तृप्ती देसाई यांचा लढा खरंच महिला हक्कांसाठी की फक्त पब्लिसिटी स्टंट?

तृप्ता देसाई

फोटो स्रोत, Hindustan Times / Getty Images

फोटो कॅप्शन, तृप्ता देसाई
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मी 17 नोव्हेंबरला शबरीमला मंदिरात प्रवेश करणार," अशी तृप्ती देसाईंने घोषणा केली होती. तेव्हापासून कोची विमानतळाबाहेरचं वातावरण तापलं होतं.

शुक्रवारी पहाटे चार वाजता देसाई कोची विमानतळावर पोहोचल्या आणि तिथून त्या शबरीमला मंदिर प्रवेशासाठी जाणार, असं सांगण्यात आलं. आणि हे कळताच विमानतळाच्या बाहेर आंदोलक मोठ्या संख्येने गोळा झाले.

तृप्ती देसाईंचं म्हणणं होतं की आंदोलकांनी त्यांनी ठरवलेल्या टॅक्सीचालकांनाही धमकावलं आहे, तसंच त्यांना आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

"आंदोलकांना भीती आहे की एकदा का तृप्ती देसाई विमानतळाच्या बाहेर पडल्या तर त्या मंदिर प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. आंदोलक हिंसक झाले आहेत आणि आम्हाला विमानतळावर अडवलं आहे. याआधी कुणालाच असं अडवलं नव्हतं. फक्त सात महिलांना लाखो आंदोलक घाबरले आहेत. मला वाटतं हेच आमच्या आंदोलनाचं यश आहे," असं तृप्ती देसाईंनी बीबीसी मराठीशी शक्रवारी सकाळी बोलताना सांगितलं.

Trupti Desai

फोटो स्रोत, Trupti Desai

फोटो कॅप्शन, तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्या कोची विमानतळावर बाहेरचा जमाव पांगण्याची वाट पाहाताना

अखेर किमान 15 तास विमानतळावर ताटकळत बसल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि शबरीमला मंदिरात जाणार नाही, असं घोषणा संध्याकाळी केली.

अजित पवार विरुद्ध तृप्ती देसाई

महिलांना मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यांवरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई परिचित आहेत. आजवर अनेक धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत.

त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या ते शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावण्यासाठी केलेल्या आंदोलनातून. पण फार कमी जणांना माहीत असेल की त्याआधी त्यांनी अजित पवारांसोबत पंगा घेतला होता.

तृप्ती देसाईंची दखल मीडियाने सर्वप्रथम घेतली ती त्यांनी अजित सहकारी बँक आणि पतसंस्थेविरोधात केलेल्या आंदोलनामुळे. ही बँक अजित पवारांच्या नावाने त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सुरू केली होती. या बँकेत झालेल्या काही गैरप्रकारांविरुद्ध देसाई यांनी 2008 साली आंदोलन छेडलं होतं, असं पुण्यातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने सांगितलं.

त्या आंदोलनादरम्यान आपल्याला धमक्या आल्या होत्या, असा दावाही देसाई करतात. 2009 साली त्यांनी काँग्रेसकडे निवडणुकीचं तिकिटही मागितलं होतं, पण ते त्यांना मिळालं नाही.

भूमाता रणरागिणी ब्रिगेड

तृप्ती मूळ कोल्हापूरच्या, पण त्यांचं कुटुंब नंतर पुण्यात स्थायिक झालं. पुण्याच्या SNDT महाविद्यालयातून त्यांनी होम सायन्सची पदवी घेतली.

मुक्त पत्रकार अश्विनी सातव सांगतात, "सुरुवातीला त्या अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनात दिसल्या. त्यानंतर त्यांनी बुधाजीराव मुळीकांच्या भूमाता ब्रिगेड या संस्थेत काम करायला सुरुवात केली."

ही संघटना खरंतर शेतकऱ्यांच्या पत्नींच्या मदतीसाठी स्थापन केली होती आणि त्या वेळेस तिचा मंदिर प्रवेश आंदोलनाशी फारसा संबंध नव्हता, अशी माहिती सहारा समय वाहिनीच्या पुण्याच्या ब्युरो प्रमुख प्रतिभा चंद्रन देतात.

कोची विमानतळावर देसाई त्यांच्या कार्यकर्त्यांसह

फोटो स्रोत, Trupti Desai

फोटो कॅप्शन, कोची विमानतळावर देसाई त्यांच्या कार्यकर्त्यांसह

अश्विनी म्हणतात की नंतर मुळीकांच्या संस्थेतून देसाई बाहेर पडल्या आणि 2010 साली स्वतःची भूमाता रणरागिणी ब्रिगेड स्थापन केली. "मुळीकांच्या संस्थेतून त्या बाहेर पडल्या असल्या तरी त्यांनी आपल्या संस्थेचं नाव त्यांच्या संस्थेशी साधर्म्य असणारंच ठेवलं आहे," हे चंद्रन सांगतात.

या संस्थेमार्फत त्या महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या हक्कांविषयी लढा देतात.

शनिशिंगणापूर आंदोलन

तृप्ती देसाईंची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली ती शनिशिंगणापूर आंदोलनाच्या निमित्ताने. देवस्थानातल्या मुख्य चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी तेव्हा ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्या विद्या बाळ आणि अॅड निलिमा वर्तक या न्यायलयीन लढाई लढत होत्या. शनिशिंगणापूर महिला प्रवेश प्रकरणी त्यांनी हायकोर्टात अपील केली होती. आणि याच दरम्यान तृप्ती देसाईंनी या न्यायालयीन लढाईला रस्त्यावरच्या आंदोलनाचं रूप दिलं.

शनिशिंगणापूर आंदोलनादरम्यान तृप्ती देसाई

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, शनिशिंगणापूर आंदोलनादरम्यान तृप्ती देसाई

दरम्यान, विद्या बाळ आणि अॅड. वर्तकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हायकोर्टाने महिलांसाठी चौथरा खुला केला. पण गंमत म्हणजे, तरीही शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढणाऱ्या तृप्ती देसाई पहिल्या महिला आंदोलक नव्हत्याच.

"त्यांच्या आधी प्रियंका जगताप आणि त्याच्यासोबत असणाऱ्या महिलांच्या गटाने सगळ्यांत आधी शनिशिंगणापूरला चौथऱ्यावर प्रवेश केला," अशी माहिती पत्रकार अश्विनी सातव देतात.

न्यायालयीन लढाईही नाही आणि चौथऱ्यावर सर्वप्रथम प्रवेशही नाही, असं असतानाही शनिशिंगणापूर चौथरा प्रवेशाचं श्रेय बऱ्यापैकी त्यांच्या पदरी पडलं.

राजकीय महत्त्वाकांक्षा

तृप्ती देसाईंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, हे त्यांना जवळून पाहिलेल्या अनेक जाणकारांनी मान्य केलं आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक पक्षांचे उंबरेसुद्धा झिजवले आहेत.

"मी त्यांना पहिल्यांदा एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरच पाहिलं होतं. तिथे आपली दखल घेतली जावी, असा त्यांचा प्रयत्न होता," असं सहारा समय वाहिनीच्या प्रतिभा सांगतात. "त्यानंतर त्या भाजपच्या कार्यालयात अनेकदा दिसल्या. म्हणजे अगदी प्रेस कॉन्फरन्स असेल तरी व्यासपीठावर त्या असायच्या वगैरे. मग काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसल्या. जेव्हा राहुल गांधी पुण्यात आले होते, तेव्हा त्या सगळ्या कार्यक्रमात आवर्जून भाग घेताना दिसल्या."

प्रतिभा पुढे सांगतात, "जेव्हा आम आदमी पक्षाचा गवगवा सुरू झाला आणि हा पक्ष राजकारणात पुढे येऊ लागल्या, तेव्हा त्या मला 'आप'च्या व्यासपीठावरही दिसल्या. त्या असंही म्हणाल्या होत्या की आम आदमी पक्षाने मला तिकिट दिलं तर मी सुप्रिया सुळेंच्या विरोधातही लढेन. यावरूनच लक्षात येतं की त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा होती, किंबहुना आहे."

Facebook/Trupti Desai

फोटो स्रोत, Facebook/Trupti Desai

तर दुसऱ्या बाजूला पुण्यातल्या काही पत्रकारांना हेही वाटतं की राजकारणात यशस्वी होण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची जी वृत्ती लागते ती त्यांच्यात नाही.

अश्विनी सांगतात की 2012 साली तृप्ती देसाईंनी पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवली. पण त्यात त्या पराभूत झाल्या. "त्या कुठल्या एका पक्षाशी बांधील आहेत, असं मला नाही वाटतं. त्यांची पूर्वी अशी महत्त्वाकांक्षा असेलही पण आता तसं काही असेल, असं मला वाटत नाही. कारण त्यांची स्वतःची अशी कुठली भूमिका नाही, पुढे काय करायचं याचा ठाशीव कार्यक्रम नाही."

'महिला मंदिर प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आणला'

तृप्ती देसाईंविषयी अनेक उलटसुलट मतप्रवाह आहेत. तरीही त्यांनी महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं, हे सगळेच जाणकार मान्य करतात. प्रतिभा चंद्रन यांच्यानुसार "तृप्ती देसाईंनी हा मुद्दा ऐरणीवर आणला. त्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला, हे नाकारून चालणार नाही."

या बाईने मंदिरप्रवेशाच्या मुद्दावरून अक्षरशः मारही खाल्ला आहे. तेवढं क्रेडिट त्यांना द्यावंच लागेल, असं अश्विनी सातव यांना वाटतं.

हाजी अली दर्गा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हाजी अली दर्गा

शनिशिंगणापूर पाठोपाठ तृप्ती देसाईंनी मुंबईचा हाजी अली दर्ग्यात, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलनं केली.

"हाजी अली दर्ग्याच्या वेळेस तर त्यांचे इतर पुरोगामी मुस्लीम संघटना, ज्या दर्गाप्रवेशासाठी आंदोलन करत होत्या त्यांच्याशी मतभेद झाले," अश्विनी सांगतात.

नाशिकमध्ये मात्र तृप्ती देसाईंवर सोडावॉटरच्या बाटल्यांनी हल्ला झाला होता. नाशिकमध्ये लोकमत वृत्तपत्रात मुख्य उपसंपादक असणारे संजय पाठक सांगतात, "2016 साली कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात प्रवेश केला खरा. पण त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच त्यांची गाडी शहरातल्या रविवार कारंजावरून जात असताना त्यांच्यावर सोडावॉटरच्या बाटल्यांनी हल्ला झाला. त्यानंतर त्या पुन्हा कधीही नाशिकला परतल्या नाहीत."

पब्लिसिटी स्टंट?

पण शबरीमला प्रकरणावरून हिंदुत्ववादी सनातन संस्थेने तृप्ती देसाईंवर निशाणा साधला आहे. तृप्ती देसाईंवर एक आरोप असाही केला जातो की त्यांची आंदोलनं म्हणजे पब्लिसिटी स्टंट असतात.

"तृप्ती देसाई प्रसिद्धीलोलूप आहेत. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, त्यामुळे त्या सातत्याने हिंदू धर्माच्या प्रथांविरोधात कार्य करतात. हाजीअली दर्गा आंदोलन त्यांनी मध्येच सोडून दिलं होतं. हिंदू धर्माव्यतिरिक्त त्या इतर धर्मांचा कठोर विरोध करत नाही," असं सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणतात.

तर अश्विनी सातव नमूद करतात की तृप्ती देसाईंचा प्रसिद्धीसाठी अट्टहास असतो. "पुण्यापासून जवळच एक देवाची हुबळी म्हणून एक गाव आहे. तिथेही कानिफनाथांच्या मंदिरात प्रवेश करायला महिलांना बंदी आहे. तृप्ती देसाई राहतात त्या पुण्यापासून हे गाव जवळच आहे. मग इथे महिलांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांनी काही का केलं नाही? कसंय, शनिशिंगणापूर, हाजी अली, कोल्हापूर, आता शबरीमला ही सगळी मंदिरं मोठी आहेत. तिथे काही केलं की लगेच मीडियात येतं," असं निरीक्षण सातव नोंदवतात.

मीडियाने मोठ्या केलेल्या कार्यकर्त्या की महिलांच्या हक्कांसाठी लढणारी?

फोटो स्रोत, HT via Getty Images

फोटो कॅप्शन, मीडियाने मोठ्या केलेल्या कार्यकर्त्या की महिलांच्या हक्कांसाठी लढणारी?

"जेव्हा शनिशिंगणापूरनंतर त्यांना करायला काही नव्हतं तेव्हा त्यांनी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना मारहाण करणं, असले प्रकार केलेत. हेही प्रसिद्धीसाठीच होतं कारण याचे व्हीडिओही त्या स्वतःच बनवायच्या, अगदी माध्यमांना हवे असतील तसे एक दीड मिनिटांचे आणि स्वतःच माध्यमांकडे पाठवायच्या," सातव सांगतात.

तृप्ती देसाई त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावतात. "आमचं काम राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आमच्या कामाला योग्य प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे टीकाकार आमच्यावर टीका करत आहे. आपला जीव धोक्यात घालून आम्ही हे काम करत आहोत. निदान या तरी गोष्टीचा टीकाकारांनी विचार करावा," असं तृप्ती देसाई सांगतात.

प्रतिभा चंदन यांनाही वाटतं की तृप्ती देसाई या माध्यमांनी मोठ्या केलेल्या कार्यकर्त्या आहेत. पण तृप्ती देसाई मात्र आपलं काम महिलांच्या हक्कांसाठी लढणं असल्याचं सांगतात.

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगतात, "आजकाल सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्री-पुरुष समानता आली आहे. स्त्रियांना समान हक्क आहेत. मग मंदिर प्रवेशाबाबतही त्यांना पुरुषांसारखेच हक्क मिळायला हवेत. ते मिळत नाहीत, तोवर माझा लढा सुरू राहणार."

हेही वाचलंत का?