलं ते भाजपसाठीच केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








